मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीतेंच्या यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया दिली. शरद पवार देशाचे नेते असल्याचे राऊत म्हणाले होते. तसेच महाराष्ट्रातील सरकार चांगले चालले आहे, गीतेंसारख्या लोकांच्या वक्तव्यांची दखल घेतली जाणार नाही, असेही राऊत म्हणाले.
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरीही त्यांचे नाव शरद पवार यांनी सुचवलं होते.
महाविकास आघाडी सरकारची त्यांनी पायाभरणी केली आहे. त्यामुळे ते आमचे नेते आहेत. अनेक वर्ष आमचे त्यांच्याशी राजकीय मतभेद होते पण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार अनेक वेळा एकाच व्यासपीठावर सोबत होते. शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावे, अशी इच्छा बाळासाहेबांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पवारांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.
"स्थानिक पातळीवरच्या संघर्षाबद्दल गीते यांनी अशी वक्तव्ये करणे पक्षाच्या नियमात बसत नाही. गीते यांची भूमिका ही वैयक्तिक आहे पक्षाची नाही. गीतेंनी हे वक्तव्य करण्यामागे त्यांची कारणे असतील, त्यांच्या भावना असतील पण सरकारच्या एका महत्वाच्या नेत्याविषयी जाहीरपणे असे व्यक्त होणे, चुकीचे आहे. अनंत गीतेंवर कारवाई करायची की नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील," असेही राऊत म्हणाले.