कडू वादाचा शेवट गोड होणार ?

31 Oct 2022 13:23:22

Bachchu kadu and Ravi rana  
 
बच्चू कडू - रवी राणा
 
 
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या वादात एंट्री झाल्याने हा वाद मिटणार या कडे लक्ष लागून राहिले आहे. आज सकाळी रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांच्याविषयी वापरलेले शब्द मागे घेत असल्याचे म्हणत सामंजस्याची भूमिका दाखवली आहे. त्यामुळे राणा आणि कडूवादाचा शेवट आता तरी गोड होणार का ? याविषयी उत्सुकता वाढली आहे.
 
 
रवी राणा यांची सामंजस्याची भूमिका
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी सामंजस्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, 'बच्चू कडू आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेतील सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी हे माझे सहकारी आहेत. बच्चू कडू आणि आमच्यात काही मतभेद होते, अनेक वर्षे आम्ही सोबत काम केलेले आहे. आम्ही फडणवीस शिंदे सरकारचे सहकारी घटकपक्ष असून आम्ही आज सरकार सोबत आहोत आणि यापुढेही सरकारासोबतच राहणार आहोत हे स्पष्ट आहे. मी बच्चू कडू आणि इतर सहकाऱ्यांविषयी केलेले विधान मागे घेत आहे, असे राणा यांनी म्हटले आहे. तसेच, 'बच्चू कडू यांनी देखील आपल्याविषयी जे काही आक्षेपार्ह विधान आणि शब्द वापरले आहेत, ते त्यांनी मागे घ्यावेत अशी भूमिका रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांसमोर मांडली आहे.
 
 
बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष
 
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीनंतर राणा यांनी एक पाऊन मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप बच्चू कडू यांची त्यावर प्रतिक्रिया अधिकृतपणे प्राप्त झालेली नाही. राणा यांनी मांडलेल्या भूमिकेला बच्चू कडू प्रतिसाद देणार का की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार हे याकडे भाजप शिवसेनेसह महाराष्ट्राचे लक्ष आहे.
 
 
फडणवीस शिंदेंची मध्यस्ती यशस्वी होणार का ?
 
अमरावतीतील या दोन आमदारांमधील संघर्षाची धग थेट मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचली आहे. राज्यातील फडणवीस शिंदे सरकारला समर्थन देणाऱ्या या दोन्ही आमदारांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी काल रात्री वर्षावर रवी राणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दोन तासांपेक्षा अधिक चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र, त्यानंतरही वादावर विशेष तोडगा निघाला नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा वाद कुठपर्यंत जाणार ? आणि फडणवीस शिंदेंची मध्यस्ती यशस्वी होणार का ? याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचेही लक्ष केंद्रित झाले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0