हिंदू स्त्री असणं म्हणजे नक्की काय?

09 Oct 2022 20:18:40
hindu women
 
 
 
देशासह इराण अन् अनेक कट्टरपंथी देशांत स्त्रियांवर हिजाबसक्ती केली जात असताना अन् स्त्रियांकडून त्याला विरोध केला जात असताना यंदाच्या दसर्‍याला मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक ध्वज संचलनाप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कालानुरूप व्यवस्थात्मक आणि सामाजिक बदल होण्याची गरज कशी आहे, हे विशद करताना स्त्रीशक्तीचा आदर आणि स्त्रीशक्तीचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले.
 
 
स्त्रीयांचे चारित्र्य हा आपल्या समाजामध्ये सार्वत्रिक व सार्वकालिन चर्चिला जाणारा विषय आहे. जेवढी चर्चा स्त्रियांच्या चारित्र्याची होते, तेवढी त्यांच्या चरित्राची मात्र होत नाही. त्यातही विशिष्ट क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या स्त्रियांचे चरित्र हा कौतुकाचा आणि अभ्यासाचा विषय होतो पण ते तेवढेच. आपल्या समाजाचा राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाश हा पुरुषप्रधानतेने व्यापला आहे आणि कित्येक शतकांपासून ही परिस्थिती बदललेली नाही. प्रत्येक समाजाची स्त्रीबद्दल एक विशिष्ट प्रतिमा असते आणि स्थलकालस्थितीसापेक्ष त्या-त्या समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि परंपरागत धारणांनुसार ही प्रतिमा निर्माण होते. अर्थात, या प्रतिमेस अनुसरून त्यास अनुकूल असे वर्तन स्त्रियांकडून अपेक्षिले जाते.
 
 
अशीच एक बहुचर्चित प्रतिमा म्हणजे ‘हिंदू स्त्री.’ काळाच्या ओघात केवळ ‘चूल आणि मूल’ एवढीच मर्यादित कामे न करता स्त्रियांनी या चाकोरीतून मुक्त झाले पाहिजे, असा उदारमतवादी विचार हिंदू समाजाने स्वीकारला असला, तरीदेखील लौकिक अर्थाने स्त्रियांवरच्या जबाबदार्‍या आणि सामाजिक बंधने अजून तशीच आहेत. वानगीदाखल दिली जाणारी गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा आणि उभयभारती अशी काही उदाहरणे वगळता प्राचीन काळातदेखील स्त्रियांच्या चरित्र गौरवाची फारशी उदाहरणे आपल्याला आढळत नाहीत. भारतीय समाज आणि भारतीय संस्कृती आणि त्यातील व्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी व त्यासाठी सतत कार्यरत असणारी स्त्री ही हिंदू स्त्रीची साधारण प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.
 
 
धार्मिकदृष्ट्या सर्व प्रकारच्या धर्मांनी आचरणाची एक विशिष्ट चौकट समाजस्वास्थ्यासाठी घालून दिलेली आहे आणि त्यात स्त्रियांना कायम दुय्यम स्थान देऊन त्यांच्यासाठी नीतिनियमांची चौकट अधिक बळकट केली आहे. विशेषतः मुस्लीम समाजात या जाचक बंधनातून मुस्लीम स्त्रियांचे सबलीकरण होणे, हे नजीकच्या भविष्यात तरी अवघड दिसते. अजूनही मुस्लीम स्त्रिया हिजाब आणि बुरखा या बंधनातून सुटलेल्या नाहीत व त्यामुळे स्त्रियांच्या दृष्टीने सामाजिक सुधारणा घडून येणे, हे मुस्लीम समाजाच्या दृष्टीने जवळपास आवाक्याबाहेरचे दिसते. हिंदू स्त्रीबद्दलदेखील अशीच एक चौकट फार पूर्वीपासून आखण्यात आली होती. परंतु, आजवरच्या प्रवासात हिंदू स्त्रिया तुलनेने खूप सुधारणावादी झालेल्या दिसून येतात.
 
 
त्यामुळे अनेक क्षेत्रात त्यांनी नाव कमावल्याचे दिसते. वैज्ञानिक संशोधन, ‘आयटी’, जैवतंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत स्त्रियांनी आपले पाय घट्ट रोवले असून त्या या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहेत. हळूहळू हिंदू स्त्रीची प्रतिमा आणि भारतीय समाजाचे वास्तव दोन्ही बदलत आहे. परंतु, या वास्तवाच्या तळाशी गेल्यास एक कठोर सत्य समोर येते. साधारणतः मध्यमवर्गीय शहरी नोकरदार स्त्रियांचा विचार केल्यास त्यातल्या बहुतेक जणींची नोकरी ही गृहकर्जाचे हप्ते फेडणे, मुलांच्या शाळांचे शुल्क भरणे आणि घर खर्चात वाटा उचलणे एवढीच मर्यादित असते. परंतु, त्याला लौकिक अर्थाने ‘करिअर’ असे म्हणता येणार नाही.
 
