॥श्रीराम क्षेत्र नाशिक॥

08 Apr 2022 13:25:21

15
 
 
मोक्षपुरी नाशिक चारही युगात प्रसिद्ध आहे. वाल्मिकी रामायणातील उल्लेखाप्रमाणे महर्षी अगस्तीच्या आश्रमातून, महर्षींच्या निर्देशाप्रमाणे भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे दंडकारण्यातील गोदा तटावरील जनस्थान-पंचवटीत आले. राजा दंड व त्यांच्या दंडकारण्याची कथा पुराणांमध्ये वर्णविली आहे. तेव्हा, अशा या श्रीराम क्षेत्र नाशिकचा महिमा वर्णित करणारा हा लेख... 



भगवान श्रीराम पंचवटीला आल्यानंतर येथील गोदावरीचा प्रवाह, निसर्गसौंदर्याने नटलेला रमणीय प्रदेश पाहून मोहित झाले. वाल्मिकी रामायणात असलेले हे सुंदर वर्णन मुळाहून वाचण्यासारखे आहे. गोदातटापासून काही अंतरावर लक्ष्मण यांनी थोडी माती गोळा करून भिंत बनविली व नंतर त्यात सुंदर व बळकट असे खांब रोवून त्यावर बांबू व झाडांच्या पानांनी छप्पर तयार करून पर्णकुटी बांधली.

 पर्णकुटी बांधून झाल्यावर लक्ष्मणांनी गोदावरीच्या तिरी जाऊन स्नान केले व येताना काही फळे व कमलपुष्पे घेऊन ते पर्णशाळेत आले. शास्त्रीय विधीपूर्वक फुले - फळे देवतांना समर्पित करून त्यांनी ती वास्तू शांत केली. नंतर भगवान श्रीराम सीतेसह या आश्रमात, पर्णकुटीत प्रवेश करते झाले. पर्णकुटी पाहून भगवान लक्ष्मणांस दृढ आलिंगन देऊन म्हणाले की, “लक्ष्मणा, तू माझे मन जाणारा, कृतज्ञ आणि धर्माचे ज्ञान असणारा आहेस.” मग श्रीरामांनी सीतेसह या आश्रमात निवास केला. श्रीरामाच्या वनवास काळातील, शूर्पणखेचे नासिका छेदन, १४ हजार राक्षसांसह खर, दूषण आणि त्रिशीर या राक्षसांचा संहार, मारीच यांच्या सहकार्‍याने रावणाने सीतामाईचे अपहरण, या घटना या क्षेत्राशी संबंधित आहे.


खर, दूषण आणि त्रिशीर या तीन राक्षसांचा वध ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण आजही ‘तीवंधा’ म्हणून ओळखले जाते. यासोबत नाशिक ही क्रांतिभूमीसुद्धा आहे. स्वधर्म स्थापनेसाठी अयोध्येचे राजे प्रभू रामचंद्र वनवासकाळात या भूमीत आले. येथेच सीतामाईचे हरण झाले आणि स्वधर्म स्थापनेच्या क्रांतीला निमित्त मिळाले. चोहीकडे म्लेंच्छांचे राज्य. स्वधर्म लोप पावला होता. अशा भीषण परिस्थितीत नारायण सूर्याजीपंत ठोसर नावाचा मुलगा लग्नाच्या बोहल्यावरून ‘सावधान’ एकताच पसार होतो.


तो थेट प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत येऊन १२ वर्षे गायत्रीचे पुरश्चरण व ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तारक मंत्राचा १३ कोटी जप करून स्वधर्म स्थापनेचा शंखनाद करतो तोही याच भूमीवरून! १८९८ मधील पारतंत्र्याचा काळ. १५ वर्षांचा कोवळा विनायक, घरातील अष्टभुजा देवीच्या मूर्तीपुढे ‘शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजीन’ अशी शपथ घेतो आणि पुढे ‘अभिनव भारत’ ही क्रांती संघटना स्थापून, सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करीत बलाढ्य परकीय शक्तीला प्रचंड हादरे देणारे कार्य करतो तेही याच भूमीवरून! श्री काळाराम मंदिर अशी धारणा आहे की, जेथे प्रभू श्रीरामांची पर्णशाळा होती, त्या जागी आजचे श्री काळाराम मंदिर उभे आहे. यादव काळातसुद्धा नाशिकक्षेत्र सुप्रसिद्ध होते.



