कोकण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेच. पण, कोकणाला ऐतिहासिक असा वारसाही आहे. देवगड, विजयदुर्ग असे प्रसिद्ध किल्ले सर्वांनाच माहीत आहेत. या लेखातून आपण कोकणातील दुर्लक्षित किल्ल्यांविषयी जाणून घेऊया...
गणपती, नवरात्र, शिमगा म्हटले की, मुंबईकरांची हमखास कोकणात फेरी असतेच. कोकणच्या बाहेरचेसुद्धा पर्यटक अनेक पर्यटनस्थळांना मुंबई-गोवा महामार्गावरून किंवा कुंभारली, आंबोली, गगनबावडा घाट मार्गे सर्रास कोकणात भेटी देतात. नेहमीची प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहताना खूप वेळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आपल्याला माहीत नसल्याने आपण तिथे भेट देऊ शकत नाही. या लेखात आपण सफर करणार आहोत अशाच काही दुर्लक्षित ऐतिहासिक दुर्गाची..!
अलिबाग मुरुडचे मुकुटमणी पद्मदुर्ग, सामराजगड नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव सागराला अर्घ्य देऊन आपल्या नावा समुद्रात न्यायला सुरुवात करतात. पावसाचा जोर बर्यापैकी कमी झालेला असतो त्यामुळे या मोसमात ‘गेट-वे-ऑफ -इंडिया’हून अलिबागला जाणार्या फेरी बोट सेवा सुरू होतात. याच संधीचा उपयोग करून एखादा ‘वीकेंड’ आपण या परिसरात घालवू शकतो. अलिबागला आपल्यापैकी अनेक लोक जाऊन आले असतील, पण काही ठरावीक ठिकाणेच आपण नेहमी पाहतो. मुंबई अलिबाग अंतर 130 किमी आहे आणि अलिबागपासून मुरुडच्या दिशेने चौल, रेवदंडा, कुंडलिका नदीवरचा साळावचा पूल पार करून आपण कोर्लई गावात पोहोचतो. स्वतःचेवाहन असल्यास थेट लाईट हाऊसच्या दिशेने थेट किल्ल्यात आपण पोहोचतो किंवा गावातून 15 मिनिटांत आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात छायाचित्रणाचा आनंद घेत पोहोचतो. हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. त्याची बांधणी पोर्तुगीजांनी इ. स. 1521 मध्ये केली.
गडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मिश्रदुर्ग आहे. कुंडलिका नदीच्या मुखाशी हा बांधलेला आहे. इ. स. 1683 साली संभाजी राजांनी हा गड घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. पुढे इ. स. 1739 मध्ये चिमाजी आप्पांनी वसई मोहीम हाती घेतली तेव्हा सुभानजी माणकर यांच्यावर कोर्लई काबीज करण्याची जबाबदारी सोपवली. मराठ्यांच्या हल्ल्यापुढे पोर्तुगीज टिकू शकले नाही आणि गडावर भगवा फडकला. या किल्ल्यावर अनेक तोफा, शिलालेख, चर्च, शिवमंदिर, विहीर इ. आपल्याला पाहायला मिळते. गडाला एकूण 11 दरवाजे आहेत. माथ्यावरून आपल्याला साळावचा पूल, कुंडलिका नदीचे विस्तीर्ण पात्र, चौलचे दत्तमंदिर आणि रेवदंड्याचा कोट, त्यातील सातखणी टॉवर दिसतो. कोणत्याही वयातील व्यक्तीला सहज जाता येईल, असा हा किल्ला आहे.
