संघनिर्माते डॉ. केशव बळीराम हेडगेवार : एक युगपुरुष

    02-Apr-2022
Total Views | 292

Dr. Keshav Baliram Hedgewar
 
 
 
डॉ. हेडगेवारांची जयंती साजरी करत असताना त्यांचे असंख्य पैलू आज समोर येतात. त्यांची वाणी, चरित्र आणि कार्य याला परिसाएवढे सामर्थ्य होते. त्यांनी ज्यांना हाक मारली, साद घातली तो त्यांचाच होऊन गेला. त्यांनी ज्याच्या खांद्यावर हात ठेवला तो त्यांच्या बरोबर चालू लागला. त्यांच्या दर्शनाने, श्रवणाने लोक राष्ट्रभक्त बनत असत. त्यांच्या श्वासातून हिंदुत्व प्रकट होत असे. आपले ५१ वर्षांचे आयुष्य भारतमातेच्या चरणी त्यांनी समर्पण केले. त्यांच्या समर्पित जीवनावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशाल संघटन उभे आहे. ते आधुनिक भारताचे राष्ट्र निर्माते आहेत.
 
 
 
स्वातंत्र्यपूर्व प्राप्तीच्या काळात भारतीय राजकारणात हिंदू-मुसलमान ऐक्याचे नगारे वाजत असताना एका काँग्रेस नेत्याने, “होय मी म्हणतो, भारत हे हिंदूराष्ट्र आहे,” असे जाहीरपणे ठासून सांगणे तसे धाडसाचे होते आणि ते सांगण्याचे धाडस एका टिळकभक्ताने केले होते. ते टिळकभक्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्माते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. डॉक्टर टिळकांच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले होते. लोकमान्यांच्या हिंदुत्वाच्या विचारातून डॉ. हेडगेवारांचा हिंदुत्वाच्या दिशेने वैचारिक प्रवास सुरू झाला होता. दि. ३१ जुलै, १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि टिळकयुगाचा अस्त होऊन गांधीयुग सुरू झाले. असहकार आंदोलन ऐन भरात होते. स्वराज्य स्वातंत्र्यासाठीच्या इंग्रज सरकारच्या विरोधातील या काँग्रेसच्या आंदोलनात डॉ.हेडगेवारांच्या जहाल आणि प्रभावी भाषणांनी गारुड केले होते. लोकमान्य टिळकांच्या नंतर काँग्रेसला हिंदुत्वाच्या दिशेने नेणारा नेता डॉ. हेडगेवारांच्या रुपाने काँग्रेसला मिळाला होता. स्वातंत्र्यलढ्यात असहकार आंदोलनाने डॉ. हेडगेवारांनी काँग्रेसच्या सभांमधून इंग्रजांच्या विरोधात रान उठवले. हिंदू-मुसलमान ऐक्यात प्रत्यक्ष मुसलमानांना चुचकारण्याचे गांधीदींचे धोरण डॉक्टरांना काहीसे खटकत होते. एकदा भेटीअंती हेडगेवारांनी महात्मा गांधींना विचारण्याचे धाडस केले, त्यावर गांधीजी हेडगेवारांचे समाधान करू शकले नाहीत.
 
 
 
डॉ. हेडगेवार इंग्रज सरकारवर तोफा डागत होते. त्यांच्या जहाल भाषणामुळे सरकारने त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला. या खटल्यात त्यांना एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊन त्यांची नागपूर कारागृहात रवानगी झाली. ’भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘डॉ.हेडगेवारांचा विजय असो’ या घोषणेने डॉक्टरांना निरोप देण्यात आला. दि. १९ ऑगस्ट, १९२१ ते १२ जुलै,१९२२ अशी शिक्षा भोगून डॉक्टर कारागृहाच्या बाहेर आले. कारागृहाच्या बाहेर डॉक्टरांचे उत्स्फूर्तपणे स्वागत झाले. स्वागत सभेच्या भाषणातून पुन्हा इंग्रजांच्या विरोधात तोफगोळे फोडण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली. त्यांच्या जहाल भाषणाने इंग्रज सरकार जेरीस आले. काँग्रेस पक्ष गांधींच्या दावणीला बांधला गेला होता. असहकार आंदोलनाची धग संपली होती. मलबारातील मोपल्यांचे बंड झाले होते. या बंडाने असंख्य हिंदू नाहक बळी गेले होते. मोपल्यांच्या बंडानंतर मुसलमानांना चुचकारण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबले होते. काँग्रेस टिळक गट आणि गांधी गट अशा दोन गटात विभागली गेली होती. गांधींच्या वाढत्या प्रभावाने डॉ. हेडगेवार काहीसे चिंतीत झाले. त्यांचे मन काहीतरी नवीन शोधण्यात मग्न होते. टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला आणि शिवजयंतीला आता सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले होते. अशा कार्यक्रमाला डॉक्टर आवर्जून हजेरी लावत असत. त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील भाषणांना हिंदुत्वाची धार लाभली होती. ती जहाल होत होती. यानिमित्ताने नागपूरकरांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे डॉ.हेडगेवारांची विचारसरणी हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाली होती. राजकारणापासून काहीशी वेगळी अशी संघटना संस्था काढून नवीन पिढी हिंदुत्वातून संस्कारित करावी, असा त्यांचा विचार होता. “हिंदुस्थानातला हिंदू समाज जागृत झाला, तर स्वातंत्र्य आमच्यापासून दूर नाही. हिंदुस्थानाला स्वातंत्र्य हवे असेल, तर ते हिंदुत्वाच्या विचाराने” हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला होता.
 
