दोघे भाऊ आणि धाकटी लाडकी बहीण यांना घेऊन ज्ञानेश्वरांनी आपल्या अस्तित्वासाठीची लढाई लढली. आई वडिलांच्या पश्चात आपला स्वीकार व्हावा म्हणून ते पैठणला गेले. या काळात त्यांचे नियमित अध्ययन चालूच होते. विचारांची शिदोरी सदैव सोबत होती. धर्माचा प्रगाढ अभ्यास त्यांचा झाला. अशातच लोकांना आपण आचरणात आणत असलेल्या धर्माचा अर्थ सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. भगवद गीता आपला धर्म ग्रंथ याच गीतेचे सार तत्कालीन लोकांना सोप्या भाषेत समजावण्याचे महत्वपूर्ण कामं ज्ञानेश्वरीने केले.
ज्ञानेश्वरांचा आज समाधी दिवस. समाधी दिवशी काय होत? आषाढी एकादशीला जशा संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जातात, तशा समाधी दिनाच्या दिवशी विठ्ठल स्वतः दर्शनाला आळंदीत येथो असं म्हणतात. म्हणून कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून वारकरी विठ्ठलाच्या पादुका घेऊन आळंदीला येतात. यावेळी विठ्ठलासोबत नामदेवाच्या पादुकापण आणल्या जातात. ज्या नंतर आषाढ महिन्यातच एकादशीच्या दिवशी पंढरपूरला परत जातात.
या वर्षीचा म्हणजे २०२२ चा समाधी दिवस म्हणजे सातशे सव्वीसावा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनीअवघ्या 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती. या इहलोकाचा त्याग करून आळंदीस ते समाधिस्त झाले. त्यामुळे ज्ञानोबा माऊलींच्या भक्तांसाठी या दिवसाचं विशेष महत्त्व असतं. संत ज्ञानेश्वरांनी कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी समाधी घेतल्याने दरवर्षी याच तिथीला आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.
हा उत्साह इतका मोठा असतो कि एका दिवसाचा कार्यक्रम न राहता सम्पूर्ण सप्ताह भाविक साजरा करतात. कार्तिक वद्य अष्टमी पासून ते येत्या अमावास्येपर्यंत येथील उत्सवास बहार येते.
संत ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून लोककल्याणाचे काम केले. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवत गीतेचे तत्कालीन मराठी भाषांतर. अर्जुनाला समजेल अशा शब्दात सांगितलेली गीता त्यानंतरच्या काळातील मराठी भाषिकांना समजणारी नव्हती. भाषा न समजून घेता लोकांनी निववळ ग्रंथ पूजन करू नये तर गीतेचा सार त्यांना आकळावा असे वाटून ज्ञानेश्वरांनी गीता लोकांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितली. लोक कल्याणाची जबाबदारी आपलीच आहे ही समज ज्ञानेश्वरांना सोळाव्या वर्षीच आली. संजीवन समाधी घेऊन त्यांनी त्यांच्यापुरता कार्य थांबवलं.. परंतु माझे प्रश्न अजून संपले नाहीतच. त्यांना वेगळं वळण मात्र मिळालं. समाधी म्हणजे सोप्या शब्दात जीवन संपवण्याचा निर्णय. नामदेव त्यावेळी आळंदीस हजर होते. ते लिहून ठेवतात,- " ज्ञानदेवांपाशी आनंदी आनंद ..सुखी ज्ञानदेव सुखावला.. " आपण जीवन केव्हा संपवतो? वैफल्यग्रस्त होऊन? समाधानी होऊन? समाधान आणि सुख यात फरक काय? आपल्या मृत्यूवर सुद्धा आपलं नियंत्रण मिळवायचं असेल तर आपण समाधानी असायला हवं. आपापलं समाधान आपापल्याला शोधता येईल हवं.