मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ युतीत सडली असा पुनरुच्चार केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग ही त्यांची चिलखते आहेत. ही चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर नाव सांगणार नाही, असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले.
ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग ही भाजपची शस्त्रे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर राऊत यांनी भाजपला ओपन चॅलेंजच दिले. अंगावरती वर्दी असेल पोलिसांच्या तर कुणाच्याही अंगावर जात असतो. बेकायदेशीर कामे करत असतात, आपण सिनेमात अशा प्रकारचे दृश्य पाहत असतो. तशी ईडी, सीबीआय, आयकर विभाग ही त्यांची चिलखत आहेत. ही चिलखत घालून ते लढत असतात. हिंमत असेल तर चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडले, नाय लोळवले तर आम्ही नाव सांगणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्याच्याशी आम्ही ठाम आहोत, असे राऊत म्हणाले.