छत्रपतींचा अवमान झालायं शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडावं : उद्धव ठाकरे
24 Nov 2022 18:45:13
मुंबई : राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडावं, अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली. 'कुणीही यावं टपली मारुन जावं, अशी राज्याची अवस्था आहे.', अशी टीका त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यावर केली आहे. "ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, त्यांना राज्यपाल केले जात आहेत का?", असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्यपालपदाचा मान मी जपतोयं पण कुणीही व्यक्ती राज्यपाल पदाची झुल पांघरली म्हणून वेडेवाकडे वक्तव्य करेल, ते महाराष्ट्र सहन करावे लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, त्यामुळे अशी वक्तव्ये खपवून घेतले जाणार नाही. आदर्श पुसण्याचा हा प्रयत्न होतोयं. या गोष्टीचा आम्ही निषेध तर नोंदविलेलाच आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ गुजरातला चाललंयं, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राचा सातत्याने अवमान होत आहे. महाराष्ट्रातील गावांवरती कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करत आहेत, हे देखील महत्वाचे आहे. बोम्बोई जे काही बोललेत ते वरिष्ठांच्या परवानगी शिवाय बोललेत का? आज शरद पवार बोलले. उदयनराजे बोलले. अनेकजण निषेध करतायतं. मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतोयं की, महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र या, असेही ते म्हणाले.
सर्व पक्ष एकत्र येऊन याबद्दल भाजपमधील महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र यावं, असेही ते म्हणाले. तसेच वेळ आली तर महाराष्ट्रही बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून याबद्दल काहीही अपेक्षा नाही, असेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र प्रेमी असाल तर सत्तेतून बाहेर पडा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राऊतांची सुरक्षा का काढली?
संजय राऊतांच्या सुरक्षेतील कपातीबद्दल प्रतिक्रीया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "संजय राऊतांच्या सुरक्षेतील कपात का झाली? त्यांच्याबद्दल काही बरंवाईट झालं तर त्याला सरकारच जबाबदार असेल. असेही ते म्हणाले.
श्रद्धा वाळकरच्या प्रश्नावर टाळाटाळ!
उपस्थित पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणावर प्रश्न विचारला होता. मात्र, त्यावर बोलण्यास उद्धव ठाकरेंनी उत्सुकता दाखविली नाही. शिवाय यावेळी राऊतांनीही मध्यस्ती करत त्यावर आता नाही, असं म्हटलं.