करोना संसर्गाच्या स्थितीवर केंद्राचे बारकाईने लक्ष – केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया

22 Dec 2022 18:29:23
Mansukh Mandaviya

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहेत, मात्र भारतात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. सध्या चीनमध्ये करोना संसर्गामध्ये वाढ होत असून त्या परिस्थितीकडे केंद्र सरकार बारकाईने लक्ष देत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरूवारी संसदेत केले.


चीनसह जगातील अनेक देशांमध्ये सध्या करोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे संसदेत निवेदन देण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मात्र भारतात मात्र सातत्याने घट होत आहे. भारतात दररोज सरासरी १५३ नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत, तर संपूर्ण जगात दररोज ५ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. जपान, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स आणि इटली यांसारख्या देशांमध्ये कोरोनाचे मृत्यू आणि नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, या परिस्थितीकडे केंद्र सरकारचे अतिशय बारकाईने लक्ष आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे यादृच्छिक नमुने घेण्यासही विमानतळांवर सुरुवात करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कोरोना महामारी अद्याप संपली नसल्याचे लक्षात घेण्याची गरज आहे. भारतात लसीच्या २२० कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालय जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून देशात कोणताही नवीन प्रकार आला तर त्याची वेळीच ओळख करून घेऊन पावले उचलता येतील. येत्या सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क राहून लोकांमध्ये मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि सामाजिक अंतर राखणे यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी राज्ये – केंद्रशासित प्रदेशांसोबत केंद्र सरकार संपर्कात असल्याचीही माहिती केंद्रीय मंत्री मांडविया यांनी यावेळी दिली.





Powered By Sangraha 9.0