१२७८च्या सुमारास श्री चक्रधर स्वामी नाशिकला आले असता, त्यांनी श्रीरामनाथांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी तेथे एक पूर्व मुख गुहा व एक उत्तर मुख गुहा होती. त्यांनी गुहेचे दर्शन केल्याचा उल्लेखही सापडतो. पूर्वीचे जुने राम मंदिर बहुदा लाकडी सभामंडप असलेले होते व त्यातील मूर्तीसुद्धा लाकडी असल्याची माहिती मिळते. या लाकडी मंदिर बांधण्याचा कुठलाही उल्लेख-संदर्भ मिळत नाही. परंतु, समर्थांच्या काळातही हेच मंदिर असावे. येथे नित्य कीर्तन होत असे आणि गोपिकाबाई पेशवे कीर्तनात येत असत.



असेच एकदा सरदार रंगराव ओढेकर आले असता, त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय निघाला, तेव्हा आपल्या जवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून भव्य मंदिर बांधण्याचा निर्धार ओढेकरांनी व्यक्त केला आणि त्यांनी हे जीर्ण मंदिर आपल्याजवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून बांधले. त्यावेळी असलेल्या मंदिराची जागा फारच लहान असल्यामुळे सभोवतालच्या लोकांची असलेली घरे, मठ व श्रीमार्तंडाचे लहानसे देवालय घेऊन त्याऐवजी त्यांच्या मालकास मंदिराच्या आसपास घर, मठ आदी बांधून दिली, अशा रीतीने पूर्व-पश्चिम २६६ फूट लांब आणि दक्षिणोत्तर १३८ फूट रुंदीची जागा मोकळी करून तिच्याभोवती चार फूट रुंदीचा मुस्तकीम चिरेबंदी कोट बांधला आणि त्या कोटात आतील बाजूने ११ फूट रुंदीच्या यात्रेकरुंना उतरण्यासाठी धर्मशाळा म्हणजे ओवर्‍या बांधल्या.



मंदिराला कोटाचे भिंतीत पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर असे समोरासमोर चार दरवाजे असून, पूर्वेकडील दरवाजा सर्वात मोठा आहे. त्यास ‘महाद्वार’ असे म्हणतात. मंदिराच्या आवारात नैऋत्य कोपर्‍यावर जेथे पूर्वीचे जीर्ण राम मंदिर व त्यापुढे लहानसा लाकडी सभामंडप होता, तेथे भव्य देवालय बांधण्याचा विधी निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून पाषाणाची श्री गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली. मंदिराच्या वायव्य कोपर्‍यात विहीर खणून बांधली आहे. मुख्य मंदिरासमोर पूर्व-पश्चिम चिरेबंदी दगडी पाटाईचा तीन दालनी साडे ७३ फूट लांब, ३२ फूट रुंद, दहा फूट उंच, ४० खांबी असा प्रशस्त सभामंडप बांधला आहे. या सभामंडपाच्या कडेवर पश्चिमाभिमुख श्री दासमारुतीची मूर्ती उभी आहे. या सभामंडपाचा उपयोग कथा, कीर्तन, पुराण यासाठी होतो. देवळातच दोन नाथपंथीय साधूंच्या संजीवन समाध्या आहेत.


सिंहस्थ काळात नाथपंथी साधूंची झुंडी या काळाराम मंदिरात १५ दिवस निवासासाठी असते. दरवाजाने आत गाभार्‍यात प्रवेश केल्यावर समोर सिंहासन व त्यावर रौप्यमय शेष चिन्हांकित एकास एक लागून तीन प्रभावळ असून त्याखाली भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती विराजमान आहेत. गाभार्‍यावरील घुमट सर्वात उंच असून शंखाकृती आहे. यावरील कळस चार फूट उंचीचा, सहा फूट घेराचा असून तशाच घाटाचा तांब्याचा कळस कोणी गोसाव्याने बसविला होता. त्यावर नाशिक येथील प्रभाकर दिवाकर पंगेवैद्य यांनी कोणी एक मुंबईचा श्रीमंत व्यापारी जलोदर ग्रस्त होता.



त्याचा रोग बरा करून त्यांच्याकरवी सोन्याचा मुलामा देवविला, असे म्हटले जाते. असेही म्हटले जाते की, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कळसाचे काम बाकी असताना रंगराव ओढेकर यांचे जवळील संपत्ती संपत आली असता, अशावेळी त्यांच्या सुविद्य पत्नीने आपली उंची नथ मोडून कळस मढविण्याचे काम पूर्ण केले. शिखरावर हनुमान चिन्हांकित ध्वजा फडकत आहे. या देवालयासाठी लागलेले दगड नाशिकपासून तीन कोसावर असलेल्या रामसेज व बोरगड येथून आणून काम करण्यात आले आहे. या मंदिराची प्राची दिशा वेदशास्त्रसंपन्न यादव शास्त्री कायस्थ या ज्योतिष विद्वानाने इतक्या नेमकेपणाने साधून दिली आहे की, मेष व तुळ या दोन संक्रांतीस म्हणजे भूमध्य रेघेवर सूर्य येणारे दिवशी सूर्योदयाबरोबर सूर्यकिरण श्री मुखावर पडतात.


