‘हिटलरशाही’शी संवाद नाही, तर संघर्षच!'

26 Apr 2022 10:50:46
फडणवीस
 
 
मुंबई : “मागील काही दिवसांपासून राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जे काही प्रकार आणि हिंसाचार सुरू आहेत, ते थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याच निर्देशानुसार सुरू आहेत,” असा गंभीर आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. राज्यात शिवसेनेकडून भाजप नेत्यांवर होत असलेले प्राणघातक हल्ले, शिवसेनेकडून हल्लेखोरांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केले जाणारे समर्थन, गृह खात्याची संशयास्पद भूमिका आणि सरकारकडून केले जाणारे दुर्लक्ष या संपूर्ण प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांनी “आता ‘हिटलरशाही’शी संवाद नाही, तर संघर्षच करावा लागेल,” असा इशारा दिला.
 
 
सोमवार, दि. २५ एप्रिल रोजी भाजप प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. नितेश राणे, आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रसाद लाड, भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी, प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
 
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई भाजपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘पोलखोल अभियाना’च्या रथावर हल्ले करण्यात आले. इतकेच काय तर भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना मारहाणही करण्यात आली. अशा प्रकारची हिंसा केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येईल. भोंग्यांच्या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी भलेही बैठक बोलावली असली तरी ज्या बैठकीला राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्रीच उपस्थित नसल्यामुळे त्या बैठकीत न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना गृहमंत्री काय करत आहेत, हा सवाल आहे. या प्रकारांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने गृहमंत्र्यांना काही अधिकार आहेत का? असा सवाल उपस्थित होतो आहे. त्यामुळे मुंबईत सुरु असलेले हे प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या इशार्‍यावरच सुरु आहेत,” असा आरोप फडणवीसांनी केला.

 
हनुमान चालीसावरुन सरकारला खडेबोल
 
 
“कुणी हनुमान चालीसाचे पठण करणे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. राणा दाम्पत्याला विरोध कशासाठी? हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात हनुमान चालीसाला इतका विरोध का? त्यातून हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? असा सवाल उपस्थित होतो. एखाद्या व्यक्तीने हनुमान चालिसाचा पाठ करणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो? आणि जर तो राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालीसा म्हणू आणि त्यावर सरकारला हरकत असेल, तर सरकारने खुशाल आमच्यावर राजद्रोहाचे खटले चालवावेत,” असे खडे बोल फडणवीसांनी हनुमान चालीसा प्रकरणावरून राज्य सरकारला सुनावले.
 
 
शरद पवारांना टोला
  
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सत्तेत परत न आलेले लोक आता अस्वस्थ आहेत, असे म्हणत फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. पवारांच्या या विधानाला खोचक टोला लगावत फडणवीसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “काँग्रेसमध्ये असूनही वारंवार काँग्रेसची सरकारे पाडणारे, वारंवार काँग्रेसलाच सोडचिठ्ठी देणारे आणि पुन्हा त्याच काँग्रेसला सत्तेसाठी वारंवार साथ देणारे नेमके कशामुळे अस्वस्थ होते,” अशा शब्दांत फडणवीसांनी पवारांना टोला लगावला.
 
Powered By Sangraha 9.0