मुंबई : गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपने काँग्रेसचा सुफडा साफ केल्यानंतर मविआचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रीया दिली आहे. "गुजरात, हिमाचलच्या निवडणूका झाल्या आता महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेसह उर्वरित सर्वच निवडणूका जाहीर कराव्यात", अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. निवडणूक निकालांवर प्रतिक्रीया देताना ते बोलत होते. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्वच महापालिकांच्या निवडणूका प्रलंबित आहेत. त्या वेळेत घेतल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
जे जे उमेदवार निवडून आले आहेत. त्यांचे अभिनंदनही आदित्य ठाकरेंनी केले. पण आता महाराष्ट्रातील निवडणूकाही लावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "ज्या प्रमाणे गुजरात निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले. मात्र आता कर्नाटकसाठी आमची गावे पळवली जात आहेत. कर्नाटकसमोर आमचे मंत्री घाबरले आहेत. महाराष्ट्रात सध्या घटनाबाह्य सरकार आहे, सीमावादात महाराष्ट्राचा अंत पाहू नका," असेही ते म्हणाले.