स्वामींच्या घराण्यात रघुनाथाची व सूर्यनारायणाची उपासना पूर्वापार चालत आलेली होती. त्यामुळे तत्कालीन क्रूर अत्याचारी, अन्यायी मुसलमानी राजवट पाहून सूर्यवंशी कोदंडधारी रामाच्या उपासनेचा वेगळा अर्थ स्वामींना प्रतीत झाला. रामभक्ती मुक्ती देणारा असण्यापेक्षाही त्याने स्वपराक्रमाने रावणाच्या बंदिवासातून देवांना सोडवले. दुष्ट, दुराचारी रावणाचा वध केला म्हणून स्वामींना तो प्रिय आहे. १२ वर्षांची पायी केलेली भारतभ्रमंती अर्थात तीर्थयात्रा करून इ. स. १६४४ साली आपल्या नियोजित कार्यासाठी ते कृष्णातीरी आले. तेथे त्यांनी धनुर्धारी राम व हनुमंत याची उपासना सांगणारा संप्रदाय स्थापन करून शिष्य समुदाय वाढवायला सुरुवात केली.
चैत्र शुद्ध नवमी रोजी सूर्य माध्यान्ही आला असता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. समर्थ रामदास स्वामींचाही जन्म याच तिथीला ही जन्मवेळ साधून झाला. समर्थ रामदासांच्या घरात अनेक पिढ्यांपासून रामाची उपासना चालत आलेली होती. महाराष्ट्राच्या थोर संतमालिकेत रामदास स्वामींचे कार्य जरा वेगळे असले, तरी त्यांना संतमालिकेतून वेगळे काढता येत नाही. रामदासांनीही भक्तिमार्गाचाच पुरस्कार केला आहे, हे स्पष्ट आहे. दासबोधासंबंधी सांगताना ते म्हणतात-
भक्तिचेनि योगे देव।
निश्चय पावती मानव।
ऐसा आहे अभिप्राव। इये ग्रंथी॥
मनाच्या श्लोकांतही ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।’ असा निर्वाळा स्वामींनी दिला आहे. रामदासस्वामींना भक्तिमार्गी संत परंपरेतून वेगळे ठरवण्याचा अट्टाहास काही लोक करीत आहेत, तो योग्य नाही. समर्थपूर्व काळात वारकरी संप्रदायाचा प्रभाव जनमानसावर होता. वारकरी संप्रदायाचे दैवत पंढरपूरचा पांडुरंग आहे. समर्थ संप्रदायाचे दैवत प्रभू रामचंद्र आहे. पण, दोन्ही संप्रदायांत भक्तिमार्गाचे साधर्म्य आहे. पांडुरंग व रामचंद्र दोघेही मूळ विष्णू असल्याने दोन्ही पंथ एका अर्थाने वैष्णवच म्हणायला हरकत नाही. रामदासस्वामी भक्तिमार्गात वाढलेले होते आणि त्या मार्गात राहूनच त्यांनी आपला पराक्रम नोंदवला आहे. समर्थ रामदास स्वतः विठ्ठल आणि राम यांच्यात भेद मानीत नव्हते. स्वामी पंढरपूरला गेले असताना त्यांना पांडुरंगाच्या जागी प्रभू रामचंद्र दिसले आणि उत्स्फूर्तपणे ते उद्गारले, ‘येथे उभा का श्रीराम मनमोहन मेघःश्याम।’ त्या कवितेत ते पुढे पांडुरंगाला विचारतात, “तुझे धनुष्यबाण कुठे गेले? तुझे वानरदल इथे दिसत नाही. ते कुठे आहे? अयोद्धापुरी सोडून इथे कटीवर हात ठेवून उभा आहेस?” शेवटी रामदासस्वामी म्हणतात, “रामदासी जैसा भाव। तैसा झाला पंढरीराव।” ज्ञानेश्वरांच्या ‘सर्वाभूती समभाव’ या विचारांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात जोमाने वाढला. वस्तुतः संत ज्ञानदेवांची गुरुपरंपरा निवृत्तिनाथ-गहिनीनाथ अशी नाथसंप्रदायी आहे. तरीही समत्व विचाराने ते पंढरपूरला विठोबाच्या पायी लीन झाले. संत एकनाथ मुळात दत्त संप्रदायातील असूनही त्यांनी वारकरी संप्रदायासाठी भरघोस कार्य केले आहे. रामदासस्वामींचे गुरू कोण, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. समर्थांनी त्याचे उत्तर आपल्या वाड्.मयात दिलेले आहे.
