दोन बहिणींचं एकाशीच लग्न! कायदा येणार?

15 Dec 2022 16:36:28

solapur akluj
 
 
 
मुंबई : सोलापुरमधील अकलूजमध्ये नुकतेच एका तरुणाने जुळ्या बहिणींसोबत एकाच मांडवात लग्न केले होते. या दोन्ही बहिणी मुंबईत कांदिवलीत राहणाऱ्या आहेत. दोघीही आयटी इंजिनीअर असून दोघीही अंधेरीमध्ये एकाच आयटी कंपनीत नोकरी करतात. या जुळ्या बहिणींना मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अतुल आवताडे या ट्रॅव्हल्स व्यवसाय असणाऱ्या तरुणाशी पिंकी आणि रिंकीने विवाह केला.
 
 
यावर आज लोकसभेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीका केली. नवनीत राणा म्हणाल्या, "एकाच मंडपात एकाचवेळी एका तरुणाचे दोन तरुणींसोबत लग्न होणे, हा हिंदू संस्कृतीवर डाग आहे. मुळात असे विवाह रोखण्यासाठी कलम 494, 495 आहेत. तरीही महाराष्ट्रात एका तरुणाने असे लग्न केले. सोलापुरातील या लग्नामुळे हिंदू संस्कृतीलाच धक्का लागत आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी नियम, कायदे करायला हवेत. तसेच, सोलापुरात असे लग्न करणाऱ्या तरुणालाही दंडित करायला हवे." अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
 
 
या जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात 2 डिसेंबर रोजी विवाह केला होता. त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर एकाने तरुणाविरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र, या प्रकरणात चौकशी करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. तक्रारदार हा कुटुंबातील सदस्य तसेच रक्ताच्या नात्यातील नाही, असे कारण न्यायालयाने दिले होते. अशा प्रकरणांत तक्रारदार हा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असल्याशिवाय आरोपच होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. हाच मुद्दा नवनीत राणा यांनी आज संसदेत उपस्थित करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0