दोन तासांत कोर्लई पाहून झाल्यावर मुरुडच्या दिशेने पुढे 20 किमींवर मुरुड गाव येते. आपणा सर्वांना हे गाव सिद्दीच्या अजिंक्य जंजिरामुळे परिचित आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनासुद्धा घेता आला नाही. हीच त्याची खासियत! पण महाराजांनी या जंजिर्याला शह देण्यासाठी पद्मदुर्ग आणि सामराज गड हे किल्ले दंडाराजपुरीत बांधले. मुरुडच्या समुद्रकिनार्यावरून थेट समोर दिसतो तो पद्मदुर्ग. मुरुडच्या कोळी लोकांना गाठून त्यांच्या बोटीने आपण या किल्ल्यावर पोहोचू शकतो. हा किल्ला फारच दुर्लक्षित आहे. कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराची चर्या इथे अनेक बुरुजांवर पाहायला मिळते. पश्चिम किनार्यावर महाराजांनी खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ले बांधले.
इ. स. 1678 मध्ये कांसा नावाच्या खडकावर पद्मदुर्ग बांधायला सुरुवात झाली आणि संभाजी महाराजांच्या काळात इ.स. 1684 च्या सुमारास 330 वर्षांपूर्वी किल्ल्याचे काम पूर्ण झाले. या किल्ल्याचे वाळूच्या पुळणीमुळे दोन भाग झाले आहेत. त्या पुळणीवर शंख-शिंपल्यांचा खच पडलेला दिसतो. जास्त ‘झूम’ असलेला कॅमेरा असेल, तर समुद्रात किल्ले जंजिरा सहज टिपता येतो. या गडाच्या तटावरून चहुबाजूंनी किल्ला न्याहाळताना शिवरायांचे अस्तित्व आपल्याला जाणवत राहते. जंजिरा घेण्यासाठीची त्यांची खटपट आपले मनसुद्धा क्षणभर सुन्न करून टाकते. पद्मदुर्गाच्या आठवणी मनात कायमच्या घर करून राहतात. शिवाजी महाराजांच्या मते पद्मदुर्ग म्हणजे सिद्द्यांच्या उरावराची राजपुरीच !!
मुरुडच्या किनार्यावर परतल्यावर जवळच असलेला सामराजगड आपण पाहू शकतो. एकदरा नावाच्या गावातून 20 मिनिटांत आपण सामराजगडावर पोहोचतो. येथे गडाचे अगदी तुरळक अवशेष आहेत. थोडीशी तटबंदी आहे. किल्ल्याच्या मध्यभागी सिमेंटच चौथरा आणि एक टॉवर आहे. या किल्ल्यावरून एका बाजूला पद्मदुर्ग, तर दुसर्या बाजूला जंजिरा दिसतो. शिवरायांनी इ. स. 1661 मध्ये जंजिर्यावर स्वारी केली तेव्हा दंडाराजपुरी जिंकून घेतले आणि मोक्याच्या जागी एका डोंगरावर सामराजगड बांधला असावा. आता जरी गडाचे अस्तित्व नामशेष झाले असले, तरी शिवकाळात त्याला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यामुळे अभेद्य, अजिंक्य जंजिरा पाहायला आपण जातो. तेव्हा, महाराजांचे अष्टागरातील किल्ले म्हणून पद्मदुर्ग, सामराजगड आणि पोर्तुगीजांचा कोर्लई या गडांची भटकंतीसुद्धा जरूर करूया.
संगमेश्वर जवळचा भवानीगड
उन्हाळ्यात कोकण पट्ट्यात आंबे, फणस खायला आपण जातोच, पण श्रावणातून, कोकण रेल्वेचा प्रवास, भात शेती... हे पाहत कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवण्याची मजा काही औरच. ऑगस्ट महिन्यात सलग जोडून सुट्ट्या येतात. त्यामुळे एखादा ‘वीकेंड’ रत्नागिरी परिसरात आपण सहज जाऊ शकतो. नियमित दुर्गभ्रमंती करणार्या लोकांना भवानीगड हा काही नवीन नाही. संपूर्ण महाराष्ट्रात असे दोन-तीन भवानीगड आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या किल्ल्यांवर भवानी मातेचे मंदिर बांधलेले असले की, त्याला सगळे भवानीगड असेच संबोधतात.
