ऊठ माणसा, जागा हो!

    17-Feb-2022
Total Views |
 
 
mansa
 
 
जेव्हा माणूस म्हणजेच जीवात्मा आपल्यात विद्यमान दिव्यशक्तीला ओळखतो, तेव्हा त्याच्यात एक नवा उत्साह संचारतो व चैतन्य जागे होते. मग आपल्या दोन्ही हातांनी तो इतकी मोठी कामे करतो की, त्यावर कोणी विचारदेखील करू शकणार नाही.
 
*सुपर्णोऽसि गुरुत्मान् पृष्ठे पृथिव्या: सीद। भासान्तरक्षमापृण ज्योतिषा दिवमुत्तभान तेजसा दिशऽउद् दृंह।
(यजुर्वेद-१७/७२)*
 
अन्वयार्थ
हे जीवात्म्या, अरे मानवा, तू (सुपर्ण:) उत्तम प्रकारे उन्नती करणारा, (गुरुत्मान्) महान- मोठा, सर्व गुणांनी श्रेष्ठ आत्मा (असि) आहेस. तू (पृथिव्या:) या विस्तृत अशा पृथ्वीच्या (पृष्ठे) पृष्ठभागावर (सीद) आरुढ हो, विराजमान हो. (भासा) आपल्या तेजोमय प्रकाशाने (अंतरिक्षम्) अंतरिक्षाला (आपृण) व्यापून, भरून टाक! (ज्योतिषा) आपल्या ज्योतीने स्वतःला (दिवम्) द्युलोकात (उत्तभान) उंचावर ने. तसेच (तेजसा) आपल्यातील दिव्यतेजाने (दिश:) सर्व दिशांना (उद् दृंह) प्रगतिपथावर घेऊन जा!
 
विवेचन 
खरेतर मानवामध्ये सर्व प्रकारचे बळ व सामर्थ्य दडलेले आहे. समग्र प्राणिसमूहामध्ये तो श्रेष्ठ यासाठीच आहे की, त्याकडे ज्ञानबळ व आत्मबळ मोठ्या प्रमाणावर आढळते. मन व इतर इंद्रियांच्या साहाय्याने हा मानव प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो. पण, सर्व प्रकारचे सामर्थ्य लाभलेला हा मानव षड्रिपू व इतर दोषांना बळी पडून अनर्थकारी कामेही करील, पण हा मार्ग योग्य नव्हे. कारण, या अनर्थकारी मार्गामुळे माणूस पतित होतो. त्याचे सर्व बाजूंनी अध:पतन होते. स्वतःबरोबरच इतरांचाही नाश होतो. या विनाशापासून वाचण्याकरिता विवेक व सत्यज्ञान आवश्यक असते. त्याच्या विना माणूस हा ‘माणूस’ बनू शकणार नाही. म्हणूनच सत्य ज्ञान व सुयोग्य दिशा आवश्यक असते. त्यामुळेच तर जीवात्मा सर्वोत्तम कामे करू शकतो. आत्म्यामध्ये एवढे सामर्थ्य आहे की, तो आपल्या शक्तीच्या बळावर सर्व क्षेत्रात झेप घेऊ शकतो. ऋग्वेदात (१०.४८.५) एक मंत्र आला आहे-
 
अहमिन्द्रो न पराजिग्य इद्धनं
न मृत्यवेऽवतस्थे कदाचन।
 
अर्थातच मी इंद्र आहे. मी शक्तिशाली आहे. मी ऐश्वर्यसंपन्न आहे. माझ्या या दिव्यतम शक्तीला कोणीही पराजित करू शकणार नाही. माझ्यापासून माझे धन कोणीही हिरावू घेणार नाही. इतकेच काय, तर मृत्यूच्या तावडीत अडकलो, तरी मी कदापि हार पत्करणार नाही. किती मोठी दिव्य भावना आहे ही. अथर्ववेदात एका ठिकाणी (४.१३.६) म्हटले आहे-
 
अयं मे हस्तो भगवानयं मे भगवत्तरम्।
 
माझ्या एका हातात ऐश्वर्य आहेत, तर दुसर्‍या हातात त्याहीपेक्षा सर्वात मोठे ऐश्वर्यबळ आहे. जेव्हा माणूस म्हणजेच जीवात्मा आपल्यात विद्यमान दिव्यशक्तीला ओळखतो, तेव्हा त्याच्यात एक नवा उत्साह संचारतो व चैतन्य जागे होते. मग आपल्या दोन्ही हातांनी तो इतकी मोठी कामे करतो की, त्यावर कोणी विचारदेखील करू शकणार नाही. ‘हनुमन्नाटकम्’ या प्रसिद्ध वीररसप्रधान नाटकात भक्त हनुमान श्रीरामांसमोर मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतात-
 
पातालत: किमु सुधारसमानयामि
निष्पीड्य चंद्रममृतं किमुताहरामि।
उद्दण्डचण्ड किरणं ननु वारयामि
कीनाशपाशमनिशं किमु चूर्णयामि॥
  
