देशासमोरील सुरक्षेची आव्हाने आणि लष्करप्रमुखांचा आढावा

22 Jan 2022 22:44:39

NARAVANE


 
देशासमोरील सुरक्षेची आव्हाने आणि लष्करप्रमुखांचा आढावा ‘आर्मी डे’च्या एक दिवस आधी लष्करप्रमुख माध्यमांशी संवाद साधतात. त्यामध्ये देशाचे संरक्षण करताना सैन्याने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतात आणि २०२२ मध्ये देशासमोर सुरक्षेची कुठली आव्हाने असतील आणि त्याला तोंड देण्याकरिता आपण कशी तयारी करत आहोत, याचीही माहिती दिली जाते. देशाच्या सुरक्षेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद असते. या वर्षी पण दि. १३ जानेवारीला लष्करप्रमुखांनी देशाच्या सुरक्षेच्या आव्हानांचा आढावा घेतला. त्या मधल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे विश्लेषण खाली केले गेले आहे.


१५ जानेवारी, १९४९ साली जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे अंतिम ब्रिटिश अधिकारी जनरल रॉय बुचर यांच्याकडून भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली. हा दिवस ‘भारतीय सेना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. स्थलसेना/ भूदल किंवा लष्कर हे कोणत्याही सैन्याचे सगळ्यात महत्त्वाचे अंग असते.
वैयक्तिक शौर्य कृत्यांसाठी १५ सेना पदके आणि ’२३ उजअड’ युनिट प्रशस्तिपत्र



लष्कर दिनाच्या उत्सवाची सुरुवात ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ येथे पुष्पहार अर्पण समारंभाने झाली, जिथे तिन्ही सेना प्रमुखांनी शूरवीरांना आदरांजली वाहिली. भारतीय सैन्यदलाच्या सर्व पदांना दिलेल्या संदेशात, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आपले प्राण अर्पण करणार्‍या सर्व जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला वंदन केले आणि वीर नारींना सैन्याच्या अखंड समर्थनाचा पुनरुच्चार केला. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी राष्ट्राला दिली.लष्करप्रमुखांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे ‘आर्मी डे परेड’चा आढावा घेतला आणि वैयक्तिक शौर्य कृत्यांसाठी १५ सेना पदके (पाच मरणोत्तर) आणि युनिट्सना त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल ’२३ उजअड’ युनिट प्रशस्तिपत्र प्रदान केली. या वर्षीच्या ‘आर्मी डे परेड’मध्ये भारतीय लष्कराच्या यादीमध्ये असलेल्या विविध शस्त्रास्त्र प्रणालींच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन करण्यात आले.

२०२२ची भारतीय लष्कराची थीम आहे, ‘इन स्ट्राइड विथ द फ्युचर’ जी आधुनिक युद्धात विघटनकारी तंत्रज्ञानाद्वारे खेळल्या जाणार्‍या वाढत्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पावती आहे. भारतीय सैन्याला पारंपरिक आणि अपारंपरिक अशा अनेक सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो आणि या उदयोन्मुख आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (अख), ५ॠ, रोबोटिक्स आणि ‘क्वांटम’ टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे.

‘आर्मी डे’च्या एक दिवस आधी लष्करप्रमुख माध्यमांशी संवाद साधतात. त्यामध्ये देशाचे संरक्षण करताना सैन्याने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतात आणि २०२२ मध्ये देशासमोर सुरक्षेची कुठली आव्हाने असतील आणि त्याला तोंड देण्याकरिता आपण कशी तयारी करत आहोत, याचीही माहिती दिली जाते. देशाच्या सुरक्षेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद असते. या वर्षी पण दि. १३ जानेवारीला लष्करप्रमुखांनी देशाच्या सुरक्षेच्या आव्हानांचा आढावा घेतला. त्या मधल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे विश्लेषण खाली केले गेले आहे.

