प.पू. श्री गुरुजींचे विचार आजही देशाला मार्गदर्शक: भैय्याजी जोशी

20 Feb 2022 19:55:25
 
Bhaiyyaji Joshi

 
 
अलिबाग: “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवण्यार्‍या गोष्टींशी कधीही समझोता केला नाही. भाषावार प्रांतरचना, गोवामुक्ती, पंजाबचा प्रश्न, चीनची समस्या या प्रश्नांवर त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत,” असे विचार रा.स्व.संघाचे पूर्व सरकार्यवाह व विद्यमान कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर देण्यात येणार्‍या श्री गुरुजी पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात झाले. त्याप्रसंगी भैय्याजी जोशी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद वामनराव पै उपस्थित होते. याप्रसंगी जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र साताळकर, ऑल बाथौ महासभेचे सरचिटणीस गणेश दैमरी, इंदुमती काटदरे, स्वागत समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, विभाग संघचालक यशवंत पाटील, जिल्हा अध्यक्ष अरुण राव दाते इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर रवींद्र साताळकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये जनकल्याण समितीच्या 1600हून अधिक चालणार्‍या सेवा कार्यांची विस्ताराने माहिती दिली. तसेच सुवर्णमहोत्सवी वर्षात होणार्‍या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर आसाम येथील ऑल बाथौ महासभेचे गणेश दैमरी यांना धर्म संस्कृती या विभागामध्ये तर कर्णावती येथील इंदुमती काटदरे यांना अनुसंधान या विभागामध्ये श्रीगुरुजी पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
 
गणेश दैमरी यांनी आपल्या भाषणामध्ये उत्तर-पूर्व राज्यांमध्ये असलेल्या बाथौ संघटनेचा महाराष्ट्रातील जनकल्याण समिती सत्कार करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपण सर्वजण भारतमातेचे पुत्र असून या देशामधील घुसखोरी करणार्‍यांना हाकलून लावण्याची वेळ आलेली आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कर्णावती येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुमती काटदरे यांनी भारतीय ज्ञानाला जगात प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हे पुनरुत्थान विद्यापीठाचे काम असल्याचे सांगितले. एकात्म मानव दर्शन हे बालवाडीपासून ते आयआयटी, आयआयएम सारख्या विद्यापीठांपर्यंत पोहोचवण्याचे ही विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. निस्वार्थ सेवा, शिस्त आणि राष्ट्रभक्ती हे रा.स्व. संघाचे वैशिष्ट्य आहे आणि त्याच गोष्टी सद्गुरु वामनराव पै यांनीही सांगितल्याचे प्रमुख अतिथी प्रल्हाद दादा पै यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 
 
 
भैय्याजी जोशी यांनी गुरुजींच्या श्रेष्ठ साधक, श्रेष्ठ द्रष्टा, सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरक, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व, आदर्श व्यक्तिमत्त्वाचे सगळे गुण श्रीगुरुजींच्या मधे वसले होते. व्यवहारात विनम्रता, शालीनता असलेल्या श्रीगुरुजींनी सारख्या महापुरुषांचे अंश मात्र, गुण जरी आपल्या जीवनात आपण उतरवू शकलो तरी आपण स्वतःला धन्य समजू असे भैय्याजी यांनी सांगितले.पाहुण्यांचा परिचय रविकिरण काळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन संतोष वझे यांनी केले. श्रावणी बापट व रोहित वैशंपायन यांनी गीत सादर केले. रघुजीराजे आंग्रे यांनी आभार मानले. शितल कुंटे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0