हे रघुवर स्वामी, काय मी पाताळातून अमृत घेऊन येऊ? अथवा चंद्राला पिळून अमृत आणू? त्याचबरोबर प्रचंड किरणांनी युक्त अशा सूर्यालाही रोखून धरू? अथवा मृत्यूचे पाश धारण करणार्‍या यमराजाला कवटाळून, वाटून त्याचा भुगा बनवू? वीर हनुमंताचा किती हा मोठा प्रबळ आत्मविश्वास! अशी कितीतरी वीरत्वाची उदाहरणे इतिहासाच्या पानोपानी आढळतात. आत्मशक्तीच्या बळावर अनेक बळवंतांनी अशक्यप्राय अशी कठीण कामेसुद्धा अगदी सहजपणे यशस्वी करून दाखवली आहेत. सदर यजुर्वेदीय मंत्रात आत्म्याची दिव्यशक्ती अभिव्यक्त होते. मानवाला जागृत करण्याकरिता यातील एक-एक मंत्रांश अतिशय समर्पक व मोलाचा ठरतो. प्रारंभीच म्हटले आहे ‘सुपर्णोऽसि!’ हे मानवा, तू सुपर्ण आहेस. ‘सु’ म्हणजे उत्तम, चांगले, पवित्र व शुद्ध आणि ‘पर्ण’ म्हणजे प्रगती करणारा.
 
अर्थात, अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व प्रकारची सर्वांगीण प्रगती साधणारा ‘पर्ण’ या शब्दाचा अर्थ पंखदेखील होतो. जीवात्मा हा चांगले पंख लाभलेला प्राणी. ज्ञान व कर्म हे त्याचे दोन पंख. याच दोन पंखांच्या बळावर तो गगनभरारी घेऊ शकतो. गरुड या पक्षालासुद्धा ‘सुपर्ण’ म्हटले जाते, ते याच कारणामुळे. गरुडाची झेप ही आकाशात उंचावर झेपावणारी असते. तो नेहमी आकाशमार्गावर विराजमान असतो. म्हणजेच प्रगतिशीलता ही त्याची निशाणी आहे. माणूसदेखील असाच आहे. या विशाल सृष्टीत त्याला ज्ञान व कर्म या दोन पंखांचे वरदान लाभले आहे. यांच्या साहाय्याने तो सर्व काही मिळवू शकतो. त्यासाठी आवश्यकता असते ती अनवरत प्रयत्नांची व उत्साहशक्तीची. निराश आणि हताशपणे जगणारी माणसे काहीच करू शकत नाहीत. कवी जगदीश खेबुडकर यांनी आपल्या सुंदरशा गीतातून हाच भाव विशद केला आहे-
 
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता- सागरा
सोडी सोन्याचा पिंजरा
आकाशी झेप घे रे पाखरा!
 
याच मंत्रात पुढे मानवाकरिता ‘गुरुत्मान्’ म्हणजेच ‘मोठा बलशाली’ असे विशेषण आले आहे. आत्म्याची शक्ती विशाल आहे. याच आत्मबळाच्या साहाय्याने मानवाने सर्व धरणीला पादाक्रांत केले आहे. जिथे जावे, तिथे आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावली आहे. आणखीन पुढे जात मंत्र शिकवण देतो- पृथिव्या: पृष्ठे सीद! अर्थात, हे मानवा, या समग्र पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाटेल तिथे जाऊन तू आपले साम्राज्य प्रस्थापित करू शकतोस. ही धरणीमाता मानवासाठी खुली आहे. इच्छेप्रमाणे कोणत्याही ठिकाणी विजयाचा कीर्तिस्तंभ उभा करू शकतो. केवळ पृथ्वीलाच नव्हे, तर अंतरिक्ष व लोकांनाही तो कवेत घेऊ शकतो. इतकेच काय, तर दाही दिशांना हा मानव आपल्या तेजस्वी जीवन व कार्याने उजळून टाकू शकतो. यासाठीच म्हटले आहे-
 
भासा अंतरिक्षं आपृण,
ज्योतिषा दिवमुत्तभान।
 
आपल्या दिव्यतम प्रकाशगुणांनी समग्र अंतरिक्ष व्यापून टाकण्याचे सामर्थ्य माणसांमध्ये आहे. तसेच आपल्या सद्गुणांच्या दिव्यज्योतीने समग्र द्युलोकांतही पोहोचण्याचे बळ माणसात आहे. इतकी प्रेरणादायी शिकवण या वेदमंत्रातून मानवाला लाभतेय. आजच्या युगात मानव मोठ्या प्रमाणात नैराश्याचे जीवन जगतो आहे. स्वतःतील आत्मशक्तीचा शोध आणि बोध करून वेदमंत्रात वर्णिलेला उपदेश आत्मसात केल्यास तो निश्चितच सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर राहू शकतो आणि आपले जीवन यशस्वी करू शकतो.
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य