मुंबई : दिल्ली श्रद्धा वाळकर हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आता या केससंबंधी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. यातच माध्यमांसमोर श्रद्धाने लिहिलेले पत्र समोर आले आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वीच आपली हत्या होण्याची भीती व्यक्त करणारे पत्र पोलिसांना लिहिले होते. मात्र तेव्हा महाविकास आघाडी सरकार असताना पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यावरून आता राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान पवारांना महाविकास आघाडी काळात पत्राकडे का दुर्लक्ष केले असे विचारले असता, ते म्हणाले, "मागे काय झाले त्यावर बोलण्यापेक्षा आता गृहमंत्रीपद ज्यांच्याकडे आहे, त्यांनी योग्यशीर कारवाई करावी." असे पवार म्हणाले. पण, शरद पवारांच्या या विधानावर आपण मागे वळून पाहिले, तर त्यावेळी महाविकास आघाडीच्या काळात गृहखातं हे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे होते. त्यामुळे पवारांनी पुन्हा एकदा चातुर्याने माध्यमांसमोर आपली बाजू सावरत प्रतिक्रिया दिल्याचे समजते.