 
 
हिंदू-मुसलमान ऐक्याच्या घोषणा हवेतच विरुन गेल्या. ठिकठिकाणी हिंदू-मुसलमान दंगली सुरू झाल्या. खिलाफत चळवळीने मुसलमान जागृत झाले. उघडपणे राजरोजपणे गोहत्या होऊ लागल्या. गणेशोत्सवाच्या सर्वच मिरवणुकांवर बंदी आली. हिंदू-मुसलमान कुरबुरीने नागपूरचे वातावरण गढूळ झाले. हिंदुत्ववादी नेते काहीसे सावध झाले होते. डॉक्टरांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू समाज खडबडून जागा झाला. निषेधाच्या सभा होऊ लागल्या. सरकार फर्मान काढून दंगली विझविण्याचे प्रयत्न करत होते. हिंदुत्ववादी मंडळी विशेषत: डॉ.हेडगेवार या घटनेने अस्वस्थ झाले होते. एक दिवस डॉ. हेडगेवारांनी शंख फुंकलाच, ते एका सभेत कडाडले, “अरे काय चाललंय? या हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंनी हक्क उपभोगायचे नाही तर कुठे उपभोगायचे? हिंदुस्थान ही हिंदूंची मातृभूमी आहे. हिंदू धर्म म्हणजे केवळ गणेशोत्वाच्या मिरवणुका किंवा काकड आरतीच्या दिंड्या काढण्यापुरता मर्यादित नाही. हिंदू धर्म अनादी आहे, अनंत आहे, हे लक्षात घ्या. आता हिंदू जागृत झाले आहेत आणि ते आता मार खाणार नाहीत,” या डॉक्टरांच्या घणाघाती भाषणाने सभेचे वातावरण बदलून गेले. याच सभेत हिंदूंच्या रक्षणार्थ ‘हिंदू सभा’ स्थापन झाली. डॉक्टरांच्या प्रयत्नाने हिंदू एकजुटीची अभेद्य शक्ती उभी राहिली. रत्नागिरीच्या कारागृहातून ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ बाहेर आला आणि तो ग्रंथ सावरकरांच्या हाती लागला. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाच्या पारायणाने डॉ. हेडगेवार अत्यंत प्रभावित झाले. योगायोग असा की, डॉक्टरांच्या मनातील हिंदुत्वाच्या आणि हिंदू राष्ट्रीयत्वाच्या कल्पना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाच्या लेखणीतून मुक्तपणे प्रकट झाला होता, हा ईश्वरी दैवी संकेत असावा, असे डॉ. हेडगेवारांचे ठाम मत झाले. असामान्य अशा मंथनातून एक अमृतकुंभ डॉक्टरांच्या हाती लागला आणि तो म्हणजे ‘हिंदू राष्ट्रवाद.’
 
 
 
