असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय असे दसरा सणाच्या बाबतीत म्हटले जाते. पौराणिक दृष्ट्या विचार करता प्रभू रामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध करून वाईटावर मात केली होती असे म्हटले जाते. म्हणूनच हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगानेच या दशमी ला विजयादशमी च्या नावाने संबोधतात. भारतीय संस्कृतीत वर्षाच्या तीन सर्वात शुभ मुहूर्तांपैकी दसरा एक आहे. या दिवशी लोकं नवीन काम सुरू करतात. या दिवशी शस्त्राची आणि वाहनांची पूजा करतात. पौराणिक गोष्टींचा संदर्भ आजच्या काळाशी जोडल्यास आणि त्यातून काही शिकल्यास आपल्या जीवनातील अनेक व्हायरस वर विजय मिळवून आपण अनेक अचिव्हमेंट्स चे सोने लुटण्याचा संकल्प या दिनाला करू शकतो.
प्राचीन काळात राजा या दिवशी विजयची इच्छा करून आणि त्या साठी देवाकडे प्रार्थना करून युद्ध यात्रे साठी जात असे. आज राजे-महाराजे नसून स्वतंत्र भारतात आपण लोकशाही स्वीकारली आहे. आज आपण प्रत्येक जण स्वतःच्या जीवनाचे राजे आहोत. म्हणून आपल्या जीवनातील वाईट गोष्टींवर विजय मिळविण्याची जबाबदारी हि प्रत्येकाची व्यक्तिगत आहे.
दसऱ्याच्या सणाला आपण या दृष्टीने देखील पाहू शकतो. आपल्याला परंपरा तर जपायाच्याच आहेत शिवाय त्या परंपरांना आजच्या काळाशी सुसंगतरित्या जोडणे ही देखील आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. ही एक कला आहे जी आपण सर्वांनी आपापल्या आयुष्यात अवगत केली पाहिजे. विजयादशमीचा संबंध नवरात्रीशी देखील आहे. कारण नवरात्राच्या नंतरच हा सण साजरा करतात आणि या सणामध्ये महिषासुराच्या विरोधात देवी आईच्या धाडसी कार्यांचा उल्लेख देखील मिळतो.
दसरा किंवा विजया दशमी नवरात्राच्या नंतर दहाव्या दिवशी साजरा करतात. व्यक्तिगत जीवनात आपण असे संकल्प आणि स्वतःला प्रोत्साहन देणाऱ्या अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे या सणाचे महत्व आणखी वाढेल. जसे की मघाशी म्हटल्या प्रमाणे आपल्या जीवनातील व्हायरस काढण्याचा विचार करता आपण आजपासून असे देखील करू शकतो की सध्या बोकाळलेल्या सोशल मीडियाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून त्याला मर्यादित करू शकतो. तासनतास सोशल मीडियावर गप्पा हाणण्यापेक्षा आपण आपल्या स्वकीयांना, जवळच्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा कमीतकमी फोन करून त्यांच्याशी संवाद साधू शकतो.
या 'नेक' कामाची सुरुवात करायला दसऱ्यासारखा आणखी कोणता शुभ मुहूर्त असू शकतो. दसऱ्याच्या शुभेच्छा एस एम एस ने किंवा रेडिमेड ग्रीटिंग्स ने न देता प्रत्यक्ष भेटून किंवा कॉल करून देऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आपण या दिवसापासून आपल्या जीवनात इम्प्लिमेंट करू शकतो.
भारतीय संस्कृती नेहमीच शौर्य आणि वीरताची समर्थक आहे. दसऱ्याचा सण देखील शक्तीच्या प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी आपण असे संकल्प देखील करू शकतो की आपल्या ज्या काही स्ट्रेंथ आहेत त्या अधिक बळकट करू शकतो. त्यावर अधिक परिश्रम घेण्याची सुरुवात आपण या दिवसापासून करू शकतो. किंवा असे देखील करू शकतो की आपल्यातील नऊ असे गुण किंवा उजव्या बाजू आपण शोधल्या पाहिजेत ज्या आपल्या करीअर किंवा सर्वांगीण जीवनाला गती, प्रगती देतील आणि त्या स्ट्रेंथवर आपण मेहनत घेऊन आयुष्यात अधिक प्रगती साधली पाहिजे.
हा सण संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात, मातेच्या दुर्गाच्या विविध रूपांची संपूर्ण 9 दिवस पूजा केली जाते, काही लोक या 9 दिवसांमध्ये उपवास देखील ठेवतात. या 9 दिवसांच्या उत्सवाला नवरात्री असेही म्हणतात ज्यामध्ये आईच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी आईच्या आरत्या होतात, प्रसाद वाटला जातो, ढोल -ताशे वाजवले जातात आणि लोक हा सण आनंदाने साजरा करतात.
त्याचप्रमाणे, उत्तर भारतातील लोक देखील त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेनुसार हा सण साजरा करतात. सध्याच्या काळात आपण खूप संकुचित देखील होत चाललो आहोत. इतरांची जात, धर्म, भाषा, प्रांत, राहणीमान आणि इतर अनेक गोष्टींना धरून आपण खूप लहान विश्व स्वतःचे निर्माण करू पाहतोय. दसरा या सणापासून आपण हे देखील शिकू शकतो की आपले प्रांत, भाषा, जात-धर्म जरी वेगवेगळे असले तरी आपली ओळख एकाच असली पाहिजे ती म्हणजे भारतीय. आपल्या मनांमधील या रावणाला जरी आपण आजच्या दिनाला बाहेर काढण्याचा संकल्प केला तरी खूप मोठी गोष्ट होईल. आजच्या दिनाला संकल्प करूया. मनामनातील जे काही वाईट व्हायरस आहेत त्यांच्यावर विजय मिळवू या आणि या दिनाचे आणखी महत्व वाढवू या. आपणा सर्वांना विजया दशमीच्या स्वर्णीम शुभेच्छा!
-हेमंतकुमार आ नेहतेसर