या देवालयाचे बांधकाम १७७८ मध्ये सुरू होऊन १७९० मध्ये पूर्ण झाले. या मंदिराचे काम एकंदर १२ वर्षे चालून त्या कामी २२ लाख रुपये खर्च लागला. या मंदिरास अनेक गावे इनाम असल्याची माहिती मिळते. मंदिरातील मूर्ती वालुकामय असून प्रभू श्रीरामांचा उजवा हात हृदयाशी आहे व डावा हात खाली सरळ आहे. प्रभू स्वतः निर्देश करीत आहेत की, “जो कोणी मला शरण येईल, त्याला मी हृदयाशी लावीन.” हा राम ‘आत्माराम’ आहे. या रामाची उपासना करुनच समर्थ रामदासांनी स्वधर्माचा शंखनाद केला. १७९० मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रंगराव ओढेकर यांनी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. पानिपतच्या रणसंग्रामात सरदार ओढेकर यांनी आपला देह ठेवला.



परंतु, या मंदिराच्या निमित्ताने त्यांनी आपला कीर्तीध्वज आसूर्य फडकत ठेवला आहे. मंदिरात चैत्र मासात पाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व त्याची सांगता रथोत्सवाने केली जाते. याशिवाय या हरिहर क्षेत्रात खालील वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिरे प्रसिद्ध आहे. काळाराम मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समरसतामार्च १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन पुढे तीन वर्षं चालले. भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे, साहित्यिक शांताबाई दाणी, कुसुमाग्रज अशा स्थानिक मंडळींनी हे आंदोलन चेतवत ठेवले.



अस्पृश्यता ही धर्मामुळे आली आहे, अशी समाजधारणा असल्यामुळे, धर्माचे अधिष्ठान असलेल्या, काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला, तर आपोआपच अस्पृश्यतेचा भाव समाप्त होईल. म्हणजे ज्या हिंदू धर्माच्या हृदयात श्रीरामांना स्थान आहे, ते स्थान अस्पृश्य बांधवांनाही मिळेल आणि हिंदू समाज जातपात विरहित होऊन संघटित व कुठल्याही उच्च-नीचतेची बाधा नसणारा, समतेच्या अधिष्ठानावर उभा असणारा समाज निर्माण होईल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. श्री काळाराम मंदिर (नाशिक), अंबामाता मंदिर (अमरावती), पर्वती मंदिर (पुणे) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मंदिर प्रवेशाची आंदोलने झाली.



स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील भेद रेषा संपविण्याचा मूळ उद्देश या आंदोलनामागे होता. मात्र, तत्कालीन समाजधुरिणांना व धर्ममार्तंडांना डॉ. बाबासाहेबांचे मन आणि विचार कळले नाहीत. स्वा. सावरकर, कुर्तकोटी शंकराचार्य यांचा या मंदिर प्रवेश आंदोलनाला पाठिंबा होता. मात्र, धर्माचा अर्थ न कळलेल्या सवर्णांकडून आंदोलकांवर म्हणजेच अस्पृश्य बांधवांवर दगड-गोट्यांचा वर्षाव झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे आंदोलन स्थगित केले. या घटनेला वर्ष ७५ झाल्यानंतर काळाराम मंदिरातून २००५ साली समरसता यात्रेचा प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या संघदृष्ट्या चारही प्रांतात समरसता यात्रा गेल्या.


नाशिक येथील समरसता यात्रा उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे उपस्थित होते. यावेळी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी या यात्रेप्रसंगी उपस्थित भटके-विमुक्त, अनुसूचित जाती- जमाती, ओबीसी अशा सर्व समाज घटकातील समरसता यात्रेचे कार्यकर्ते यांना मंदिराच्या गाभार्‍यात नेले व त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन केले. यावेळी महंत सुधीर महाराज म्हणाले की, “माझ्या पूर्वजांनी केलेले पाप तुम्हा सार्‍यांच्या उपस्थितीमुळे आज धुवून निघाले आहे.” हा क्षण प्रत्यक्ष अनुभवणार्‍या सर्व बांधवांच्या चेहर्‍यावर डॉ. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न संघ प्रेरणेतून साकार होत असल्याचा आनंद दिसत होता. अहिल्या राम मंदिरआसेतू हिमाचल सहस्रावधी जीर्ण व ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार व निर्माण करणार्‍या धर्म मूर्ती अहिल्याबाई होळकर यांनी नाशिक क्षेत्रीसुद्धा गोदातीरावर घाट व कुंडे निर्माण करून, अहिल्या कुंडासमोरच श्री काशिविश्वेश्वर यांचे भव्य मंदिर उभारले आहे.


