मुंबई : वांद्र्याचे नाव बदलून 'हजरत टीपू सुलतान' करू, असे म्हणणाऱ्या 'टीपू सुलतान पार्टी'ला भाजप मुंबई उपाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. वांद्र्याचं सोडा! तिथल्या बेहराम पाड्यातील नाल्याचं नावही 'टीपू'च्या नावे ठेऊ देणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
सादीक शेख अध्यक्ष असणाऱ्या टीपू सुलतान पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच पक्षाच्या ट्विटर अकाऊंटद्वारे वांद्राचे नाव हजरत टीपू सुलतान करणार असल्याची धमकी देण्यात आली. "आता तर केवळ मैदानाचं नाव टीपू सुलतान ठेवण्यात आले आहे. भविष्यात वाद्र्याचे नाव बदलून हजरत टीपू सुलतान करू", असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.
या प्रकरणी भाजपनेही तीव्र शब्दांत प्रतिक्रीया दिली आहे. भाजप मुंबई उपाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी ट्विट करत या प्रकरणी टीपू सुलतान पक्षाला खडेबोल सुनावले. "वांद्र्याचे नाव टीपू ठेवण्याच्या बाता मारता. इथल्या हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत. वांद्रे तर सोडूनच द्या, इथल्या बेहराम पाड्यातील नाल्यालाही टीपूचं नाव देणार नाहीत.", असा टोला त्यांनी लगावला आहे.