मुंबई : "संपूर्ण देश एका विचारानं चालला असताना अशातच द काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट येण्याने समाजात दुरावा निर्माण होऊ शकतो. सामाजिक वातावरणही दुषित होऊ शकते. त्यामुळे असे चित्रपट तयार करणं शक्यतो टाळलं पाहिजे. कारण नसताना हा विषय भाजपने काढणं हे योग्य नाही.", असे अजब वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटाविषयी सांगताना केले आहे. रविवारी (दि. २० मार्च) यासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.
"या चित्रपटात कळत-नकळत काँग्रेसला दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकाळी काँग्रेसची सत्ता असल्याने तेच काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीला जबाबदार आहेत; असे भाजपकडून म्हटले जात आहे. काश्मिरी पंडितांचा प्रश्न उपस्थित करून भाजपकडून पुन्हा एकदा सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे कारण नसताना हा विषय भाजपने काढणं हे योग्य नाही.", असेही ते पुढे म्हणाले.