शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करणार नाही : वर्षा गायकवाड

23 Mar 2022 14:54:40
 
 
varsha gaikwad
 
 
मुंबई : शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही, तसेच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करणार नसल्याचे सांगितले आहे. भगवद्गीतेचा समावेश हा शालेय अभ्यासक्रमात करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र भाजपची ही मागणी फेटाळून लावत 'केवळ राजकारणासाठी अशी मागणी केली जात आहे' अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्यांचा समावेश करावा अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुशार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती. परंतु ही मागणी मान्य करता येणार नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
"भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. एका धर्माच्या ग्रंथाचा शिक्षणात समावेश केला तर, इतर धर्मीयांकडूनही तशी मागणी होईल. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश आहे. विद्यार्थीदशेपासून मुलांच्या मनात हे विचार रुजविले पाहिजेत. त्याचबरोबर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे राजीव गांधी विज्ञान नगरी ( राजीव गांधी सायन्स सिटी) स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही धर्मांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार नाही. धर्मग्रंथांचे पठण घरात करावे. शालेय शिक्षणात त्यांचा समावेश करता येणार नाही," अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
Powered By Sangraha 9.0