 
एका सर्वेक्षणानुसार नोकरी करणार्‍या स्त्रियांपैकी केवळ नऊ टक्के स्त्रियांना मालकी हक्क मिळतो आणि निर्णयस्वातंत्र्यदेखील मिळते. अशा मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रियांची अडचण दुहेरी स्वरूपाची असते. एकीकडे नोकरी, प्रवास, कामाचा ताण आणि दुसरीकडे घरातल्या जबाबदार्‍या, धार्मिक सण-उत्सव साजरे करणे व्रत-वैकल्ये, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, आर्थिक विवंचना या सगळ्या अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते. तसेच धार्मिक सण-उत्सव आणि सगळी कर्तव्य सांभाळून धर्मरक्षण आणि संस्कृती टिकवण्याच्या भल्या मोठ्या अपेक्षांचे ओझंदेखील प्रामुख्याने अशाच स्त्रियांच्या खांद्यावर असते. ग्रामीण भागातील वास्तव यापेक्षा वेगळे आहे. ग्रामीण स्त्रियांना संधी आणि स्वातंत्र्याचा अभाव, मर्यादित संसाधने यांचा सामना करावा लागतो. याशिवाय चालीरीतींच्या ओझ्याखाली ग्रामीण जीवनाचा गाडा ओढत त्यांना संसार करावा लागतो. ग्रामीण भागात स्त्रियांचे मनुष्यबळातील प्रमाण केवळ 21 टक्के एवढंच आहे. या वास्तवाला अनेक घटक कारणीभूत ठरतात. परिणामी, अर्ध्याहून अधिक स्त्रिया या मुख्य धारेत न समाविष्ट होता दुर्लक्षित राहतात. परिणामी, आपल्या देशाची उत्पादक शक्ती वाया जाते आणि अपरिमित हानी होते.
 
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा निर्माण होतो की, धार्मिक सण आणि उत्सव आणि परंपरा पुढे चालवून धर्म टिकवण्याची आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी केवळ स्त्रीचीच आहे का? दैनंदिन जीवन सुकर व्हावे म्हणून स्त्रियांना कौटुंबिक पातळीवर मदतीचा हात मिळावा, ही अपेक्षा चुकीची आहे का? स्त्रीला मुक्त श्वास घेण्याचा अधिकार नाही का? अर्थात, स्वातंत्र्याचा हक्क मागणं म्हणजे ‘फेमिनिझम’ नव्हे, हे आधी लक्षात घ्यायला हवं. पाश्चात्त्य लोकांच्या कल्पनेतील ‘फेमिनिझम’ आपल्या देशात कधीही अस्तित्वात येऊ शकणार नाही, हेही यानिमित्ताने समजून घ्यायला हवं. परंतु, एक समाज म्हणून जेवढ्या हिरीरीने आपण संस्कृती रक्षण आणि सामाजिक बदलांबद्दल बोलतो, तेवढ्याच तळमळीने आपण धार्मिक सुधारणांबद्दल विचार करणार आहोत की नाही? एक समाज आणि राष्ट्र म्हणून आपल्याला प्रगत व्हायचे असेल तर धार्मिक सुधारणांना पर्याय नाही.
 
 
धार्मिक, परंपरागत जीवनात स्त्रियांना अनुलक्षून आणि लवचिक दृष्टिकोन बाळगून त्यात सुधारणा होण्याबाबत स्त्रियांनीच आग्रही होणे गरजेचे आहे. यंदाच्या दसर्‍याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक ध्वज संचलनाप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कालानुरूप व्यवस्थात्मक आणि सामाजिक बदल होण्याची गरज कशी आहे, हे विशद करताना स्त्रीशक्तीचा आदर आणि स्त्रीशक्तीचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. आजवर पुरुषप्रधान म्हणून गणल्या जाणार्‍या आपल्या समाजात एक विशिष्ट प्रकारचा ‘नॅरेटिव्ह’ म्हणजेच विमर्श प्रस्थापित झालेला होता. परंतु, हा ‘नॅरेटिव्ह’ आता बदलून नवा, समानतेवर आधारित समाज निर्माण होण्यासाठी स्त्री मताचा आदर आणि स्त्री मताचा अवलंब होण्याची गरज आहे. शतकानुशतके चालत आलेल्या रुढी आणि परंपरांमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणले पाहिजेत आणि ते बदल समाजाने आत्मसात केले पाहिजेत.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर प्रथमच स्त्रीशक्तीची उपस्थिती दृश्य स्वरूपात जाणवणे आणि समाजात तसे बदल घडून येण्यासाठी विचारमंथन करणे, हे स्वागतार्ह पाऊल आहे. परंतु, ही प्रक्रिया अशीच निरंतर पुढे चालत राहायला हवी. समाजाच्या सर्व स्तरांत ही जाणीव निर्माण व्हायला हवी. भारतीय समाज म्हणून आपला धर्म, राष्ट्रविचार आणि संस्कृती याबद्दलचा दृढ अभिमान मनात बाळगून, आपली मुळं मातीशी घट्ट जोडून ठेवून कालसुसंगत आणि स्त्रीशक्ती अनुकूल अशा सुधारणा घडवून आणणे, ही आपल्यापैकी प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आणि तरच या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होईल.
 
 
-अपर्णा कुलकर्णी
(लेखिका मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0