
दिल्ली दंगलीचा सत्यशोधन अहवाल प्रकाशित
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये घडविण्यात आलेली दंगल ही कट्टरतावाद्यांनी भारतीय राज्यघटनेवर केलेला हल्ला आहे. दिल्लीमध्ये बेकायदेशीर बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांमुळे जागोजागी टाईमबॉम्ब पेरले गेले आहेत. त्यामुळे या कट्टरतावादाविरोधात लढावेच लागेल, असे प्रतिपादन अॅडव्होकेट मोनिका अरोरा यांनी सोमवारी केले.
दिल्लीस्थित ‘ग्रुप ऑफ इंटेलेक्चुअल्स अँड अॅकेडेमिशियन्स’तर्फे जहांगीपुरी दंगलीविषय़ी सत्यशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी ‘ग्रुप ऑफ इंटेलेक्चुअल्स अँड अॅकेडेमिशियन्स’च्या संयोजन अॅडव्होकेट मोनिका अरोरा म्हणाल्या, दिल्लीमध्ये हनुमान जयंतीदिनी घडविण्यात आलेली दंगल, त्याचवेळी देशभरात झालेल्या दंगली आणि दिल्लीमध्येच २०२० साली घडविण्यात आलेली दंगल यांचा एकसमान पॅटर्न तयार झाला आहे. हिंदूबहुल भागांमध्ये जाणीवपूर्वक बेकायदेशीर वस्त्या वसविणे आणि तेथे बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना आश्रय दिला जातो. दिल्लीमध्ये झालेल्या दोन्ही दंगलींमध्ये अशाच ठिकाणांहून हिंसाचारास प्रारंभ झाला असल्याचे अरोरा यांनी सांगितले.
जहांगीरपुरीमध्ये झालेला हल्ला हा भारतीय राज्यघटनेवरील हल्ला असल्याचे अरोरा यांनी यावेळी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या, अवघ्या १४ – १५ वर्षांच्या विशिष्ट धर्माच्या मुलींच्या “आमच्या रमजानच्या पवित्र महिन्यात ते हनुमान जयंती कशी साजरी करू शकतात”, असा प्रश्न विचारण्यातून धार्मिक कट्टरतावाद किती खोलवर रुजला असल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे आता महिला आणि लहान मुलांना पुढे करून हिंदू समुदायावर हल्ले केले जात असल्याचेही अरोरा यांनी यावेळी नमूद केले.
सत्यशोधन समितीच्या शिफारशी
• परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांना हद्दपार करावे.
• परिसरातील बेकायदेशीर व्यवसाय, बांधकामे याविरोधात कारवाई करणे.
• परिसरात कट्टरतावादाविरोधात विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा.
• दंगल पूर्वनियोजित असल्याचे आढळून आल्याने स्थानिक मुस्लिमांचा सहभाग आणि जमात ए इस्लामी संघटनेविषयी कारवाई करावी.
• बांगलादेशी व रोहिंग्यांनी बेकायदेशीरपणे नागरिकत्व मिळविले असल्याचा त्याचा तपास व्हावा.
• परिसरातील अवैध गोष्टींकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष.
• अचानकपणे दगड आणि सोडावॉटरच्या बाटल्या जमा होण्याची चौकशी व्हावी.
• सरकारी मालकीच्या जमिनीवरील धार्मिक बांधकामे तातडीने काढून टाकण्यात यावीत.
• हिंदूंमध्ये भयाचे वातावरण असल्याने तक्रार करण्यास ते घाबरत आहेत. त्याविषय़ी योग्य ती कार्यवाही करावी.