मुंबई: मुंबई महानगर पालिका आणि एमएमआरडीए यांनी एकत्रितपणे एक हजार कोटी खर्च करूनही मिठी नदीचे काम अपूर्णच राहिल्याची धक्कादायक गोष्ट माहिती अधिकरात उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार याचिकेद्वारे मागवलेल्या माहिती मध्ये हा सर्व तपशील मिळाला आहे. २६ जुलै च्या महापुरात मिठी नदीला आलेल्या पुराने मुंबईत हाहाकार माजवला होता. अशीच परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी मिठी नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच मिठी नदीवर संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोड बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पण ही सर्व कामे अपूर्णच असल्याने मुंबईकरांचा पुराचा धोका कायमच आहे.
या सर्व कामांसाठी एमएमआरडीए प्रशासनाने ५०३ कोटी आणि पालिका प्रशासनाने ६४६ कोटी दिले आहेत. तरीसुद्धा मिठी नदी वरच्या संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोडचे काम अर्धवटच राहिले आहे. पालिकेने अनेक कंत्राटदारांना हे काम दिले आहे. असे असले तरी पालिकेच्या हद्दीतील संरक्षक भिंतीचे ४ किलोमीटर चे काम अर्धवट राहिल्याचे समोर आले आहे. एवढे पैसे खर्च करूनही मुंबईकरांच्या जीवावरचा पुराचा धोका कायमच असल्याने पालिकेचे पैसे नेमके गेले कुठे? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.