‘हिंदू राष्ट्रवादा’चा अमृतकुंभ हाती घेऊन डॉ. हेडगेवारांनी १९२५ चे स्वागत केले. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व’ हा विचार घेऊन डॉ. हेडगेवार १९२५ सालाला सामोरे गेले. १९२५ साल हे भारताच्या उज्ज्वल इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. १९२५ साली दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. संघनिर्माते डॉ. हेडगेवारांनी हिंदुत्वाच्या विचाराची सुवर्ण पाने नागपूरकरांना मुक्तहस्ते वाटप करत संघाच्या मुहूर्ताचा नारळ भारतमातेच्या पूजनाने वाढवला. डॉ.केशव बळीराम हेडगेवार ‘संघनिर्माते’ म्हणून हिंदुस्थानाला सुपरिचित झाले. हिंदूराष्ट्राच्या पूर्ण स्थापनेसाठी डॉक्टरांच्या मनातील आकांक्षा आणि त्या आकांक्षाना साकारण्यासाठी केलेले ऋषितुल्य समर्पित जीवन हे संघाच्या राष्ट्र उभारणीसाठी बलस्थान होते. संघटन हे राष्ट्रीय संकल्पनेतून उभारले गेले पाहिजे, यावर डॉक्टर ठाम होते. धर्म, संस्कृती देश, भाषा, इतिहास अशा साधर्म्यातून आपण सर्व एक आहोत, अशी आत्मीयता जिव्हाळा हृदयात उंचबळून येतो. ती राष्ट्राला अधिष्ठानमत असतो, हे डॉक्टर ओळखून होते. हिंदू समाजाची ससेहोलपट आता थांबली पाहिजे आणि त्यासाठी हिंदू संघटित झाले पाहिजेत, यासाठी संघकार्य सुरु झाले. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हे आरोग्यदायी औषध हिंदू समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केला. नागपूरच्या पडक्या वाड्यात संघाची पहिली दैनंदिन शाखा सुरू झाली. भगव्या ध्वजाला गुरुस्थानी संबोधून ‘नमो धर्मभूमी जियेच्याच कामी पडो देह माझा सर्वदा’ या प्रार्थनेचे स्वर कानात घुमू लागले. संघ शाखेवर फडफडणारा भगवा ध्वज हा नागपूरकरांचा कौतुकाचा विषय घराघरातून चर्चेला जाऊ लागला. डॉक्टर संघ शाखेवर नित्यनियमाने हजर असत. भगव्या ध्वजात गौरवित होणारी संघशाखा म्हणजे तरुणांना हिंदुत्वातून राष्ट्रीयतेचे शिक्षण देणारी पाठशाळा होती आणि या पाठशाळेचे लोकशिक्षक होते डॉ. हेडगेवार. या पाठशाळेत उद्याचे हिंदुत्वनिष्ठ वीरव्रतधारी तरुणाई उभी राहण्याचे स्वप्न डॉ. हेडगेवार हे पाहत होते. संघशाखेला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. या प्रतिसादाने डॉ. हेडगेवार हे आनंदित झाले.
 
 
 
पुढे संघकार्यासाठी आर्थिक चणचण भासू लागली. कोणाकडून देणग्या घ्याव्यात आणि त्या पैशावर संघाचे कार्य उभे राहावे, हे डॉक्टरांना रुचत नव्हते. १९२८ साली व्यास पौर्णिमेला पहिला गुरुपूजनाचा आणि गुरुदक्षिणेचा कार्यक्रम संपन्न झाला. भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवून ध्वजाला प्रणाम करुन तबकात फुले वाहून गुरुपूजन करुन गुरुदक्षिणा समर्पण करण्यात आली. संघात गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू झाला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम झाला. डॉक्टर हेडगेवारांचे उत्सवात बौद्धिक झाले. ते म्हणाले, “भगवा ध्वज अनंतकाळापासून चालत आला आहे. तो राम-रावण युद्धात फडकला होता. श्रीकृष्णाच्या रथावरही तो तेजाने फडकत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या ईश्वरी कार्यासाठी भगवा ध्वज हाती घेतला. भगवा ध्वज हा देशभक्ती, शुद्धशील चारित्र्य, त्याग, पवित्रता, पराक्रम, सफलता, समर्पण भावना, तेज यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे. चैतन्यदायी आहे, तो अनादी आहे, अनंत आहे, निरंतर आहे. या भगव्या ध्वजावर श्रद्धा ठेवून आपण आपला गुरु मानूया. कारण, व्यक्ती आज आहे, उद्या ती नसणार आहे. भगवा ध्वज मात्र चिरंतन आहे, अमर आहे.” दि. २३ ऑक्टोबर, १९२८ विजयादशमीला संघाचे पहिले पथसंचलन पार पडले. सुमारे ६०० गणवेशधारी स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते. खाकी अर्धी विजार आणि खाकी शर्ट, डोक्यावर गुंड्याची टोपी असा स्वयंसेवकाचा गणवेश होता. काही संघप्रेमी नागरिकही सहभागी झाले होते. संघाच्या घोषाच्या (बॅण्ड) तालावर नागपूरच्या प्रमुख रस्त्यावरुन संचलन जात असताना नागरिकांनी दुतर्फा उभे राहून स्वागत करत पुष्पवृष्टी केली. संचलनाच्या विसर्जनानंतर शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला. संघांच्या संचलनात घोषपथक असावे, असे डॉक्टरांनी मनावर घेतले. त्यासाठी आवश्यक त्या साधनांची जुळवाजुळव सुरु केली. पैशांची जमवाजमव करुन घोषपथकासाठी काही वाद्ये विकत घेतली. काही तरुणांची निवड करुन त्यांना एका भारतीय ख्रिश्चन वादनपटूंकडून बॅण्डचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. यासाठी त्यांना बोस, गोविंदराव देशमुख यांनी प्रयत्न केले. डॉक्टरांना भारतीय संगीत असणारा घोष असावा, अशी त्यांची आवड होती. पुढे चांगले घोषपथक उभे करण्यात डॉक्टर यशस्वी झाले. १९२८ मध्ये त्यांची नागपूरला लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाचे डॉक्टरांना निमंत्रण दिले गेले नाही. हे डॉक्टरांना खटकले. लोकमान्य टिळक हे डॉक्टरांचे प्रेरक राष्ट्रपुरुष होते. दि. २७ ऑक्टोबर, १९२८ रोजी एक हजार स्वयंसेवकांचे घोषपथकांसह संपूर्ण गणवेशात संचलनाने लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. या संचलनात डॉक्टर संपूर्ण गणवेशात उपस्थित होते. त्याचे समारोपाचे भाषण झाले. मानवंदनाच्या कार्यक्रमाने संघकार्याची भव्यता अन् शासन नागपूरकरांच्या नजरेत भरली. घोषाच्या तालावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भव्य-दिव्य वाटचाल हिंदू राष्ट्रवादाच्या दिशेने सुरू झाली.
 