 
लष्करप्रमुखांची वार्षिक पत्रकार परिषद



देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील आव्हानांविषयी सेना दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लष्करी सज्जता राखण्याच्या दृष्टीने व्यापक नियोजनाची गरज अधोरेखित केली.पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबर सुरु असलेल्या सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा निघेल, अशी भारताला अपेक्षा आहे. पण, त्याचवेळी लष्कर कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील पूर्णपणे सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

कुठल्याही संभाव्य घटनेचा सामना करण्यासाठी व्यूहरचनात्मक तयारी झाली आहे. देशाच्या उत्तर सीमेवर लष्कर पूर्णपणे सर्तक आहे, असे त्यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितले. “भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने नवीन ‘टेक्नोलॉजी’चा समावेश करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालतो. सीमाभागात पाकिस्तानकडून कागाळ्या सुरूच आहेत. सीमाभागात दहशतवादी वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जवानांकडून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच वारंवार सिद्ध होताना दिसतो. पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद सहन न करण्याचं आमचं धोरण आहे. आम्ही आमच्या मर्जीने, आमच्या वेळेनुसार, आम्हाला हव्या त्या ठिकाणी अचूकतेने प्रत्युत्तर देण्याचा आमचा अधिकार राखून ठेवला आहे,” असे लष्करप्रमुखांनी सांगितले. सरलेल्या वर्षाबद्दल बोलताना म्हणाले की, “मागचे वर्ष आव्हानांनी भरलेले होते. आम्ही त्या आव्हानांचा सामना केला व सर्वोत्तम ठरलो. पाकिस्तान आणि उत्तर सीमेवरील स्थिती ही दोन्ही मुख्य आव्हाने होती.”

लष्करी धोरणांची फेरआखणी


 
गलवान खोर्‍यातील संघर्षांनंतर भारत-चीन लष्करस्तरीय बैठकांमध्ये काही भागांतून सैन्य माघारीवर सहमती झाली. परंतु, दोन भागांत ती झालेली नाही. याच काळात उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात नव्याने घुसखोरी केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्यासाठी गाव वसविणे, पूल उभारणी असे उद्योग चीन करत आहेत. सीमेलगत चिनी सैन्याची तैनाती, चीनच्या नवा भूसीमा कायद्या भारताच्या विरोधात आहे.

भारत-चीनदरम्यान साडेतीन हजार किलोमीटरची सीमा आहे. यातील ९५ टक्के प्रत्यक्ष नियंत्रण रेषा सीमांकित नाही. याचा चीन घुसखोरी, भारतीय भूप्रदेशावर दावा करण्यासाठी उपयोग करतो. आपले लष्करी धोरण, डावपेच बराच काळ मुख्यत्वे पाकिस्तानला समोर ठेवून आखले गेले होते. तिबेटमध्ये रेल्वे आणणे, सीमावर्ती रस्त्यांचा विकास, क्षेपणास्त्र तैनाती, लष्करी आणि हवाई तळांच्या उभारणीद्वारे चीनचे मनसुबे उघड आहेत.सध्याच्या वातावरणात सीमावादावर तोडगा निघण्याची अपेक्षा नाही. सीमावाद चीन अनेक वर्षे ठेवेल. म्हणून लष्करी सज्जता राखणे महत्त्वाचा मार्ग आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढवला पाहिजे. चिनी सैन्याला खंबीरपणे तोंड देण्यासह कुठलीही आणीबाणीकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचे लष्करप्रमुख नरवणे यांनी नमूद केले.

भारत-म्यानमार सीमेची जबाबदारी ‘आसाम रायफल्स’वर


 
पँगाँग सरोवर पूलबांधणी, विजनवासातील तिबेट सरकारच्या दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल चीनकडून भारताच्या लोकप्रतिनिधींना मिळणारी धमकी, अरुणाचल प्रदेशमधील जिल्ह्यांचे चिनी नामकरण असले उद्योग पाहता, चीन भारताला अनेक वर्षे त्रास देत राहील, हे स्पष्ट आहे.