आदिनारायण सद्गुरु आमुचा।
शिष्य जाला त्याचा महाविष्णू।
तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस।
तेणे ब्रह्मयास उपदेशिले।
ब्रह्मदेवे केला उपदेश वसिष्ठा।
तेथे धरा निष्ठा शुद्ध भावो।
वसिष्ठ उपदेशी श्रीरामयासी।
रामें रामदासी उपदेशिले॥
समर्थ सांगतात की, आम्हाला रामरायाकडून उपदेश मिळाला आहे. रामदासस्वामींची गुरूपरंपरा राम-वसिष्ठ-ब्रह्मदेव-हंस-महाविष्णू-आदिनारायण अशी थेट आदिनारायणांपर्यंत जाते.हिंदू समाजाचा विचार करता, हिंदूंच्या देवघरात अनेक देव-देवता पूजल्या जातात. त्याशिवाय प्रत्येक घराण्याची, वंशाची परंपरा म्हणून कुळधर्म, कुळाचार यांत अनेक क्षेत्रदेवतांना मान्यता असते. त्यात खंडोबा, जोतिबा, भैरोबा, म्हसोबा, सटवाई इत्यादी अनेक क्षेत्रदेवतांच्या पूजा-उपासना रूढ होत्या. काही नवसाला पावणार्या होत्या. हिंदू समाजाची दृष्टी सर्वसमावेशक व समन्वयात्मक असल्याने सर्वांना पूजेचा मान होता. त्यामुळे तत्त्वज्ञानातून आलेले देव कोणते, अज्ञानातून आलेले कोणते आणि भीतिपोटी आलेले कोणते, याचा विवेक राहिला नाही. सर्व क्षेत्रदेवांच्या पसार्यातून समाजाला बाहेर काढून त्याला आत्मोन्नती साधणार्या रामकृष्ण आणि विठ्ठलभक्तीकडे वळवण्याचे महान कार्य वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वरादी सर्व संतांनी केले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र त्यांचा कायम ऋ णीराहील. तथापि काळाची पावले ओळखून, भोवतालची सामाजिक, राजकीय विदारक स्थिती जाणून समर्थांना कोदंडधारी राम व वीर हनुमान यांची उपासना रूढ कराविशी वाटली. दासबोध ग्रंथात अनेकवेळा क्षेत्रदेवांचा उल्लेख येतो. भैरव, खंडेराव, बीरदेव, बनशंकरी, झोटिंग, मुंज्या, तुकाई, यमाई, सटवाई अशा अनेक क्षेत्रदेवांची नावे दासबोध १३.८ मध्ये आढळतात. त्यांना बाजूला सारून स्वामींनी समाजाला सात्विक रामोपासनेकडे वळवले. तीर्थयात्रेच्या काळात तत्कालीन मुसलमानी राजवटीकडून होणारे सामाजिक अत्याचार, मंदिरांचे त्यातील मूर्तीचे भंजन, स्त्रियांची विटंबना हे सारे पाहून रामदासांचे अंत:करण हेलावले. मुसलमानांकडून राजकीय आक्रमणाबरोबर सांस्कृतिक आक्रमणाचा मोठा धोका होता. तो वेळीच ओळखणार्या रामदासस्वामी व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महान विभूती होत्या. त्यासाठी त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. तो इतिहास सर्वश्रुत आहे. तीर्थयात्रेच्या काळात स्वामींनी अनेक भग्न मंदिरे, भग्नावस्थेतील मूर्ती पाहिल्या. अत्याचाराची, स्त्रियांना भ्रष्ट केल्याची असंख्य उदाहरणे पाहून ऐकून रामदास मोडावले. या सर्वांतून सावरायचे, त्याचा प्रतिकार करायचा, तर रामाचे विचार, पराक्रम, शौर्य, औदार्य, प्रजाहितदक्षता जेथे आहे अशा राजाचा शोध घेण्याचे स्वामींनी ठरवले. रामाचा आदर्श लोकांसमोर राहावा, या उद्देशाने रामाची व स्वामिनिष्ठ हनुमानाची उपासना निश्चित केली. अनेक देवदेवतांच्या पराक्रमाच्या कथा लोकांना माहीत आहेत, पण त्या सर्वांत राघवाची कथा श्रेष्ठ आहे, असे स्वामींचे मत होते.
