मुंबई : भारत जोडो यात्रादरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनाकडून निदर्शने, आंदोलन केले. राज्यभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती.
या दरम्यान, काँग्रेसचे राजकारणी आणि शांतीनगर मतदारसंघातील कर्नाटक विधानसभेचे सदस्य नलपाद अहमद हरिस आणि राहुल गांधींच्या 'भारत जोडो' बॅनर मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असल्याचे पाहायला मिळाले. सावरकरांविरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या भारत जोडो च्या बॅनरबाजीत का फोटो वापरण्यात आला? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
शिवाय, एर्नाकुलमच्या भारत जोडो च्या बॅनरबाजी मध्ये वीर सावरकरांचा फोटो पाहायला मिळाला. खरे तर काँग्रेस सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक मानत नाही. काँग्रेसच्या रॅलीत विनायक दामोदर सावरकर यांच्या फोटोचा मुद्दा केरळचे अपक्ष आमदार पीव्ही अन्वर यांनी सर्वप्रथम उपस्थित केला होता. काँग्रेसच्या कॅम्पला याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सावरकरांच्या फोटोवर महात्मा गांधींचा फोटो चिकटवला. “ही चूक फोटो प्रिंटरने केली होती." असे सांगण्यात आले.
आजी चे पत्र वाचले नाही का?
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एका पत्रात धाडसी म्हणून उल्लेख केला. राहुल गांधींनी आपल्या आजीचे ते पत्र वाचले नाही का? सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, असा दावा गुरुवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केला. त्यावर हिंदू महासभेने जोरदार आक्षेप नोंदवत इंदिरा गांधी यांचे एक जुने पत्र समोर आणले आहे.
पत्रावर २० मे १९८० अशी तारीख आहे. या पत्रावर इंदिरा गांधी यांची सही सुद्धा आहे. इंदिरा गांधी यांनी या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिताना धाडसी असा उल्लेख केला आहे. सावरकरांच्या जन्मशताब्दीबद्दल स्वतःच्या खात्यातून अकरा हजार रुपयांची देणगीही प्रतिष्ठानला दिली आहे.