मुंबई: ठाण्यातील वाहन व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार हे परमबीर सिंहच आहेत हे आपल्याला कळले होते असा धक्कादायक खुलासा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ईडी च्या चौकशीदरम्यान केला आहे. रिलायन्स चे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याची घटना मागच्या वर्षी समोर आली होती. या घटनेच्या तपासादरम्यान तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे आपली दिशाभूल करत होते. या प्रकरणात सिंह यांचे सहकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते आणि सिंह हेच या सर्व घटनांचे सूत्रधार आहेत हे आपल्याला कळले होते. याच गोष्टीमुळे सिंह यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय पण घेतला. यानंतर सिंह यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला असे देशमुख यांनी सांगितले.
सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांच्यावर अँटिलीया बंगल्याजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके ठेवल्याचा आरोप होता. या घटनेतील आरोपींपैकी ठाण्यातील वाहन व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. ५ मार्च २०२१ रोजी विधानसभा सुरू असताना सिंह यांना विधानसभेत ब्रीफिंगसाठी बोलावलं होतं, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंह यांना बोलावलं तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंह देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती, असं देशमुखांनी ईडीच्या जबाबापैकी त म्हटलं आहे.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेचा तपास एटीएस कडे सोपवण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या ब्रिफींग मध्ये मी, मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होतो. यावेळीही परमबीर सिंह हे दिशाभूल करत आहेत असे समोर आले होते.