उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानंतर हे काय करणार ? - किरीट सोमय्या

22 Sep 2021 15:19:14
mulund _1  H x



मुंबई - येत्या २४ तासांमध्ये मुंबई पोलीसांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. कोल्हापूरला जाताना अडवणूक केल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमय्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पत्र लिहले असून, त्यामध्ये २० सप्टेंबर रोजी स्थगित झालेला कोल्हापूर दौरा येत्या मंगळवारी सकाळी ९ वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
‘कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यानंतर जाऊ दिलं. त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी करत मला आडवले, म्हणून याप्रकरणी आधिकृत तक्रार करण्यासाठी मी पोलीस ठाण्यात आलो आहे, असे म्हणत सोमय्या यांनी आज मुलुंड नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखले केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार मला इतके का घाबरतात? उद्या उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानंतर हे काय करणार?’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
 
 
 
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या हे मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापुरला जाणार होते. मात्र, राडा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांना अडविले होते. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी बेकायदेशीररित्या अडवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
Powered By Sangraha 9.0