मंदिराला लागूनच भव्य अहिल्याराम मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरात भगवान श्रीरामांच्या विग्रहासह प्रातःस्मरणीय अहिल्याबाईंची मूर्तीसुद्धा दर्शनीय आहे. गर्भगृहापुढे पाण्याचे कारंजे आहे. मंदिराच्या प्रारंभी भिंतीवर शिलालेख असून, त्यावर श्रीमंत महाराज होळकर सरकार इंदोर स्टेट श्री अहिल्या राम मंदिर पंचवटी नाशिक हे मंदिर पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतले व श्रींची स्थापना शके १७०८ ज्येष्ठ शुक्ल १२ गुरुवार रोजी केली, असा उल्लेख राजमुद्रेसह आहे. सरदार हिंगणे यांचे गोरेराम मंदिरदिल्ली दरबारात स्वराज्याचे यशस्वी वकील, सरदार महादेवराव हिंगणे हे नाशिकला पेशव्यांचे उपाध्याय होते.



बहुश्रुतता व अवलोकन चातुर्य तसेच, फारसी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या हिंगणे यांनी उत्तरेतील पेशव्यांनी मिळवलेल्या अनेक सरदेशमुख्या, चौथाया यांच्या अनेक भानगडींचा यशस्वी निकाल लावून दिला, असे महादेवराव भट हिंगणे यांनी १७८२ साली नाशिकला गोदावरीच्या तीरावर श्री राम मंदिराची निर्मिती केली. मंदिरात श्रीराम पंचायतन असून गणपती, देवी, शंकर, पार्वती, मारुती आदी मूर्ती आहेत. गोदेच्या काठावर दगडी पायर्‍या चढून गेल्यावर या मंदिराचे दर्शन होते. सरदार श्रीमंत मुठे गोरेराम मंदिरश्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिराजवळच सरदार श्रीमंत मुठे यांचे जवळ जवळ २०० वर्षांपूर्वीचे हे गोरेराम मंदिर आहे. हे मंदिर संपूर्णपणे सागवानी लाकडात बांधलेले असून, पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात भगवान श्रीराम लक्ष्मण सीतेसह भगवान श्रीविष्णूचे (सत्यनारायणाचे) श्री विग्रह आहे.



या मूर्ती पांढर्‍या संगमरवरी असल्याने त्यांना ‘गोरेराम’ असे म्हणतात. मंदिरात चतुर्थाश्रम घेतलेल्या पू. दिनकर गणेश मुठे, पू. गणेश रघुनाथ, मु. पू. भिकाजी मुठे या सत्पुरुषांच्या जागृत समाध्या असून, मंदिराबाहेर श्री मारुती मंदिर व काही सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. मंदिरात वेगवेगळे उत्सव होत असून, लाकडी बांधकामाची देखभाल विषयी अत्यंत काळजी घेतली जाते. बायकांचे रामनाशिक क्षेत्री नाव दरवाजा येथे ‘बायकांचे राम’ असे वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पूर्वी कोणी महिलेने केल्यामुळे ‘बायकांचा राम’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते. मंदिर साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीचे असून या मंदिरातील मूर्ती सज्जनगडावरून पालखीतून आणून येथे स्थापन केल्याचे श्री विनोद वाघमारे यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी स्त्रियांकडून या मंदिराची पूजाअर्चना होत असे. मंदिरात चैत्र पाडव्यापासून नवमीपर्यंत उत्सव व नित्य काकड आरती होत असते.



त्याचप्रमाणे महिलांचे भजन आदी कार्यक्रम होत असतो. कोदंडधारी श्रीरामनाशिकच्या सैनिकी शिक्षण देणार्‍या सुप्रसिद्ध भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात भगवान श्री रामाची कोदंडधारी मूर्ती स्थापित आहे. या मंदिरातील मूर्ती ही रामदंडी (मिलिटरी स्कूलच्या स्थानिक विद्यार्थ्यांनी) वापरलेल्या बंदुकीच्या धातू व गोळ्यापासून बनवलेली आहे. शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनविलेल्या या मूर्तीची स्थापना दि. १० एप्रिल १९८४ रोजी करण्यात आली आहे. याशिवाय अनेक छोटी-मोठी राम मंदिरे नाशिक क्षेत्री आहेत. स्वधर्म व स्वराज्य स्थापनेचा उत्कर्ष काळ उदित झाला असताना येणार्‍या प्रभू रामजन्मोत्सव - अवतरण दिनानिमित्त आत्मारामांच्या चरणी आत्मार्पण!जय श्रीराम!


- देवेंद्रनाथ नटवरलाल पंड्या 


९८२२३९९८५१


Powered By Sangraha 9.0