आदित्य ठाकरेंच्या 'या' महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कफ परेडमधील मच्छीमारांचा विरोध !

10 Feb 2022 16:37:55
koli


मुंबई (प्रतिनिधी) -
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट ते कफ परेड कनेक्टरला स्थानिक मच्छीमारांनी विरोध दर्शवला आहे. या पुलामुळे स्थानिकांच्या मासेमारी नौका नांगरण्याचे ठिकाण आणि स्थानिक वस्तीवा बाधा पोहचू शकतो, असा आक्षेप स्थानिकांनी नोंदवला आहे. त्यामुळे कफ परेड येथील स्थानिक कोळी समाजाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने या प्रकल्पा विरोध केला आहे.
 
 
मुंबई महानगर पालिकेने एमएमआरडीएच्या मदतीने नरिमन पाॅईंट ते कफ परेड असा पूल बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. मच्छिमार नगर येथे मासेमारीच्या बोटी ज्याठिकाणी नांगरल्या जातात त्याच ठिकाणी या पुलाचे खांब प्रस्तावित आहेत. इथे स्थानिकांच्या जवळपास ३५० बोटी नांगरल्या जातात. पुलाच्या खांबामुळे बोटी नांगरण्याची जागा जाईल. शिवाय बोटींच्या समुद्रात येण्या-जाण्या मार्गही चिंचोळा होईल. त्यामुळे आम्हाला सामान चढवण्यास व उतरवण्यास जागा राहणार नसल्याची बाब मच्छिमार सर्वोद्य सोसायटीचेे संचालक परशुराम मेहेर यांनी सांगितली.



या परिसरात खडकाळ भाग आहे. त्यामुळे बोटींना आता येण्यासाठी आधीच कमी जागा आहे. अशा परिस्थितीत त्याठिकाणी पुलाचे खांब आल्यास बोटी नांगरायच्या कुठे ? असा सवाल मेहेर यांनी विचारला आहे. यामुळे या पुलाला विरोध करण्यात आला असून हा विरोध कायम राहील असा निर्धार मेहेर यांनी केला आहे. या पुलासाठी पर्यायी जागा पाहण्याची अपेक्षा स्थानिक मच्छीमार व्यक्त करत आहेत.

Powered By Sangraha 9.0