रत्नागिरी : महाविकासआघाडीला महाराष्ट्र सत्ता स्थापन करून अडीच वर्षांचा काळ लोटला. मात्र, वरवर जरी हे सरकार चांगले एकजुटीने चालले असल्याचे भासवत असल्याचे दाखवत असले, तरीही अनेकवेळा त्यांच्यातील धुसमुस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनीदेखील महाविकासआघाडीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करताना गजानन किर्तीकर यांनी, 'आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार' असे म्हंटले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर मिळाला. ते म्हणाले की, "शिवसेनेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नसून शिवसेनेवर अन्याय होतो. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार!" असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
पुढे त्यांनी म्हंटले की, "एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकासकामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागते. विकासकामांच्या निधीमध्ये पळवापळव केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो, मात्र निधीची पळवापळवी केली जात आहे." असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.