साथीचे आजार - कांजण्या

    26-Apr-2022
Total Views | 231

chicken pox
 
 
कांजण्या हा ‘वेरीसेला झोस्टर’ या ‘व्हायरस’मुळे होणारा आजार आहे. याची साथ साधारण जानेवारी ते एप्रिल महिन्यांदरम्यान असते. रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कातून किंवा हवेतील ‘ड्रॉपलेट’मुळे या आजाराचा प्रसार होतो. ‘व्हायरस’ने शरीरात प्रवेश केल्यावर १४ ते १६ दिवसांत (इन्क्युबेशन पीरिएड) या रोगाची लक्षणे दिसू लागतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. शाळेत वर्गातील एका मुलाला जरी लागण झाली तरी ती साथ वर्गभर पसरण्याची शक्यता असते. सुदैवाने या आजाराची लागण आयुष्यात एकदाच होत असल्यामुळे एकदा कांजण्या येऊन गेल्या असल्यास कांजण्यापुन्हा होण्याची शक्यता फार कमी असते. त्याविषयी सविस्तर...
 
 
 
लक्षणे
 
अंगावर पुरळ दिसण्याआधी एक दिवस आधी बारीक ताप येणे, अंग दुखणे, डोके दुखणे, घसा खवखवणे इत्यादी लक्षणे दिसतात. त्यानंतर पुरळ उठण्यास सुरुवात होते. हे पुरळ प्रथम पाठीवर उठते, मग पोटावर, चेहर्‍यावर आणि हाता-पायांवर पसरते. हे पुरळ सुरुवातीस लालसर असते. काही तासांतच ते फोडांसारखे दिसू लागते. त्यानंतर काही तासांनी या फोडांमध्ये पाणी भरते व ते मोत्याच्या दाण्यांप्रमाणे दिसतात. या फोडांना धक्का लागल्यास किंवा हात लागल्यास त्या पटकन फुटतात. पुढील तीन-चार दिवस पुरळ येत राहाते व नंतर या हे फोड सुकू लागतात. फोड सुकल्यावर तयार झालेले व्रण हे काही आठवड्यांनी जातात. यातील काही फोड पिकतात व त्यात पू निर्माण होतो.
 
 
कांजण्यांची इतर लक्षणे
 
 संपूर्ण अंगाला खाज येणे. हे पुरळ सर्व अंगावर उठते अगदी डोळ्यावर, तोंडामध्ये जीभेवर देखील उठते. त्यामुळे डोळे लाल होणे, गिळताना त्रास होणे, लघवीला त्रास होणे इत्यादी लक्षणे आढळतात. मानेच्या मागे गाठी तयार होतात. ताप येत जात राहातो. पहिल्या चार दिवसांत जेव्हा जेव्हा नवीन पुरळ उठते तेव्हा तेव्हा ताप येतो. हा ताप काही वेळा डोक्यात जाऊन आकडी येण्याची शक्यता असते.
 
 
 
कांजण्याच्या आजारातील गुंतागुंत
 
फोड पिकणे व त्यातून पू येणे, न्युमोनिया, ‘एनसेफेलायटिस’ आणि ‘थ्रॉम्बोसायटोपेनिया’. गरोदरपणात मातेस कांजण्या आल्यास त्याचा गर्भावर परिणाम होऊन जन्मणारे मुल काही व्यंगांसह जन्माला येते.
 
 
 
उपचार
  
या आजाराचे अचूक व लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे. याच प्रकारचे पुरळ नागीण, खरुज, इन्सेक्ट बाईट अ‍ॅलर्जी, इंपेटिगो यात दिसते. कांजण्यांचे निदान झाल्यावर सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे विश्रांती.
 
 
विश्रांती
शाळेत जाणार्‍या मुलात कांजण्या दिसू लागल्यास त्यास शाळेत पाठवू नये. पुरळ सुकल्यानंतर शाळेत पाठवावे. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो व आजारदेखील पसरत नाही. मोठ्यांच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू होते. त्यांनीदेखील कामावर न जाता भरपूर विश्रांती घेणे. आजाराच्या गुंतागुंतीचे प्रमाण हे मुलांपेक्षा प्रौढांमध्ये जास्त आढळते. मुलांच्या प्रभागामध्ये काम करणार्‍या परिचारिकेला कांजण्या झाल्या, पुढे त्यात गुंतागुंत होऊन तिचा मृत्यू ओढावला. अशा घटना दुर्मीळ असल्या तरी सर्वांनी काळजी घेणे जरुरी आहे.
 