 
 
१९३८च्या दरम्यान संघरचनेत प्रचारकांच्या नियुक्तीला प्रारंभ झाला. प्रचारक व्यवस्था संघांतील नव्हे, तर सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील अपूर्व अशी घटना म्हणावी लागेल. प्रशिक्षित स्वयंसेवकांची एक मोठी फळी संघाच्या प्रचारासाठी बाहेर पडली. डॉक्टरांनी त्यांना शुभेच्छांसह निरोप दिला. भाऊराव देवरस, उत्तर प्रदेशात मधुकरराव भागवत, महाराष्ट्रात पुणे येथे जाऊन पुढे गुजरातला गेले. कृष्णा जोशी सियालकोटला, दिगंबर पातुरकर लाहोरला, मोरेश्वर मुंजे रावळपिंडीला, दत्तोपंत ठेंगडी केरळला, यादवराव जोशी गायकीचा अभ्यास सोडून कर्नाटकात गेले. शिवरामपंत जोगळेकर तामिळनाडूला गेले. १९३८ मध्ये एकनाथजी रानडे ‘एमए’ झाले आणि मध्य प्रदेशात जबलपूरला गेले. १९३९ मध्ये सुमारास बाळासाहेब देवरस, विठ्ठलराव पत्की बंगालमध्ये कोलकात्याला गेले. वसंतराव ओक दिल्लीत गेले. बापुराव दिवाकर, नरहरी पारखी, मुकुंदराव मुंजे बिहारमध्ये, नारायणरावस ताटे ग्वाल्हेरला, दादाराव परमार्थ महाराष्ट्रात पुणे येथे, गोपाळ यरकुंटवार महाराष्ट्रात सांगलीला, रामभाऊ जामगडे हे यवतमाळला, बाबासाहेब आपटे खानदेशात, माधवराव मुळे कोकण प्रांतात हे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रचारक म्हणून भारतभर संघकार्यासाठी बाहेर पडले. संघकार्य मोठ्या जोमाने वाढत होते. संघाच्या नेतृत्वासंबंधीच्या निश्चित कल्पना साकार होणे क्रमप्राप्त होते. त्यादृष्टीने एक बैठक डोकेमठ नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. संघचालक व काही प्रमुख स्वयंसेवक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत चर्चा होऊन संघटनेचे स्वरुप हे ‘एकचालकानेतृत्व’ ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. दोनदिवसीय बैठकीत दुसर्‍या दिवशी संघस्थानावर संघचालक आणि स्वयंसेवक उभे होते. डॉ. हेडगेवार संघस्थानी ध्वजस्तंभाजवळ उभे होते. इतक्यात बैठकीला झालेल्या निर्णयाला प्रकट स्वरुप देण्यासाठी वर्धा संघचालक आप्पाजी जोशी यांनी आज्ञा दिली. सरसंघचालक प्रणाम एक-दोन-तीन आणि उपस्थित सर्वांनी प्रणाम दिला. डॉ.केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक म्हणून अशा पद्धतीने घोषित झाले. सरसंघचालकांच्या मदतीस म्हणून सरकार्यवाह बाळाजी हुद्दार आणि सरसेनापती म्हणून मार्तंडराव जोग नियुक्त झाले. इतर काही अधिकार्‍यांना घेऊन संघाचा कार्यभार हा लोकाभिमुख झाला.
 
