मुंबई: तालुक्यातील करूळ गगनबावडा व भुईबावडा घाट यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. इतर घाटांप्रमाणे याही दोन्ही घाटांच्या नूतनीकरणासाठी विशेष लक्ष द्या. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात केली. यावेळी उत्तर देताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, नितेश राणे यांची मागणी रास्त आहे. लवकरच आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत संबंधित विभागातील अधिकारी यांची बैठक लावली जाईल. व घाटमार्गातील अडचणी सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातील.
सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी दुरावस्था झालेल्या करूळ गगनबावडा व भुईबावडा या दोन्ही घाटा बाबत आवाज उठवला. कोकणातील या दोन प्रमुख घाटांची अवस्था अतिशय बिकट आहे. महिना-महिना हे घाट वाहतुकीला बंद असतात. वैभववाडीत ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तो सर्व ऊस मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या घाटमाथ्यावरील कारखान्याकडे जातो. परंतु घाट मार्ग वाहतुकीला धोकादायक असल्याने ऊस वाहतूक खोळंबते. त्यामुळे इतर घाटाप्रमाणे या घाटांकडे बांधकाम मंत्री महोदय साहेबांनी लक्ष द्यावे. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात केली.
या मागणीला उत्तर देताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, वैभववाडीतील दोन्ही घाटाबाबतचा आढावा संबंधित विभागातील अधिकार्यांच्या उपस्थितीत घेतला जाईल. लवकरच बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत आमदार नितेश राणे हे देखील असतील. व घाटांच्या अडचणीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.