मेरा अब्दुल वैसा नहीं है!

15 Nov 2022 13:37:22

prasad
 
 
श्रद्धा विकास वालकर. वसईच्या कोळी समाजातली ही मुलगी. अस्सल मराठी. आई-वडिलांचे वाद-विवाद होते म्हणून आई आणि मुले एकत्र राहायचे आणि वडील विकास वालकर त्यांच्या आईसोबत वेगळे राहायचे. श्रद्धा कॉल सेंटर मध्ये काम करायची. तिथेच टिंडर का असल्या कुठल्या तरी डेटिंग ऍपवरून तिला आफताब पूनावाला भेटला. हे टिंडर वगैरे ऍपस म्हणजे काही वधूवर सूचक मंडळ नाही. तिथे सहसा तरुण-तरुणी कॅजुअल सेक्स साठी जातात.
२०१८ मध्ये श्रद्धा आणि आफताब ह्या ऍपवर भेटले आणि ह्या आफताबने काय जादू केली कोण जाणे, पण श्रद्धा त्याच्या प्रेमात वेडी झाली. आई-वडिलांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी तिला समजवायचा खूप प्रयत्न केला. तेव्हा ही पोरगी उर्मटपणे बापाला म्हणाली, ‘मी पंचवीस वर्षांची आहे, माझे मी निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. मी आफताब बरोबर जाणार तुम्हाला आवडत नसेल तर मी आजपासून तुमची मुलगी नाही असं समजा’. कायदा तिच्या बाजूने होता, बिचारा विकल बाप करणार तरी काय होता?
आई-वडिलांशी सर्व संबंध तोडून २०१९ मध्ये श्रद्धा वसईमध्येच आफताब बरोबर लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागली. तिची ख्याली खुशाली समजायला तिचा भाऊ तिचे इन्स्टा पेज बघत असे. मध्येच तिने आईला फोन करून सांगितलं की आफताब तिला मारायचा, तिचा शारीरिक छळ करायचा. ह्याच दरम्यान २०२० मध्ये तिच्या आईचा मृत्यु झाला. त्यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी श्रद्धाशी परत नाते जुळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्यांनाही सांगितलं की आफताब तिला मारतो. तेव्हा वडिलांनी तिला आफताबला सोडून घरी परत यायला सांगितलं. पण आफताबने माफी मागून तिला परत आपल्या बरोबर यायला सांगितलं आणि ती गेलीही, वडिलांशी परत संबंध तोडून. त्यानंतर वडिलांना ती कुठे राहते, काय करते हे काहीही माहिती नव्हतं. दुखावले असणार तेही.
२०२२ मध्ये श्रद्धाच्या भावाला तिच्या लक्ष्मण नाडर नावाच्या मित्राचा फोन आला, त्याने श्रद्धाच्या भावाला सांगितले की श्रद्धा अधून मधुन त्याला फोन करायची पण गेले दोन महिने तिचा फोन बंद येत होता. मुलाने वडिलांना सांगितलं. त्यांनीही तिला फोन करायचा प्रयत्न केला, तिचं इन्स्टा अकाउंट चेक केलं तर त्यांना दोन महिने काहीच ऍक्टिव्हिटी दिसली नाही. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर चक्रे फिरली आणि श्रद्धा आणि आफताब दिल्लीत आहेत अशी माहिती मिळाली. ही सर्व माहिती विकास वालकर यांनी दिलेल्या FIR मध्ये नोंदलेली आहे.
त्यानंतर दिल्ली पुलिसांच्या तपासातून जी माहिती मिळाली ती फार भयानक होती. श्रद्धाला आफताबशी लग्न करायचं होतं पण त्याचा तिच्यातला इंटरेस्ट संपलेला होता. तिच्या मृत्यूपूर्वी दहाच दिवस आफताब श्रद्धाला दिल्लीला घेऊन गेला होता. तिथे त्यांनी मेहरोली येथे भाड्याने घर घेतलं होतं, तेही बहुधा आफताबने आजूबाजूला झाडी/जंगल आहे हे पाहूनच घेतलं असावं. तो शेफही होता, साहजिकच त्याला मांसाचे तुकडे करायची सवय होती. श्रद्धाला गळा दाबून मारल्यानंतर त्याने अत्यंत थंड डोक्याने तिच्या देहाचे पस्तीस तुकडे केले. त्यानंतर त्याने एक फ्रिज विकत घेतला व त्यात ते तुकडे ठेवले. पुढचे १८ दिवस तो प्रत्येक रात्री त्यातले काही मानवी देहाचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात विखरून टाकत असे, जनावरांनी खाऊन पुरावा नष्ट व्हावा म्हणून. ज्या दिवशी त्याने श्रद्धाचा खून केला त्याच दिवशी त्याने नंतर झोमॅटोवरून जेवण मागवून शांत डोक्याने त्याच घरात निवांत बसून जेवणही केलं होतं. इतकंच नव्हे तर त्याने काही काळ श्रद्धाच्या फोनवरून तिच्या मित्र मैत्रिणींना मेसेजेसही पाठवले, ती जिवंत असल्याचे भासवण्यासाठी.
ह्या आफताबची आधीही हिंदू मुलींसोबत लफडी होती. त्याच्या इन्स्टा पेजवर जवळजवळ २८ हजार फॉलोवर आहेत. काय त्याच्यात हिंदू मुलींना दिसलं कुणास ठाऊक. बाकीच्या मुली नशीबवान निघाल्या, बिचाऱ्या जिवंत तरी आहेत. श्रद्धा मात्र हकनाक मेली. ज्या आफताबच्या नादी लागून तिने वडीलांना ’तुमची मुलगी मेली असं समजा’ असं सांगून त्यांच्याकडे पाठ फिरवली, शेवटी त्याच वडिलांच्या पाठपुराव्याने तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं.
हिंदू मुली मुसलमान मुलांच्या पाठी इतक्या पागल का होतात हे मला कधीच कळलेलं नाही. ’इंटर-फेथ’ असं गोंडस नाव दिलेल्या अश्या विवाहात नेहमी पुरुष मुसलमान आणि बाई हिंदू का असते? रडणाऱ्या-भेकणाऱ्या आई-बापाला लाथाडून ह्या मुली मुसलमान मुलांच्या मागे का जातात. गेल्या पाच वर्षातच मी दहा तरी अश्या केसेस दाखवू शकते जिथे मुसलमान नवरा/मित्र यांनी हिंदू मुलींचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून केलेला आहे. अश्या बातम्या पेपरमध्ये दर महिन्याला येत असतात तरी हिंदू मुली अश्या का वागतात. ’मेरा अब्दुल वैसा नही है’ ची अशी कसली नशा असते?
 
 
 
Powered By Sangraha 9.0