भारत जोडो की भारत तोडो? : राहुल गांधींचं पुन्हा एकदा सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य!
17 Nov 2022 18:56:06
अकोला : 'भारत जोडो यात्रा' दरम्यान राहुल गांधींनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, याचा पुनरुच्चार केला. सावरकरांविरोधात वक्तव्ये केल्यानंतर राहुल गांधी माफी मागणार का याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, मी सावरकरांनी मागितलेल्या माफीनाम्याचे पुरावे आपल्याला देऊ इच्छितो, असेही ते म्हणाले. राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकरविरोधी गरळ ओकल्यानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे राहुल गांधींनी भारत जोडो ही यात्रा हे लोकांना जोडणारी यात्रा आहे, असे सांगताना दिसतात मात्र, स्वतःची विचारधारा रेटण्याचं काम यावेळी काँग्रेसी नेत्यांकडून होताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे संजय राऊत गप्पच!
राहुल गांधींनी केलेल्या सावरकरविरोधी वक्तव्याबद्दल शिवसेना उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी साधा निषेधही नोंदविलेला नाही. उलट राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रीया देताना रा.स्व.संघाच्या स्वातंत्र्याबद्दलच्या भूमिकेबद्दलच प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नेमकं काय?, असा प्रश्न त्यांनी विचारलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आठ वर्षे भारतरत्न पुरस्कार का दिला नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, "पाकिस्तान पूर्ण घेण्याचं सोडा पण पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमीन तरी आपण घेतली का?", असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून राज्यात वादंग निर्माण झाले आहे. सावरकर कुटुंबियांसह भाजपने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून काही राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राहुल यांच्या या विधानाशी आपण सहमत नसल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे प्रमुख उध्व ठाकरेंनी या प्रकरणावरून हात झटकले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ठाकरे अर्कचित्र प्रदर्शनाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत नाही. आमच्या मनात सावरकरांच्या विषयी आपुलकी, प्रेम आणि आदर आहे आणि कायम राहील. ती कधीही पुसली जाणार नाही. सावरकरांनी देशासाठी त्याग केला. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हाल अपेष्टा सोसल्या. त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आता गरज आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी गांधींच्या विधानावरून फारकत घेतली आहे.