मनाच्या श्लोकांची जन्मकथा

    06-Jan-2022
Total Views | 799

manache shlok.jpg


समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे २०५ मनाचे श्लोक सांगितले, असे मानले जाते. समर्थांच्या बुद्धीचा व प्रतिभेचा एकंदर आवाका पाहता ही दंतकथा नसून असे प्रत्यक्षात घडले असणे सहज शक्य आहे. मनाच्या श्लोकांची निर्मिती या अशा प्रसंगातून झाली, असे सांगितले जाते. ही निर्मितीकथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या कवित्वशक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय येतो.


आपले १२ वर्षांचे पायी तीर्थाटन व भारतभ्रमण यात्रा पूर्ण करुन रामदासस्वामी नियोजित कार्यासाठी चाफळच्या खोर्‍यात येऊन राहिले. तेथे आसपासच्या प्रदेशात समर्थांचा शिष्य समुदाय वाढत होता. इ. स. १६४४ नंतर पुढील काही वर्षे स्वामींनी ठिकठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली आणि लोकांना बलोपासनेच्या कार्याला लावले. लोकसंग्रह वाढवण्यासाठी मारुतीचा आणि श्रीरामाचा उत्सव लोकप्रिय करावा, असे स्वामींचे धोरण होते. इ. स. १६४५ च्या चैत्र महिन्यात स्वामींनी पहिला रामजन्मोत्सव मसुरला साजरा केला आणि त्यानंतर ओळीने तीन वर्षे रामाचा उत्सव केला. पण, त्या उत्सवप्रसंगांत रामाची मूर्ती नव्हती. स्वामींच्या मनात होते की, रामोत्सवासाठी एक कायमचे ठिकाण असावे. तेथे श्रीराम विराजमान व्हावेत. चाफळच्या गावकर्‍यांनी स्वामींना राम मंदिरासाठी जागा मिळवून दिली. तेथे मंदिर उभारणीचे काम सुरू झाले. मुसलमान राजवटीत मंदिरांचा विध्वंस केला जात होता. अशावेळी नवे मंदिर उभारणे हे स्वामींचे मोठे धाडस होते. नंतर अंगापूरच्या डोहातून स्वामींना रामाची मूर्ती मिळाली. तिची स्थापना चाफळच्या मंदिरात करण्यात आली आणि तेथे रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू झाला. रामदासांनी दूरदर्शीपणाने रामाच्या उत्सवाची सर्व व्यवस्था करून ठेवली होती. चाफळचे अधिकारी, देशमुख, कुलकर्णी, नाईक या सर्व प्रतिष्ठितांना बोलावून उत्सवाची आखणी करून तो चालू ठेवण्यास सर्वांना सांगण्यात आले. ते उचित होते. कारण, स्वामी म्हणतात -
 
आपण आवचितें मरोन जावें।
मग भजन कोणें करावे।
याकारणें भजनास लावावें।
बहुत लोक॥ (दा. १२. १०. ३३)


 
सर्वांच्या सहकार्याने सुरु झालेला चाफळचा रामनवमीचा उत्सव आज ३५० वर्षे अखंडपणे चालू आहे. रामदासांची लोकप्रियता वाढू लागली. आजुबाजूच्या गावातील लोक उत्सवासाठी येऊ लागले. दरवर्षी ती संख्या वाढतच होती. या भक्तांची व्यवस्था करणे, त्यांच्या भोजनाची राहण्याची व्यवस्था करणे हे सारे भिक्षेवर करावे लागे. त्यासाठी एखाद्या धनिकाची अथवा सरदाराची मदत स्वामींनी घेतली नाही. समर्थांच्या या कार्याची माहिती शिवाजी महाराजांकडे गेली. तेव्हा शिवाजी महाराजांनी चाफळच्या मामलेदारामार्फत उत्सवासाठी अन्नधान्य व इतर आवश्यक सामग्री पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिष्य मंडळींच्या भार हलका झाला. पण, तरीही शिष्य मंडळी व गावातील इतर कार्यकर्ते यांना खूप मेहनत करावी लागे. एकेवर्षी काही कारणाने शिवाजी महाराजांकडून येणारी मदत वेळेवर आली नाही. महाराज काहीतरी राजकीय उलाढालीत गुंतलेले असावे. इकडे चाफळला मदत का आली नाही, म्हणून आयोजक शिष्य काळजीत होते. आणखी दोन-तीन दिवस वाट पाहून स्वामींना याविषयी सांगायचे ठरले. उत्सव तर जवळ येऊन ठेपला होता. अखेरीस एक दिवस या शिष्यांनी रात्रीची जेवणे झाल्यावर समर्थांपुढे हा विषय काढला. समर्थांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर स्वामी म्हणाले, “अरे, तुम्ही कशाला काळजी करता? ज्या रामाचा आपण उत्सव करीत आहोत, तो कैवल्यदाता आहे. मोक्षदाता आहे. मग या साध्या उत्सवाची काळजी तो घेणार नाही का?