कथा देव इन्द्रादी ब्रह्मादिकांची।
समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची।
जेणे फेडिला पाड्.ग ब्रह्मादिकांचा।
बळे तोडिला बन्द त्या त्रीदशांचा।
म्हणोनी कथा थोर त्या राघवाची॥
स्वामींना स्वधर्माविषयी आस्था होती. त्यांना हिंदू संस्कृती व हिंदवी स्वराज्य सर्वत्र पसरलेले पाहायचे होते. पण, हे कार्य केवळ भजन-पूजन करून साधेल, असे त्यांना वाटत नव्हते. म्हणून त्यांनी इतर देव-देवता बाजूला सारून सज्जनांचा रक्षणकर्ता व दुष्ट दुर्जनांचा संहारकर्ता अशा कोदंडधारी रामाच्या उपासनेला प्राधान्य दिले. ती एक प्रकारे शक्तीची उपासना होती. रामाच्या ठिकाणी सत्व आणि रज गुणांचे अपूर्व मिश्रण होते. रामाविषयी दासबोधात लिहिताना स्वामी म्हणतात,
करी दुर्जनांचा संहार।
भक्त जनांसी आधार।
ऐसा तो हा चमत्कार। रोकडा चाले॥
मनाच्या श्लोकांतही रामाचे वर्णन करताना स्वामींनी रामाचा अपूर्व प्रताप वर्णन केला आहे-
महासंकटीं सोडिले देव जेणें।
प्रतापें बळे आगळा सर्व गुणें।
जयाते स्मरे शैल्यजा शूळपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥
रामाने दुष्ट राक्षसांना ठार मारले म्हणून तो वंदनीय आहे, पण त्याचे वैयक्तिक चारित्र्य अलौकिक आहे. सत्वगुणांचा वापर कोठे करावा, कुठे रजोगुण वापरावा, याचा उत्तम विवेक रामांनी आयुष्यभर सांभाळला आहे. समर्थ म्हणतात-
सत्वगुणी होणे सात्विका कारणे।
कोपे संहारणे दुर्जनांसी॥
दुर्जनां संहार सज्जना आधार।
भाविकांस पार पाविजे तो॥
म्हणून रामदास म्हणतात,
रघुनायका सारिखा देव नाही।
क्रिया पाहता चोखटी सर्वकाही॥
स्वामींच्या घराण्यात रघुनाथाची व सूर्यनारायणाची उपासना पूर्वापार चालत आलेली होती. त्यामुळे तत्कालीन क्रूर अत्याचारी, अन्यायी मुसलमानी राजवट पाहून सूर्यवंशी कोदंडधारी रामाच्या उपासनेचा वेगळा अर्थ स्वामींना प्रतीत झाला. रामभक्ती मुक्ती देणारा असण्यापेक्षाही त्याने स्वपराक्रमाने रावणाच्या बंदिवासातून देवांना सोडवले. दुष्ट, दुराचारी रावणाचा वध केला म्हणून स्वामींना तो प्रिय आहे. १२ वर्षांची पायी केलेली भारतभ्रमंती अर्थात तीर्थयात्रा करून इ. स. 1644 साली आपल्या नियोजित कार्यासाठी ते कृष्णातीरी आले. तेथे त्यांनी धनुर्धारी राम व हनुमंत याची उपासना सांगणारा संप्रदाय स्थापन करून शिष्य समुदाय वाढवायला सुरुवात केली. रामावताराच्या प्रयोजनाचे विचार त्यांना एकनाथांकडून मिळाले असावेत. एकनाथांनी ‘भावार्थ रामायणा’त रामचरित्राची भूमिका स्पष्ट केली आहे. दुष्ट दुर्जनांच्या नाशासाठी रामाचा जन्म आहे, अशी भूमिका नाथांनी स्वीकारली. नाथ आपल्या भावार्थ रामायणात लिहितात-
निजधर्माचे रक्षण, करादया साधूंचे पाळण।
मारावया दृष्टजन, रघुनंदन अवतरला॥
हे रामजन्माचे प्रयोजन आहे. दुष्ट दुर्जनास नाशासाठी नाथांनी सशस्त्र प्रतिकाराची भाषा वापरली आहे.
देवद्रोही देवकंटक, भूतद्रोही जीव घातक।
धर्मद्रोही दु:खदायक, यांसी अवश्य मारावे॥
हे उद्गार अप्रत्यक्षपणे सोळाव्या शतकातील जुलमी मुसलमानी राजवटीसाठी आहेत, हे सूज्ञाच्या लक्षात येते. ध्वन्यार्थाने का होईना, एकनाथांनी ते लोकांसमोर मांडले. म्लेंच्छसत्तेबद्दल उघडपणे बोलण्याचा काळ अजून आला नव्हता. एकनाथांची सुप्त इच्छा प्रत्यक्षात गायला ४७ वर्षे थांबावे लागले. इसवी सन १५९९ साली नाथ निजधामाला गेले. त्यानंतर ४७ वर्षांनी इसवी सन १६४६ साली शिवरायांनी तोरणा गड जिंकून तेथे हिंदवी स्वराज्याचा ध्वज रोवून आदिलशाही राजवटीला पहिला तडाखा दिला. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. रामदासस्वामी तर उघडपणे बोलू लागले, स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाला स्वामींनी ‘दुष्ट, चांडाळ, घातकी’ अशी भाषा वापरली आहे. औरंगजेबाला ते ‘तुच्छतादर्शक औंरग्या’ असे म्हणतात.
