निरोगी आणि शुद्ध मनाचा एक सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे क्षमाशीलता. क्षमाशीलता हा जर गुण अंगी बाणवला, तर त्याच्यामुळे आपल्याला राग, मद, मत्सर, अहंकार या गुणांपासून आपोआपच मुक्ती मिळते. क्षमाशीलता अंगी बाणवणे हे फार सोप्पे नाही व फार कठीणही नाही. जर आपण रोज आपली इतरांशी तुलना केली व कालच्या पेक्षा आज आपण कसे ‘इम्प्रूव्ह’ झालो, हे पाहिले, तर हळूहळू आपल्याला वागण्यासाठी व इतरांचे गुणदोष दाखवत राहण्यापेक्षा स्वतःमधील गुण-दोषांचे जेव्हा विचारमंथन होते, तेव्हा त्यातून क्षमाशीलतेचा अमृतकुंभ बाहेर येतो व त्यातून आपले जीवन बहरत जाते. एखाद्या माणसामुळे किंवा एखाद्या प्रसंगामुळे जेव्हा आपण दुःखीहोतो किंवा आपले मन दुखावले जाते, त्यावेळी त्या प्रसंगाचे व घटनेचे ओझे त्या दुःखाचे किंवा अपमानाचे असते.
ज्यामुळे आपल्याला मानसिक यातना होतात, वेदना होतात व या वेदना देणार्या माणसाबद्दल आपल्या मनात राग उत्पन्न होतो, अढी निर्माण होते व त्या माणसाला धडा शिकवण्यासाठी किंवा त्याला कमीपणा आणण्यासाठी आपण झटत राहतो. पर्यायाने आपण आपल्या मनाची सहजता सोडून इर्षेला पेटतो व त्यामुळे मनाचा सहज आनंदीपणा आपण हरवून बसतो आणि ज्याठिकाणी सहजता निघून जाते, त्याठिकाणी नेहमी आजार उत्पन्न होत असतो. या आजारातून जर बाहेर पडायचे असेल, तर क्षमाशीलता अंगी रुजवणे फार उपयुक्त ठरते. सतत दुःखाचे व अपमानाचे ओझे वागवण्यापासून क्षमाशीलता आपल्याला मुक्त करते. क्षमा करण्याच्या प्रवृत्तीने आपण आपले दुःख विसरतो.
क्षमाशीलतेमुळे आपल्या डोक्यातील नकारात्मक विचार आणि आठवणींचा कचरा काढून टाकण्यास आपल्याला मदत होते. उदाहरणार्थ, जेव्हा सर्व लोक दिवाळीच्या वेळी घराची साफसफाई करून, नकोे असलेला कचरा टाकून देतात, तेव्हाच नवीन आणि उपयुक्त गोष्टींचा भरणा करण्यासाठी त्यांच्याकडे जागा तयार होत असते. अगदी तसेच आपण आपल्या मनात अनेक लोकांना नकारात्मक विचारांना व ज्यांना आपल्याला त्रास दिला, अशा लोकांना आठवून त्यांना आपल्या डोक्यात स्थान देत असतो. हे लोक आपल्या डोक्यात वर्षानुवर्षे आपल्याला कुठलेही भाडे न देता फुकट राहत असतात, जोपर्यंत आपण या लोकांना क्षमा करत नाही व जोपर्यंत घडून गेलेल्या नकारात्मक गोष्टी आपण उगाळायचे थांबवत नाही, तोपर्यंत हे नकारात्मक विचार आपल्या डोक्यातून जाणारच नाहीत.
ज्यावेळी आपले अंतर्मन या लोकांना क्षमा करून त्यांना विसरून जाते व आपोआपच यांची मनातील जागा मोकळी करते, या मोकळ्या जागेत मग आपण सकारात्मक विचार रूजवले की, आपले दुःख दूर होते. आपण अधिकाधिक प्रेम मिळवू शकतो. क्षमा केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते व आपल्या समस्यांवर उपाय ठेवण्याची आपली मानसिक क्षमता व वाढीला लागते म्हणूनच सर्व सत्पुरूषांनी ‘क्षमा करणे’ याला मानसिक प्रगतीसाठीचा मोठा गुण मानले आहे. (क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)