भारत-म्यानमार सीमेची जबाबदारी ‘आसाम रायफल्स’वर सोपवून तेथील सैन्य चीन सीमेवर नेणे सुरु आहे. आता आपण अरुणाचल प्रदेशमध्ये सर्व ऋतूंत वाहतुकीस योग्य रस्ते बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. सैन्य, शस्त्रसामग्रीच्या जलद हालचालीसाठी सीमावर्ती भागात रेल्वे मार्गाची कामे प्रगतिपथावर आहेत. लडाख आणि अरुणाचलमध्ये विमानांसाठी धावपट्टी मजबूत करून त्या लढाऊ आणि मालवाहू जहाजांना उतरण्यायोग्य करण्याचा कार्यक्रम हाती घेतला गेला आहे. आसाममधील तेजपूर हवाईतळावर ‘सुखोई’ लढाऊ विमानांची तुकडी नेण्यात आली आहे. डोंगराळ भागात नेण्यायोग्य वजनाने हलक्या तोफा तोफखाना दलाच्या भात्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. चिनी सैन्याशी दोन हात करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, त्याचा विचार केला गेला आहे.

‘मेक इन इंडिया’ अभियानचे आवाहन



भारतीय लष्करातील जवानांच्या गणवेशात १४ वर्षांनी बदल झाला आहे. जवानांच्या गणवेशाबाबत यावेळी १५ वेगवेगळे कॅमोफ्लाज पॅटर्न, चार प्रकारचे डिझाईन आणि आठ वेगवेगळ्या फॅब्रिक पर्यायांचा विचार करण्यात आला. ’लष्कर दिनाचे’ औचित्य साधून दि. १५ जानेवारी रोजी नव्या गणवेशाचे अनावरण केले गेले.संरक्षण दलात आतापर्यंत विदेशी शस्त्र, मिसाईलसह शस्त्रखरेदीवर प्रचंड खर्च होत होता. यावर उपाय म्हणून केंद्राने ‘मेक इन इंडिया’ अभियान राबवून लष्करी शस्त्रात लागणारे तंत्र खासगी कंपन्यांना तयार करण्याचे आवाहन केले होते.
 
या आवाहनाला भारतीय उद्योजकांनी प्रतिसाद देत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. याचाच परिणाम म्हणून स्वदेशी बनावटीची विशाल, विभव आणि प्रचंड अ‍ॅण्टी टँक माईन लष्करात दाखल होणार आहे. याबरोबरच मिसाईलची चाचणीही घेण्यात आली आहे.देशभरातील कंपन्यांनी रणगाडा, मिसाईल, रॉकेट लॉन्चरबरोबर सीमेवरील जवानांच्या सुरक्षेसाठी जॅकेट्स तयार करून दिले आहे. लष्कराच्या अ‍ॅण्टी टँक माईनमध्ये पहिल्यांदाच ‘ट्रान्स्फार्मर रिसिवर सॉफ्टवेअर’ बसवण्यात आले आहे. अशाच प्रकारचे ८० किलोमीटरपर्यंत हल्ला करता येऊ शकेल, असे ‘गाईडेड पिनाका रॉकेट’ व ‘बिनाका मल्टिबॅरल रॉकेट लाँचर’ आता लष्कराकडून उत्पादित करण्यात येणार आहे.


 
भारतीय ‘लष्कर दिना’चे औचित्य साधून ‘मेक इन इंडिया’ संकल्पना किती उपयोगी ठरली, याचा आढावाही लष्करप्रमुखांनी घेतला. त्यात बरे यश मिळाले आहे. मात्र, अजून जास्त प्रयत्नांची गरज नक्कीच आहे.चीन सीमेवरील व्यूहरचनेत जो बदल करू शकतो, त्याला आपण प्रत्युत्तर द्यायला तयार आहोत, हे लष्करप्रमुख नरवणे यांनी देशाला विशेषत्वाने अधोरेखित करुन सांगितले.


- (नि.) ब्रि. हेमंत महाजन

 
 
Powered By Sangraha 9.0