बुडाला औरंग्या पापी। म्लेंच्छ संहार जाहला।
मोडिली मांडिली क्षेत्रे। आनंदवनभुवनी॥
रामकर्ता रामभोक्ता। रामराज्य भूमंडळी।
सर्वस्वे मीच देवाचा। माझा देव कसा म्हणे॥
सर्व पापी लोकांचा नाश होऊन हिंदुस्थान बलशाली झाला, असे स्वप्न स्वामींना पाहिले होते. यादरम्यान इसवी सन १६४४ साली कृष्णातीरी संप्रदाय स्थापन करून स्वामींनी शिष्यगण वाढवला. दुष्टांचा नाश व सज्जनांचे रक्षण करणार्या कोदंडधारी रामाची उपासना सार्वजनिक पातळीवर करायला सुरुवात केली. चाफळला स्वामींनी पहिला सार्वत्रिक रामजन्मोत्सव साजरा केला. उत्सवाच्या वेळी रामरायाकडे केलेली मागणी पाहून त्यांच्या मनातील विचारांची दिशा समजते. समर्थ म्हणतात-
राघवाचा धर्म गाजो। कीर्ती अद्भुत माजो।
ठाई ठाई देवालये। भक्तमंडळी साजो।
शक्ती आहे तोचि फावे। दोनी लोक साधावे।
इहलोक परलोक। शत्रू सर्व रोधावे॥
एकनाथ महाराजांनी सभोवतालच्या राजकीय विषयावर ध्वन्यर्थाने काढलेले ‘भावार्थ रामायणा’तील उद्गार समर्थ रामदासांनी स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली. कोदंडधारी राम व हनुमान यांची उपासना सांगून बलोपासनेवर भर दिला. उपास्य दैवतातील थोडेतरी गुण उपासकात उतरतात, यावर स्वामींचा विश्वास होता. रामदास स्वामींनी स्वाभिमानी, शूर व सहिष्णू रामाचा धीरोदात्त आदर्श आपल्या वाङ्मयातून सांगितला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या कामगिरीला उपयोगी असणार्या त्याग, तपस्या, प्रभुत्व, पराक्रम, स्वामिनिष्ठा, धर्मनिष्ठा इत्यादी अलौकिक गुणांची ओळख स्वामींनी महाराष्ट्र समाजाला करुन दिली. शिवराय स्थापू पाहणारे हिंदवी स्वराज्य रामराज्याला अनुकूल करण्यासाठी स्वामींनी प्रयत्नांची पराकष्ठा केली. त्यासाठी
स्वामींचे रामास मागणे निरपेक्ष होते.
पावन भिक्षा दे रामा। दीनदयाळा दे रामा।
सज्जनसंगती दे रामा। अलिप्तपणा मज दे रामा।
कोमळ वाचा दे रामा। विमळ करणी दे रामा।
हीतकारक दे रामा। जनसुखकारी दे रामा।
रामदासांचे रामराज्याचे ध्येय महंतांद्वारा महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर गेेले होते, हा प्रयोग महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याने यशस्वितेकडे वाटचाल करीत होता. म्हणून ‘महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे’ अशी स्वामींची इच्छा होती. समाजाला चांगल्याची जाणीव करून देऊन त्याला सद्प्रवृत्त दिशेकडे वळवणे हे काम राज्यकर्त्यांचे नसून ते काम विचारवंतांचे असते आणि समर्थांनी हे काम निरपेक्षपणे केले. महाराष्ट्राचे भाग्य थोर की, राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजकारणी, सद्प्रवृत्त, धर्मपुरुष, रामराज्याला अनुकूल व नि:स्पृह असा पुरुष लाभला. पराक्रम आणि प्रतिभेचा सुरेख संगम झाल्याने महाराष्ट्राने वैभवाचे दिवस पाहिले. शिवकालीन प्रवृत्तींशी आणि राजकीय, सामाजिक आकांक्षांशी रामदासस्वामी पूर्णपणे समरस झालेले होते. परंतु, तरीही रामदासांनी राघवाला सोडले नाही. राघवाचे भक्ती, प्रेम त्यांनी कधीही सोडले नाही, एका कवितेत समर्थ सांगतात-
म्हणे रामीरामदास वरि पडो आकाश।
राघवाची कास न सोडी सत्य॥
- सुरेश जाखडी