भारत आता रशियाचा मजबूत व्यापारी भागीदार!

09 Nov 2022 16:45:27
jaishankar

नवी दिल्ली:युक्रेनसोबतच्या युद्धामुळे एकीकडे रशियावर युरोप आणि अमेरिकेने निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी जागतिक द्विपक्षीय व्यापारामध्येही अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचवेळी दुसरीकडे भारत हा रशियाचा मजबूत व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे, असे ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स’च्या नव्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

अहवालामध्ये म्हटले आहे की, अलीकडील काही महिन्यांमध्ये रशियाकडून आयातीचे व्यापार मूल्य वाढले आहे. खनिज तेल, नैसर्गित वायू आणि कोळशाच्या वाढत्या किमतींमुळे रशियन आयातीमध्ये वाढ झाली आहे. रशियाकडून आयात वाढविणार्‍या देशांच्या गटाचे नेतृत्व भारत करत आहे. रशिया-युक्रेन संघर्षास प्रारंभ झाल्यानंतर रशियाच्या आयात व्यापार मूल्यामध्ये 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. रशियाने डिसेंबरपासून युरोपला होणार्‍या नैसर्गिक वायू पुरवठ्याचे प्रमाण कमी केल्यास पाश्चात्त्य देशांची रशियासोबतची व्यापारी भागीदारी आणखी कमी होणार आहे.

रशियाकडून आयातीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे 2023 मध्ये भारताला व्यापारात गती येण्याचा अंदाज आहे. त्याचे व्यापार मूल्य निर्यातीत 3.5 टक्के आणि आयातीत 1.3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, तर त्याचे व्यापाराचे प्रमाण अनुक्रमे 3.8 टक्के आणि 7.3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.


जयशंकर-लाव्हरोव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा

देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत मंगळवारी मॉस्को येथे चर्चा केली. बैठक भारत-रशिया द्विपक्षीय सहकार्याच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरील दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि संबंधित हितसंबंधांचे मूल्यांकन करण्यासाठी ही बैठक होत असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे.


 
Powered By Sangraha 9.0