३ वर्षांत ९ काश्मिरी पंडितांची हत्या

15 Dec 2022 11:41:36

नित्यानंद राय
नवी दिल्ली : केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “२०२० ते २०२२ या तीन वर्षांत खोर्‍यात मारल्या गेलेल्या काश्मिरी पंडितांची एकूण संख्या नऊ आहे, ज्यात काश्मिरी राजपूत समाजातील एका व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय आणखी एक माहिती देताना गृह राज्यमंत्री म्हणाले की, दि. २ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेने कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरणासह ४९७ गुन्हे दाखल केले आहेत.


आणखी एक महत्त्वाचा तपशील देताना, नित्यानंद राय म्हणाले की, “ ‘एनसीबी’ने गेल्या वर्षी केरळमधील बंदरांमधून १,२७४ कोटी रुपयांचे ६३७ किलो ’हेरॉईन’ जप्त केले आणि या संदर्भात ११ परदेशी लोकांना अटक केली.” गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, “देशात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याचे दर्शविण्यासाठी कोणताही अभ्यास/‘डेटा’ उपलब्ध नाही, तथापि सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार अमली पदार्थ वापरणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे.” नित्यानंद राय म्हणाले की, “केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि ‘आसाम रायफल्स’मध्ये महिला कर्मचार्‍यांची सध्याची संख्या १०,१२,५६८ च्या मंजूर बळाच्या तुलनेत ३४,२७८ आहे, म्हणजेच मंजूर संख्याबळाच्या ३.३८ टक्के आहे.”


केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले की, ’‘तेलंगण आणि मेघालयसह नऊ राज्यांनी काही गुन्ह्यांच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली आहे. दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट कायदा, १९४६ च्या ‘कलम ६’नुसार ‘सीबीआय’ला त्यांच्या अधिकारक्षेत्रात तपास करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांची संमती आवश्यक आहे,” असे त्यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Powered By Sangraha 9.0