 
तापासाठी पॅरासिटामॉल (क्रोसीन) सिरप किंवा गोळी दिली जाते.अंगाला खाज येत असेल, तर गुलाबी रंगाचे कॅलामिन लोशन लावले जाते.अंगाववील फोड पिकले असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविक (अ‍ॅन्टीबायोटिक) औषध घ्यावे.संपूर्ण आजारात रुग्णाचा आहार समतोल असावा. जेवण कमी तिखट, कमी तेलकट असावे. शक्य असल्यास मांसाहार टाळावा. आहारात फळे, फळांचा रस यांचा समावेश असावा. तोंडाच्या आतून फोड्या आलेल्या असल्यास मऊ खिचडी, पेज असा आहार घ्यावा.रुग्ण साधारणत: आठवडाभरात संपूर्ण बरा होतो, तरीदेखील पुढचे काही दिवस जंतू संसर्ग होण्याचा धोका असतो.
 
 
कांजण्या झाल्यावर डॉक्टरकडे जावे की न जावे?
 
६० वर्षांपूर्वी मला कांजण्या झाल्या होत्या. त्या वेळेस हा आजार म्हणजे ‘मरीआईचा कोप’ समजले जायचे व डॉक्टरकडे नेणे टाळले जायचे. आईनेदेखील तसेच केले. सर्व अंगावर जास्त प्रमाणात पुरळ उठले होते. व्यवस्थित उचलून ठेवण्यासाठी शरीरावर कुठेच जागा शिल्लक नव्हती. फोडांवरती माश्या घोंघावत होत्या. चाळीतील अंधार्‍या घरात पंखा देखील नव्हता. माझ्या अंगावर पातळ चादर टाकून ती माऊली पुठ्ठ्याने हवा घालून माश्यांना हाकलत होती. मला ताप भरपूर होता, ग्लानी वाढत जाऊन जवळ जवळ बेशुद्ध झालो होतो. शेजार्‍यांनी मला रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. त्या काळात मुलुंडमध्ये महापालिकेचे एकमेव हॉस्पिटल होते. खासगी हॉस्पिटल्स न परवडणारी होती. आई मला हॉस्पिटलला घेऊन जाण्यास घाबरत होती. तीने देवाचा धावा चालू ठेवला. दोन दिवस ती माझ्या जवळच बसून होती. दोन दिवसांनी मला हळूहळू शुद्ध आली. आईचा दृढ विश्वास होता की, ’आंधळ्याच्या गाई देव राखतो.’ जवळ पैसे नसताना कसले पाठबळ नसताना तिच्या देवावरच्या विश्वासाने मी बरा झालो.
 
हे उदाहरण ६० वर्षांपूर्वीचे आहे. आज मला कुणी विचारले की, कांजण्याच्या रुग्णावर उपचार करायचे की नाही? त्याला डॉक्टरकडे न्यायचे की नाही? तर माझे उत्तर असेल अवश्य घेऊन जाणे. डॉक्टरकडे जाण्याने कांजण्याचे निदान पक्के होईल. ताप येणे, अंगाला खाज येणे, सौम्य गुंतागुंत यासाठी औषध घेता येते. गुंतागुंत वाढली, तर डॉक्टरच्या सल्ल्याने रुग्णालयात भरती करता येते. काही डॉक्टर उपचारासाठी ’एसायक्लोवीर’ या ‘अ‍ॅन्टीव्हायरस’ औषधाचा उपयोग करतात.
 
 
 
