मुंबई: ताडदेव येथील 'सचिनम हाईट्स' या इमारतीला आगीत झालेल्या मृत्यूंसाठी अग्निसुरक्षा यंत्रणेतील गंभीर त्रुटी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या चौकशी समितीने काढला आहे. एक महिन्याच्या चौकशीनंतर सुद्धा समितीला आगीचे नेमके कारण शोधण्यात अपयशच आले आहे. या समितीचा अहवाल पालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यासमोर सादर झाला. अग्निसुरक्षा यंत्रणेतील त्रुटींसाठी इमारतीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे समितीने सुचवले आहे.
२२ जानेवारी रोजी 'सचिनम हाईट्स' या इमारतीस आग लागली होती. यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. आग प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांनी समितीची स्थापना केली होती. इमारतीची अग्निसुरक्षा यंत्रणा व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र वर्षातून दोनदा अग्निशमन दलाकडे सादर करणे बंधनकारक असते. तरीसुद्धा इमारतीकडून ते सादर केले गेले नव्हते. आगीच्या घटनेवेळेस अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नव्हती असे आढळून आले. जखमींच्या नातेवाईकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली असा आरोप केला होता पण चौकशी समितीने रुग्णालयांना क्लीन चीट दिली आहे.