विशिष्ट विचारधारेच्या इतिहासकारांनी 'अभाविप'च्या कार्यास जाणीवपूर्वक डावलले - दत्तात्रेय होसबळे

15 Apr 2022 21:13:32
dh

'अभाविप'ने विद्यार्थी चळवळीस रचनात्मक दिशा दिली
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशात गेल्या सात दशकांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. मात्र, देशातील विद्यार्थी संघटनांचा इतिहास लिहिणाऱ्या विशिष्ट विचारधारेच्या इतिहासकारांनी 'अभाविप'च्या योगदानास जाणीवपूर्वक डावलले. म्हणूनच 'अभाविप'चा समग्र इतिहास 'ध्येय-यात्रा' या ग्रंथात मांडला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शुक्रवारी केले.
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इतिहास मांडणाऱ्या 'ध्येय-यात्रा' या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झाले. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, अभाविप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगनभाई पटेल व राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
यावेळी बोलताना होसबळे म्हणाले, देशात विद्यार्थी चळवळ आणि संघटना यांचा इतिहास लिहिला गेला आहे. मात्र, इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकारांनी आपल्या विचारधारेचा चष्मा लावला आणि त्यामुळेच देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचा इतिहास जाणीवपूर्वक डावलण्यात आला. त्यामुळे खरा इतिहास बाहेर यावा आणि आगामी पिढीस प्रेरणा, संघटनेच्या पुढील कार्यास आधार आणि जुन्या पिढीच्या मार्गक्रमणापासून ऊर्जा मिळणे; यासाठी 'ध्येय-यात्रा' या ग्रंथाचे प्रयोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
'अभाविप'ने विद्यार्थी चळवळीस रचनात्मक आधार दिल्याचे होसबळे यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, कोणतीही चळवळ ही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध काम करते. मात्र, देशविरोधी 'तुकडे-तुकडे' ही भूमिका व्यवस्थेस विरोध या नावाखाली 'अभाविप'ला मान्य नाही. विद्यार्थ्यांना क्रांतीच्या नावे हिंसाचार आणि देशविरोधी कृत्ये करण्यास भाग पाडणाऱ्या विचारधारेविरोधात परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता ठामपणे उभा आहे. राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय सुरक्षा, समरसता आणि छात्रशक्तीस रचनात्मक वळण देऊन त्याचे राष्ट्रशक्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी अभाविप यापुढेही काम करत राहणार असल्याचेही होसबळे यांनी यावेळी सांगितले.
 
 
abvp 
 
 
रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले, दत्तात्रेय होसबळे परिषदेचे संघटनमंत्री असताना या ग्रंथाची संकल्पना तयार झाली. विद्यार्थी संघटनेचा इतिहास लिहिणे हे आव्हान असल्याचे वेळोवेळी लक्षात येत होते. कारण परिषदेतर्फे नवनवे विषय, नवनवी आंदोलने हाताळली जातात. त्यामुळे माहितीचा प्रचंड साठा दररोज निर्माण होत होता. ग्रंथांमध्ये परिषदेच्या सात दशकांच्या इतिहासाचे संकलन करण्यात आले आहे. पहिल्या टाळेबंदीच्या काळात पहिला मसुदा तयार झाला आणि आज दोन खंडांमध्ये ग्रंथ तयार झाला असून भविष्यात त्यात आणखी भरच पडणार आहे. विद्यार्थी परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्र प्रथम हे ध्येय. समोर योग्य ध्येय असल्यानेच अविरतपणे वाटचाल सुरू आहे. देशातील तरुणांच्या उर्जेस सकारात्मक दिशा देण्याचे काम अभाविप करीत असल्याचेही आंबेकर यांनी नमूद केले.
 
अभाविप राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी म्हणाल्या, १९४९ साली रोवलेले परिषदेच्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे. अभाविपने कलम ३७० हटविणे, शिक्षणाचे भारतीयीकरण, इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची मागणी दीर्घकाळपासून केली होती; ते आज पूर्ण होताना दिसत आहे. परिषदेचे आज ३३ लाख सदस्य असून आता १ कोटी सदस्यसंख्येचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी आगामी वर्षात १५०० नवे विस्तारक कार्यरत होणार असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.
 
 
अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगनभाई पटेल म्हणाले, अभाविपमध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या पिढ्या काम करीत आहेत. स्थापनेपासून आजपर्यंत अभाविपच्या राष्ट्रोत्थानाच्या मुख्य उद्देशात तसूभरही फरक पडलेला नाही. या ग्रंथात परिषदेचा आजवरचा प्रवास मांडला असून यापुढेही अविरतपणे काम सुरूच राहणार आहे.
 
 
भारताची लोकशाही मजबूतच राहणार - सुनील अरोरा
 
 
माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले, अभाविप हे एकप्रकारचे प्रशिक्षण केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून लोकशाहीसाठी काम करावे. करोना काळातही यशस्वी निवडणूका घेऊन भारताने आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. भारतात लोकशाही व निवडणुका रूजणार नाही, असे वाटणाऱ्या जगातील अनेकांना भारताने चोख उत्तर दिल्याचेही अरोरा यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0