नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने चौथा कसोटी सामना जिंकत ५ सामन्यांच्या मालिकेत २ - १ अशी आघाडी मिळवली. यानंतर आता पाचवा सामना हा भारतीयांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या स्पर्धेत (WTC 2021-2023) जर चांगले गुण मिळवून पहिले स्थान कायम ठेवायचे असेल तर हा सामना भारताला जिंकणे आवश्यक आहे. पण, चौथ्या कसोटीमध्ये चांगली कामगिरी करणारे २ फलंदाज जखमी असून पाचव्या कसोटीमध्ये खेळाच्याबाबत साशंकता वर्तविण्यात येत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये शतकी पारी खेळणारा रोहित शर्मा आणि अर्धशतकी खेळी करणारा चेतेश्वर पुजारा जखमी झाले. रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली असून चेतेश्वर पुजाराच्या घोट्याला दुखापत झाली आहे. याबाबत अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आली नसली तरीही ते पाचव्या कसोटीत खेळातील का? याबाबत प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे.
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमारला संधी मिळणार?
श्रीलंका दौऱ्यातून बोलवून घेतलेल्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला आतातरी संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी रोहित जर संघातून खेळू शकला नाही तर त्याच्या जागी सलामीला पृथ्वीला खेळवले जाऊ शकते. तर, पुजाराच्या जागी मधल्या फळीला सूर्यकुमारला खेळण्याची संधी मिळू शकते. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात १५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे भारताला ४६६ धावा करता आल्या. या खेळीदरम्यान पुजाराच्या घोटा मुरगळला होता आणि डावादरम्यान त्याला पट्टी बांधून खेळावे लागले. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्माच्या गुडघ्यालाही दुखापत झाली.