मुंबई: - मुंबईतील प्रदूषण कमी व्हावे यासाठी बेस्ट परिवहन सेवेत खरेदी करण्यात आलेल्या ९०० ई बसेसच्या खरेदी कंत्राटांत घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. ३६०० कोटींचा घोटाळा झाला आहे असे कोटेचा यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियाना अंतर्गत मुंबईतील हवा प्रदूषण कमी व्हावे यासाठी या बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या.
"पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यावे की या बसेस नेमक्या कोणासाठी आहेत मुंबईकरांच्या भल्यासाठी की कॉसेस मोबिलिटी या कंपनीच्या भल्यासाठी." असा सवाल कोटेचा यांनी केला. या प्रकरणासाठी आमदार कोटेचा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती.
डिसेंबरमध्ये 200 दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रीक बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा बेस्टकडून काढण्यात आली होती. मात्र प्रस्ताव मजुरी करतांना 200 च्या ऐवजी 900 बसेसचे एकंदरीत 3600 कोटींचे कंत्राट काढण्यात आले. "आधी २०० बसेसची निविदा काढली जाते, नंतर ती ४०० होते आणि मग कुठलीही पुनर्निवदा न काढता ९०० बसेसचे कंत्राट दिले जाते. मुंबईच्या रस्त्यांवरून या दुमजली बसेस खरोखरच धावू शकणार आहेत का?", असा प्रश्नही त्यांनी विचारला.
याबद्दल काही चाचणी महापालिकेने केली आहे का? ज्या कंपनीचे भागभांडवल फक्त एक लाख रुपये आहे त्या कंपनीला कोणत्या आधारावर पालिकेने २८०० कोटींचे कंत्राट दिले?" असे सवाल कोटेचा यांनी या पत्रकर परिषदेत विचारले. आम्ही मुंबईकरांचा शुद्ध हवेत श्वास घेण्याचा अधिकार हिरावू देणार नाही. या घोटाळ्याविरोधात कॅग आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचे या परिषदेत स्पष्ट करण्यात आले.