मी काँग्रेससोबत एकत्र आलो तर त्यात चुकीचं काय? : उद्धव ठाकरे

17 Nov 2022 18:58:11

उद्धव ठाकरे
मुंबई : मी देशाच्या हितासाठी काँग्रेस सोबत एकत्र आलो तर त्यात काय चुकलं, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विचारला आहे. विशेषतः राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी भाजपच्या मातृसंस्थेचं नेमकं स्वातंत्रलढ्यात योगदान काय, असा प्रतिप्रश्न केला आहे. तसेच आम्ही देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर नेमकं काय चुकलं, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून राज्यात वादंग निर्माण झाले आहे. सावरकर कुटुंबियांसह भाजपने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून काही राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राहुल यांच्या या विधानाशी आपण सहमत नसल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे प्रमुख उध्व ठाकरेंनी या प्रकरणावरून हात झटकले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ठाकरे अर्कचित्र प्रदर्शनाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत नाही.
आमच्या मनात सावरकरांच्या विषयी आपुलकी, प्रेम आणि आदर आहे आणि कायम राहील. ती कधीही पुसली जाणार नाही. सावरकरांनी देशासाठी त्याग केला. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हाल अपेष्टा सोसल्या. त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आता गरज आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी गांधींच्या विधानावरून फारकत घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0