चिपळूण संगमेश्वर रस्त्यावर वाटेत तुरळ हे गाव लागते. तेथे जवळच गरम पाण्याची कुंडे आहेत. संगमेश्वरपासून तुरळ हे गाव दहा किमी अंतरावर आहे. तुरळ फाट्यावरून कडवई मार्गे शिर्केवाडीपर्यंत एक किमी हे अंतर आहे. हेच गडाच्या पायथ्याचे गाव. गावातून छोट्याशा पायवाटेने आपण गडावर अगदी अर्ध्या तासात सहज पोहोचतो. वाटेत काळ्या पाषाणातील तीन पाण्यांच्या टाक्या लागतात. त्यातले स्वच्छ, थंडगार पाणी पिऊन आपण उजव्या बाजूने आपण गडावर प्रवेश करतो. गडाचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. सध्या दरवाज्याचे अवशेष तेवढेच शिल्लक आहेत. पावसाळ्यात गडावर खूपच गवत वाढलेले दिसते. कधी कधी गावातील लोक चरायला आपली गुरं येथे घेऊन येतात त्यामुळे थोडाफार वावर येथे आढळतो. गडावर कौलारू मंदिरात भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. मंदिराच्या आवारात, शंकराची पिंड, एक तोफ, दीपमाळ इ. अनेक अवशेष पडलेले आढळतात. मंदिराकडून दक्षिणेकडे एक पायवाट गडाच्या तटबंदीकडे जाते.
या परिसरात, पावसाळ्यात कमरेएवढे गवत वाढलेले असते. गडाच्या पश्चिमेकडील भागात देव टाके आणि म्हसोबाची मूर्ती आहे. गडाला एकूण चार बुरुज आणि सुंदर तटबंदी आहे. गडाच्या माथ्यावरून, मध्येच एखादी कोकण रेल्वे संगमेश्वरच्या किंवा चिपळूणच्या दिशेने जाताना दिसते. इ. स. 1661च्या सुमारास शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी केली असे म्हटले जाते. गडावर जानेवारी महिन्यात भवानी देवीचा उत्सव असतो. संगमेश्वर तालुक्यात, भवनीगड, महिमतगड, प्रचीतगड असे एकूण तीन किल्ले आहेत. त्यापैकी भवानीगड हा कोणत्याही वयातील मनुष्याला सहज सर करता येण्यासारखा आहे. बाकीचे दोन किल्ले चढाईस बर्यापैकी अवघड आहेत.
तुरळजवळच महामार्गावर गोळवली हे गाव आहे. हे माजी संघ चालक गोळवळकर गुरुजी यांचे मूळ गाव. तिथे सध्या सामाजिक प्रकल्पसुद्धा उभारण्यात आले आहे. जिथे आपण आवर्जून भेट देऊ शकतो. पुढे संगमेश्वर-देवरुख हे 20 किमीचे अंतर पार करून महिमतगड हा देवरुख मार्लेश्वर मार्गावर आहे. मार्लेश्वरला श्रावणात मुंबई, पुणे तसेच आंबा घाट मार्गे कोल्हापूर सांगलीतून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे एकाच ट्रीपमध्ये मार्लेश्वर,गणपतीपुळे, पावस, कसब्याचे कर्णेश्वर मंदिर, संभाजी राजांचे स्मारक इ. ठिकाणे आपली पाहून होतात.
पावसजवळचा पूर्णगड
रत्नागिरी शहराच्या आसपास भटकंती करताना आपण थिबा पॅलेस, रत्नदुर्ग, गणपतीपुळे, पावस या ठिकाणी नेहमी जातोच. रत्नागिरीपासून 20 किमी अंतरावर पावसच्या स्वरूपानंद स्वामींचा मठ आपणा सर्वांना वेगळाच अनुभव देऊन जातो. तेथील शांतता आणि दुपारचा महाप्रसाद आपल्याला कायम स्मरणात राहतो. पावस - आडिवरे रस्त्यावर पावसपासून चार किमी अंतरावर गणेशगुळे गणपती मंदिर आहे. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला, असे म्हटले जाते. पुढे दक्षिणेला पूर्णगड किल्ल्याच्या (क्रमश)
-प्रा. अमेया जाधव