प्रतिबंधात्मक उपाय
 
आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ असतो. हे आधुनिक वैद्यकशास्त्राचे तत्त्व आहे. १८व्या शतकात देवीच्या आजाराने थैमान मांडले होते. जगभर हजारो माणसे मृत्युमुखी पडत होती. लसीकरणाचे जनक एडवर्ड जेन्नर यांनी १७९६ साली देवीच्या लसीचा शोध लावला. ही लस एवढी प्रभावी ठरली की, आज जगभरातून देवीचे (स्मॉल पॉक्स) निर्मूलन झाले आहे. १९७२ पासून जगभरात एकही नवीन केसची नोंदणी झाली नाही. म्युनिसिपालटीच्या प्राथमिक शाळेत असताना तेथे देवीची लस घेतल्याचे आठवते. छोट्या स्पिरीट लॅम्पवर स्कालपेलचे टोक तापविले जायचे. त्यावर देवीच्या लसीचा थेंब ठेऊन हाताच्या पुढच्या भागावर हळूच खरचटले जायचे. ६० च्या वरच्या नागरिकांचा दंडावर दोन मोठे व्रण दिसतात ते देवीच्या लसीचे आहेत. ‘बी.सी.जी.’ लस (क्षय रोग) देखील प्राथमिक शाळेत घेतल्याचे आठवते. ४० वर्षांपूर्वी वाडिया हॉस्पिटलमध्ये, प्रसूती झालेल्या सर्व मातांना ‘पोस्ट नेटल क्लिनिक’मध्ये बोलावून त्यांची तपासणी केली जायची व त्याचप्रमाणे दीड महिन्यांवरील त्यांच्या बालकांना त्रिगुणी (धनुर्वात, डांग्या खोकला, डिफ्तेरिया) आणि पोलिओची लस दिली जायची. पुढे ‘हिपॅटायटिस बी’ गोवर, गालगुंड, जर्मन मिझलसाठी लसी उपलब्ध झाल्या. सुमारे २० वर्षांपूर्वी ‘हिपॅटायटिस ए’ आणि काजण्यांची लस भारतात उपलब्ध झाली. गेल्या दोन दशकात गोवर, कांजण्या, गालगुंड, जर्मन मिझल, ‘हिपॅटायटिस ए’ आणि ‘बी’यांचे प्रमाण कमी कमी होताना दिसते. या आजारांमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाणदेखील कमी होत चालले आहे. पोलिओ हा आजार निर्मूलनाच्या उंबरठ्यावर आहे, असे जरी असले तरी लसीकरणाबद्दलचे लोकशिक्षण म्हणावे तसे होत नाही.
 
लसीकरणासंबंधीची माहिती शहरी मातांप्रमाणे ग्रामीण भागातील मातांनाही व्हावी. त्यासाठी त्यांना समजेल असे साहित्य, पोस्टर्स त्यांची निर्मिती झाली पाहिजे. आज ‘पंचगुणी लस’ (धर्नुवात, डिफ्तेरीया, डांग्या खोकला, ‘हिपॅटायटिस बी’ आणि ’एच इम्फ्लुएन्झे न्युमोनिया’), पोलिओ ‘बी.सी.जी’ या लसी सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. गावातील प्रत्येक मुलांपर्यंत हे मोफत लसीकरण पोहोचले पाहिजे. प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना मुलाचे प्राथमिक लसीकरण झाले आहे की नाही, हे प्रामुख्याने पाहावे. ते जर झालेले नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते पूर्ण करावे.
 
 
 
 
शहरी भागात बालरोगतज्ज्ञ व फॅमिली डॉक्टरतर्फे लसीकरण काही प्रमाणात केले जाते. यामध्ये ‘न्युमोकोकल’, ‘हिपॅटायटिस ए’, कांजण्या, ‘मेनिंगोकोकल’ आणि ‘सर्वायकल कॅन्सर व्हॅक्सिन’ यांचा समावेश असतो. या सर्व लसी महागड्या आहेत व त्या सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध नाहीत. ज्या पालकांना या लसी परवडत नाही, त्यांना या लसी ‘एनजीओ’ व ‘सीएसआर’ मार्फत दिल्या जाव्या. तसेच या महागड्या लसींचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागातदेखील झाला पाहिजे, तरच साथीच्या आजाराचे देश पातळीवर निर्मूलन शक्य आहे.
 
  
आपले मुल तेव्हाच सुरक्षित आहे, जेव्हा आपल्या शेजारच्या मुलाचे लसीकरण झालेले असेल.आता वळूया कांजण्याच्या लसीकडे. कांजण्याच्या लसींचा शोध १८८० मध्ये लुई पाश्चर यांनी लावला. ही लस बाळ एक वर्षांचा झाल्यावर दिली जाते. ‘बूस्टर’ डोस पाचव्या वर्षी दिला जातो. ही लस एवढी प्रभावी आहे की, यामुळे मिळणारे संरक्षण जवळ जवळ आयुष्यभर पुरते. शहरी आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलांनी या लसीचा लाभ घ्यावा.
 
 - डॉ. मिलिंद शेजवळ
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121