ठाणे : आयपीएल २०२२च्या रणधुमाळीला अवघे काहीच दिवसा शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये आता संघांनी सरावासाठी तयारी सुरु केली आहे. अशातच विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ ठाण्यामध्ये सरावासाठी येणार आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये हा संघ सराव करणार आहे. अशामध्ये आता ठाणे महानगर पालिकेच्यावतीने रंगरंगोटीच काम आणि रस्त्याच्या झाडाच्या फांद्या तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळेच आता सामान्य नागरीकांसोबतच मनसेदेखील ठाणे महानगर पालिकेच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे.
आरसीबी संघ हा ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सरावासाठी येणार आहे म्हणून ठाणे पालिकेने रस्त्यांवर रंगरंगोटीचे काम हाती घेतले. तर ज्या मार्गाने या संघाची बस जाणार आहे, त्या ठिकाणवरील झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम देखील सुरु केले आहे. एकीकडे ठाण्यातील पारा ४३ डिग्रीवर गेल्यामुळे नागरिकांना कडक गरमी सहन करावी लागत आहे. तर, दुसरीकडे ठाणे महापालिकेने वृक्षतोड करण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मनसेनेही वृक्षतोड करणे अत्यंत आक्षेपार्ह असून याचा तीव्र निषेध केला आहे.