 
 
अशातच जंगल सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. माधवराव अणे या सत्याग्रहाचे नेतृत्व करीत होते. डॉ.हेडगेवार, आप्पाजी जोशी यांनी जंगल सत्याग्रहात उडी घेण्याचा निर्णय जाहीर केला. मिठाच्या सत्याग्रहासाठी लांब जाण्यापेक्षा या जंगल सत्याग्रहात जावे, असे त्यांचे मत होते. समुद्रकाठी जाऊन निर्बंध मोडण्यापेक्षा हा सत्याग्रह जवळचा होता. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होऊन अनेक जण सत्याग्रहासाठी तयार झाले. संघकार्याची धुरा काही प्रमुख स्वयंसेवकांकडे सोपवून डॉक्टर सत्याग्रहात सामील झाले. हातात कोयते घेऊन सर्व सत्याग्रही निघाले. दहा हजार लोकांचा तो मोर्चा मोठा ऐतिहासिक होता. यवतमाळ धामणगाव मार्गावर लोहारा जंगलात मोठा पोलीस फाटा तैनात होता. सत्याग्रही जंगलात उतरून गवत कापू लागले. सर्व सत्याग्रहींना अटक झाली. त्यांना न्यायालयात उभे करण्यात येऊन त्यांना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा होऊन त्यांची आगगाडीने अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यातील दुसरा कारावास सुरु झाला होता. १९३३ मध्ये नागपूरला मराठी साहित्य संमेलन होते. त्यामुळे अनेक प्रसिद्ध साहित्यकारांनी संघाच्या शिबिराला भेट दिली. ‘नवाकाळ’चे संपादक काकासाहेब खाडीलकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, बाबुराव गोखले, शंकरराव देव, यांच्यासारखे साहित्यिक संघाचे शिस्तबद्ध शिबीर पाहून अत्यंत प्रभावित झाले. १९३४ मध्ये वर्धा येथे संघाचे हिवाळी शिबीर होते. १५०० स्वयंसेवक शिबिराला उपस्थित होते. या शिबिराला महात्मा गांधी यांनी भेट दिली. महादेवभाई देसाई यांना बरोबर घेऊन गांधीजी आले होते. आप्पाजी जोशी यांनी स्वागत केले. त्यांनी शिबिराची पाहणी केली. स्वयंसेवक निवासस्थानाचे तंबू त्यांनी पाहिले. शिस्त अनुशासन पाहून गांधीजी प्रभावित झाले. त्यांनी स्वयंसेवकांना प्रश्न विचारले की, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, प्रत्येकाने एकच उत्तर दिले, “आम्ही हिंदू आहोत.” प्रत्यक्षात तेथे सर्व जातीचे स्वयंसेवक होते. आप्पाजी जोशींनी संघाचे सारे श्रेय सरसंघचालक डॉ. हेडगेवारांना दिले. महात्मा गांधींनी त्वरित डॉ. हेडगेवारांना भेटण्याची इच्छा प्रकट केली. पुढे त्यांची भेट झाली. एकूणच डॉ. हेडगेवारांच्या कार्याप्रति गांधींनी मनमोकळेपणे प्रशंसा केली. आज देशात संघकार्याला एक प्रकारे विचाराची उंची प्राप्त झाली आहे. आज देशात ३८,३९० स्थानी ६०,९२९ संघशाखा सुरू आहेत. संघविचारातून ६१,८८२ इतकी सेवाकार्ये सुरू आहेत. ’कोविड’ या महामारीत संघाने अन्नधान्य वाटप, आरोग्य सेवा यांसारख्या सेवाकार्यातून मानवतेची सेवा केली. विदेशातही त्या त्या देशात हिंदूंच्या संघटना कार्यरत आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्व समाजघटकांचा सहभाग जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार संघाने केला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदुत्वाच्या विचारातून लढणार्‍या थोर स्वातंत्र्य योद्धे डॉ.केशव बळीराम हेडगेवारांच्या पवित्र स्मृतीला शतश: प्रणाम!
 
 
 
- नंदकुमार राऊत
(लेखक सामाजिक समरसता मंच, पश्चिम महाराष्ट्रचे संयोजक आहेत.)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी

जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी 'हरित ऊर्जा' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121