 
आपण व्यर्थ चिंता करू नये. मात्र, आपल्या कामात निष्काळजीपणा, आळस नसावा. आपण जमेल तसा उत्सव करू. रामराया आपल्याला काही कमी पडू देणार नाही.” सर्व शिष्यमंडळी निघून गेल्यावर स्वामींनी कल्याणस्वामींना कागद, दौत व लेखणी घेऊन त्यांच्या खोलीत बोलावले. कल्याणस्वामी लिहून घ्यायला बसल्यावर समर्थांनी सांगण्यास सुरुवात केली- ‘गणाधीश तो ईश सर्वागुणांचा...’ समर्थ एकामागून एक श्लोक सांगत होते आणि कल्याणस्वामी ते लिहून घेत होते. दुसर्‍या दिवशी सकाळ होईपर्यंत समर्थांच्या काव्याचा ओघ अखंडपणे चालू होता. शेवटी, ‘म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी’ ही अखेरच्या श्लोकाची शेवटची ओळ सांगून समर्थ उठले. कल्याणस्वामींना काही सूचना देऊन आपल्या आवडत्या निसर्गसान्निध्यातील निवांतस्थान असलेल्या डोंगराकडे निघून गेले.
 

 
नंतर कल्याणस्वामींनी इतर शिष्यांकडून त्या श्लोकांच्या नकला तयार करून घेतल्या. भिक्षेसाठी निघालेल्या सर्व शिष्यांना त्या वाटण्यात आल्या. मनाचे श्लोक लोकांना ऐकवत भिक्षा गोळा करायची असे ठरले. आजही रामदासी ‘मनाचे श्लोक’ म्हणत भिक्षा घेतात व ती मठात जमा करतात. त्यावर्षी हे श्लोक ऐकवत रामदासी महंतांनी, शिष्यांनी भिक्षेद्वारा धान्य इतर खाद्यसामग्री वगैरे गोळा केली आणि उत्सव थाटात साजरा केला. संकल्प नि:स्वार्थ बुद्धीने केलेला असेल, तर लोकोपयोगी कार्यासाठी परमेश्वरी साहाय्य मिळत जाते. नि:स्पृह कार्यकर्त्यांसाठी सकारात्मकतेचे ‘आत्मनिर्भरते’चे हे उत्तम उदाहरण आहे. समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे २०५ मनाचे श्लोक सांगितले, असे मानले जाते. समर्थांच्या बुद्धीचा व प्रतिभेचा एकंदर आवाका पाहता ही दंतकथा नसून असे प्रत्यक्षात घडले असणे सहज शक्य आहे. मनाच्या श्लोकांची निर्मिती या अशा प्रसंगातून झाली, असे सांगितले जाते. ही निर्मितीकथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या कवित्वशक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय येतो. स्वामींच्या शब्दांवर पूर्ण निष्ठा असल्याने त्या श्रद्धेतून शिष्यांना आत्मविश्वासाचे बळ आणि कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने कार्य करण्याची प्रेरणा मिळत होती. हे या कथेतून स्पष्ट होते.
 
 
 
राजवाडे लेखसंग्रहात असा उल्लेख येतो की, रामदासी साहित्य विशेषत: मनाचे श्लोक हे मुसलमानी आक्रमणाचे प्रतिक्रियात्मक रूप आहे.राजवाडे लिहितात, “मनाच्या श्लोकांच्या रचनेत एक ऐतिहासिक गूढ आहे. ते म्हणजे मनाच्या श्लोकांची वृत्तरचना मुसलमानी फकिरांच्या उर्दू व मराठी सवालांच्या वृत्तरचनेसारखी आहे. मनाचे श्लोक ‘भुजंगप्रभात’ वृत्तात आहेत. त्या वृत्तात आणि फारशी करीमांच्या वृत्तांत भेद एवढाच की, करीमांच्या चरणात अन्त्य ‘य’ गणाचे गुरू अक्षर नाही.” राजवाडे पुढे असेही लिहितात की, “दासांच्या वेळी मुसलमानी पीर व त्यांचे तकीये महराष्ट्रातील लहान खेड्यांतूनही मोठ्या प्रमाणात होते. जो जनसमूह पीरांच्या, तकीयांच्या व फकिरांच्या मायावी कचाटीत सापडला होता, त्यांना मुक्त करण्यासाठी समर्थांनी व शिवाजी महाराजांनी नाना प्रकारचे लहान थोर उपाय योजिले. रामदासी (मनाचे) श्लोक व फकिराचे सवाल एक समयावच्छेदाने ऐकून गावोगावच्या मार्मिक लोकांना पाच्छाई धर्माची परीक्षा करण्यास केवढी सवड झाली असेल, ते सांगावयास नकोच.” राजवाडे यांच्या मतानुसार मनाचे श्लोक, मुसलमानी सांस्कृतिक आक्रमणाची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाले असतील, तर त्यावरुन समर्थांच्या विचारांची झेप समजते. ‘मनाचे श्लोक’ ‘भुजंगप्रयात’ वृत्तात रचले गेले. या वृत्तांत चार ‘य’ गण येतात. ते वृत्त मुसलमानी फकिरांच्या, करिमांच्या सवालांच्या वृत्तरचनेसारखे असेल, तर समर्थांच्या समयोचित कल्पकतेचे आश्चर्य वाटते. मनाच्या श्लोकांची जन्मकथा आणि वृत्तरचनेतील गूढ यांवर दासबोध मंडळातील सदस्यांनी चर्चा करावी व समर्थांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उघड करावेत. मनाच्या श्लोकांतील विचारांचा आस्वाद पुढील लेखातून घेऊ.(क्रमश:)


सुरेश जाखडी

 
 







 

 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121