मुंबई : नववर्षाच्या सुरूवातीलाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठ मोठा निर्णय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक असणार आहेत. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणात मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. देशपातळीवरही प्रदुषण रोखण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील काही दिवसांपूर्वी देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात लवकरच क्रांती होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. आपल्या या निर्णयाला पाठींबा दिल्यानिमित्ताने त्यांनी तीनही मंत्र्यांचे आभार मानले. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.