दुष्काळात तेरावा महिना?

12 Apr 2022 10:03:31
 
ramchandra
 
 
 
 
दुष्काळात तेरावा महिना?प्रसिद्ध आणि मानाची समजली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा यंदा वेगळ्याच कारणास्तव चर्चेत आहे. या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारा कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील याने रोखरकमेचे बक्षीस प्राप्त न झाल्याची कैफियत स्वतः सर्वांसमक्ष मांडल्यानंतर क्रीडापासून ते राजकीय जगतापर्यंत सर्वत्र ही स्पर्धा चर्चेत आहे. स्पर्धेचेविजेतेपद पटकाविल्यानंतरही रोखरकमेच्या बक्षिसापासून कुस्तीपटू वंचित राहणे, हे म्हणजे दुष्काळात तेराव्या महिन्यासारखेच! कारण, जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कुस्ती स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. इतर जगप्रसिद्ध क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. परंतु, या खेळात थेट शरीराला स्पर्श होत असल्याने कुस्ती स्पर्धांचे आयोजन मात्र होऊ शकले नव्हते. स्पर्धांचे आयोजन होऊ शकत नसल्यामुळे परिणामी अनेक कुस्तीपटूंना कोरोना महामारीच्या काळात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, पैलवान बनण्यासाठीचा खर्च अनेकांना पेलवत नव्हता. कटू असले तरी हे वास्तव आहे. परंतु, अशा सर्व संघर्षजन्य परिस्थितीवर मात करूनही अनेक कुस्तीपटूंनी प्रसिद्ध आणि मानाच्या समजल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. परंतु, त्यानंतरही रोखरकमेच्या बक्षिसापासून विजेत्या कुस्तीपटूला वंचित ठेवले गेल्याने त्याने आपली व्यथा जाहीरपणे सर्वांसमोर मांडली. ही व्यथा जाहीरपणे मांडताना कुस्तीपटू दिसत असला, तरी त्यामागे त्याचा मोठा संघर्ष आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मुळात ही वेळच यायला नको हवी होती. जर, वेळेवर बक्षीस मिळाले असते, तर विजेत्या कुस्तीपटूला आपली व्यथा जाहीरपणे मांडण्याची वेळच आली नसती. परंतु, विजेतेपद पटकाविल्यानंतरही बक्षिसाबाबत बोळवण होत असल्याने कुस्तीपटूला आपली कैफियत दुर्दैवाने जाहीरपणे सर्वांसमोर मांडावी लागली. कुस्तीपटूने व्यथा मांडताच त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला, यात दुमत नाही. परंतु, विजेतेपदाचा आनंद साजरा करण्याच्या वेळी कुस्तीपटूला आपल्या दुःखाची व्यथा त्यावेळी मांडायला लागण्याची वेळ पुन्हा येऊ नये, म्हणजे मिळवले.
 
भवितव्याचे काय?
 
प्रसिद्ध आणि मानाच्या समजल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेतील विजेता कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील याने रोखरकमेच्या बक्षिसाबाबत बोळवण झाल्याचे जाहीरपणे सांगितल्यानंतर पैलवानांबाबतच्या चिंतेच्या समस्यांचे ढग आणखीनच गडद झाल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध आणि मानाच्या समजल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा विजेता कुस्तीपटूला जर रोखरकमेच्या बक्षिसाबाबत जाहीरपणे कैफियत मांडावी लागत असेल, तर तेथे इतर पैलवानांची स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा! सध्याच्या घडीला जर कुस्ती विश्वात ही स्थिती असेल, तर याचे भवितव्य काय असेल, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, हॉकी आदी जगप्रसिद्ध खेळांमधील खेळाडूंप्रमाणे कुस्तीपटूंचीदेखील आर्थिकदृष्ट्या भरभराट होणे गरजेचे आहे. जगप्रसिद्ध खेळाडूंप्रमाणे पैलवानदेखील जीवापाड कष्ट करतो. विविध स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्या जीवाचे रान करून तो विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतो. आपली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धांमध्ये यशस्वीदेखील होतो. परंतु, स्पर्धा जिंकूनही रोख रकमांच्या बक्षिसांच्या जोरावर जर त्याची बोळवण होणार असेल, तर कुस्तीपटूच्या वाट्याला नैराश्येवाचून दुसरे काहीही येणार नाही. त्यांच्याकडे आपल्या व्यथा जाहीरपणे सर्वांसमोर मांडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत हे पैलवान इतरांना कुस्तीपटू होण्याबाबत प्रेरणा कसे देणार, हा मोठा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे या पैलवानांचीच जर अशी अवस्था होत असेल, तर यांच्यापासून प्रेरणा घेऊन कुस्ती क्षेत्राकडे वळणार्‍यांची संख्याही रोडावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कुस्ती या खेळाची लोकप्रियता वाढवायची असेल, तर आधी पैलवानांना आणखी सक्षम आणि कणखर बनविण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनाही इतर खेळांच्या खेळाडूंप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे. पृथ्वीराज पाटीलची गरज ओळखून वेळीच भाजपने सर्वांत आधी तातडीने पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. भाजपकडून मदतीची घोषणा होताच अनेकजण त्याला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले. आता बक्षिसांचा वर्षाव होत आहे, हे ठीक. परंतु, कुस्तीच्या भवितव्यासाठी मात्र आता पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे, हे मात्र खरे!
 
 
 - रामचंद्र नाईक 
 
 
 
Powered By Sangraha 9.0