दीपावली : ज्ञानाच्या प्रकाशातून अज्ञानाच्या अंधाराचे दहन

21 Oct 2022 20:49:55
woman lamp


अज्ञानाचा अंधार नाहीसा करून मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश उजळवणारा दिवाळीचा सण. सोनपावलांनी येणार्‍या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला आध्यात्मिक-सांस्कृतिक महत्त्व आहे. त्याविषयी...


दीपावली म्हणजे स्नेहाच्या-प्रेमाच्या प्रकाशाची उधळण होय. दिवाळी-दीपोत्सव म्हणजे खर्‍या अर्थाने आनंदाचा-प्रकाशाचा सण आहे. वास्तवात हा उत्सव समृद्धी देणारा सण आहे. वर्षभरातल्या चिंता, भय, ताणतणाव, महामारी यांची मरगळ झटकून टाकत नव्या उमेदीने जीवनाला सुखमय- आनंदमय करणारा हा सण आहे. अज्ञानाचा अंधार नाहीसा करून मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश फैलवणारा हा सण आहे.
सोनपावलांनी येणार्‍या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला आध्यात्मिक-सांस्कृतिक महत्त्व आहे.धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक क्षणन्क्षण हर्षोल्हासात साजरा केला जातो. तथापि दीपावलीचा शुभारंभ हा खर्‍या अर्थाने ‘वसुबारस’पासून म्हणजेच दि. 21 ऑक्टोबरपासून होत असून, सायंकाळी गाय-वासराची पूजा करून त्यांना नेवैद्य खाऊ घातला जातो.

त्यानंतर ‘धनत्रयोदशी’ला म्हणजेच दि. 22 ऑक्टोबर रोजी मुहूर्तानुसार देवापुढे धनधान्य व धने ठेवून त्याची पूजा करतात अन् सायंकाळी दक्षिण दिशेला कणकेचे दिवे लावून त्यांची पूजा केली जाते.
 
‘नरक चतुर्दशी’च्या दिवशी म्हणजेच या वर्षी दि. 24 ऑक्टोबर रोजी घरातील सर्व लहान-मोठे सदस्य पहाटे अभ्यंगस्नान करतात अन् त्यानंतर अंगणात फटाके फोडतात. आख्यायिकेत याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता. महत्त्वाचे म्हणजे, याच दिवशी दि. 24 ऑक्टोबर रोजीच ‘लक्ष्मीपूजन’देखील असून वद्य अमावस्येला सायंकाळी लक्ष्मी-कुबेराचे पूजन केले जाते. धनधान्य समृद्धी व सौख्य नांदावे हे त्याचे प्रतीक असते.


त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. ज्यास आपण ‘दीपावली पाडवा’ असेही म्हणतो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात केली जाते. या शुभदिनी पत्नी ही पतीला ओवाळून त्याच्यासाठी दीर्घायुष्य चिंतिते. तिला याप्रसंगी तिच्या आवडीची साडी भेट म्हणून दिली जाते. योगायोगाने या वर्षी याच दिवशी ‘भाऊबीज’देखील असून, बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळून पेढा भरवते अन् त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवाला प्रार्थना करते. भाऊसुद्धा बहिणीला तिच्या आवडीची भेटवस्तू देतो. दागदागिन्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. वास्तवात हा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच!




diwali



दीपावलीच्या चार-पाच दिवसांच्या काळात घरोघरी रोषणाई केली जाते. तसेच घरांच्या ओट्यावर-गॅलरीत मातीच्या पणत्या लावून सभोवतालचा परिसर प्रकाशमय केला जातो. वास्तवात हा दिव्यांचा-रोषणाईचा सण आहे. आपल्या आया-भगिनी अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून सर्वांचे लक्ष वेधित असतात. रंगबेरंगी आकाश कंदिलांची उभारणी, नातेवाईक-मित्रमंडळीला फराळाची मेजवानी अन् फटाक्यांची आतषबाजीमुळे तर सारा परिसर दुमदुमून जातो. प्रत्येक जण पारंपरिक वेशभूषा करून इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो. चमचमीत फराळावर ताव मारून दिवाळीचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. याशिवाय नातेवाईकांना-आप्तमित्रांना दिवाळीनिमित्त दिल्या जाणार्‍या शुभेच्छांना तर पारावारच उरत नाही. ‘ग्रीटिंग कार्ड’ देऊन वा मोबाईलद्वारे मेसेज पाठवूनही दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. येनकेनप्रकारे आपल्या मित्रांना, सगेसोयर्‍यांना आपल्या दीपावली शुभेच्छा पोहोचविण्याचा हा सर्वंकष प्रयत्न असतो, हे दृष्टोत्पत्तीस येते.


काळ कितीही बदलो, पण आगरी-कोळी समाजाची दिवाळी पारंपरिक पद्धतीने मोठ्या धूमधडाक्यात दरवर्षी साजरी होत असते. त्यांचं आपल्या पारंपरिक संस्कृतीशी घट्ट नातं आहे. मुंबई, ठाणे, कोकणातील भूमिपुत्रांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत काही आगळीवेगळीच असते. बलिप्रतिपदेला हे लोक पारंपरिक पद्धतीने बैलांची मनोभावे पूजा करत असतात. आपल्या शेतीत भरपूर उत्पन्न निघो, धनधान्याची भरभराट होवो, या पार्श्वभूमीवर आगरी-कोळी लोक ‘ईडा-पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे देवाला साकडे घालत भाताच्या पेंढ्या आपापल्या घरासमोर जाळत असतात. तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे लोक रात्रीच्या वेळी तांदळाच्या पीठाची बैलाची प्रतिकृती तयार करून गावभर मिरवतात. अशा भव्यदिव्य पद्धतीने आगरी-कोळी समाज आपली दिवाळी साजरी करत असतात. त्यांना आमच्यातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


दीपावली हा पारंपरिक भारतीय सण मतभेद-मनभेद विसरून तुम्ही आम्ही सर्वजण आपली हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती, परंपरा अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. खरंतर दीपावली हा सण आता धर्ममर्यादा ओलांडून त्याने एक राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त केले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. यातूनच खर्‍या अर्थाने धार्मिक सहिष्णुता प्रस्थापित होऊन ‘सर्वधर्मसमभाव’ निर्माण होण्यास चालना मिळते. समस्त युवक-युवतींचे भवितव्य उज्ज्वल होवो, तर ज्येष्ठांना निरोगी स्वास्थ्य लाभो, याच दीपावलीनिमित्त अनंत शुभेच्छा! मित्रहो, आपणा सर्वांना यंदाची दीपावली सुखा-समाधानाची,आनंदाची व भरभराटीची जावो, ही ईश्वर चरणी प्रार्थना!
 


 
-रणवीर राजपूत

Powered By Sangraha 9.0