मुंबई : "संजय राऊत असतील किंवा शिल्लक सेनेतील नेते असतील. केवळ सहानूभुती घेणे हा एकमेव विषय सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. सत्तेतून पायउतार झाले, वर्षाबंगला सोडला.. तेव्हापासून ते आतापर्यत संजय राऊत यांच्यावर कर्नाटक कोर्टात जो काही गुन्हा दाखल होता, ती कोर्टाची प्रोसीजर आहे, समन्स निघतात, त्यानंतर सुनावणी असते, त्याकरिता बोलावले आहे. परंतु लोकांमध्ये असे चित्र निर्माण करणे की, माझ्यावर अन्याय होणार आहे, हल्ला होणार आहे… असं झालं तसं झालं. लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा एकमेव उद्योग आता या मंडळींना बाकी आहे. कर्नाटक सीमा वादाकरिता कित्येक लोकांनी मार खाल्लेले आहे. अनेक महिने तुरुंगवास भोगलेला आहे. सीमावादाचे ज्यावेळी आंदोलन होते तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेसाहेब आंदोलन करण्याकरिता गेले होते तेव्हा त्यांनी कर्नाटक चाळीस चाळीस दिवस तुरूंगात काढले आहे." असे म्हणत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांच्या वक्तव्याला पलटवार केला आहे.
"परंतु संजय राऊत आणि मंडळी लोकांची सहानुभूती घेण्याकरिता याचा कांगावा करीत आहेत, आणि सध्या हा एकमेव उद्योग आहे त्यांचा. का घाबरतात संजय राऊत साहेब ? आणि त्यांची काळजी घेण्याकरिता किंवा त्यांना काही होवू नये यासाठी महाराष्ट्र सरकार समर्थ आहे. सारखे मला असे करणार, तसे करणार, मला मारणार, मला मारण्याचा कट आहे. केवळ लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करणे हा एकमेव उद्देश त्यांचा आहे." असे ही ते पुढे म्हणाले.
राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना ते म्हणतात, "संजय राऊत साहेब रोज सकाळी साडे नऊ दहाला आपला भोंगा वाजवणार गिरणीचा भोंगा वाजतो तसा. राज्यसरकारवर आरोप करणार. या आरोपाची उत्तरे देण्याकरिता आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मोकळे आहेत का हो? रिकामटेकडे आहेत का संजय राऊतांसारखे? संजय राऊतांना नेमून दिलेले काम आहे हे की या दोघांच्याविरुद्ध बोलणे, राज्यसरकारच्या विरुद्ध बोलणे."
दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले, "या राज्याचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् कसा होईल या दृष्टीने काम करत आहेत, प्रत्येक मतदार संघात जात आहेत, प्रत्येक आमदारांशी चर्चा करत आहेत, विविध लोकांशी चर्चा करत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. रोजगार आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत. का ते संजय राऊतांच्या रिकामटेकडे पणाला उत्तर देत बसतील. केवळ सहानुभूती निर्माण करणे हा राऊतांचा एकमेव उद्देश आहे, विरोधक म्हणून बोलणे आणि स्वत:चे अस्तित्व जपणं..मी या विरोधी पक्षात आहेत, पवार साहेब ज्याप्रमाणे स्क्रिप्ट राईट करुन देतात त्याप्रमाणे बोलण्याचे काम संजय राऊतसाहेब करत आहेत. मला वाटत नाही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे." असे म्हस्के म्हणाले.