वैदिक परंपरा आणि साधना भाग-9

01 Sep 2021 19:17:48
SADHANA_1  H x
 
 
‘आप तत्त्वा’चा रस हा गुण समजण्यासाठी प्राणवायूच्या निर्मितीचे उदाहरण पाहूया. एकाच वेळी आठ विद्युतकण
‘आप तत्त्वा’चा रस हा गुण समजण्यासाठी प्राणवायूच्या निर्मितीचे उदाहरण पाहूया. एकाच वेळी आठ विद्युतकण (Electron) जेव्हा विशिष्ट रचनेमध्ये येतात, तेव्हा प्राणवायू निर्माण होतो. याचप्रकारे जर दोन विद्युतकण एकत्र आले, तर ‘उद्जन’ (हायड्रोजन) वायुकण तयार होतात. त्यांच्यावर सतत होणार्‍या संस्कारामुळे विद्युतकणांना किंवा ओतांना (Electron) नेहमीच प्राणवायूची निर्मिती करणे भाग पडते. ही विवशता किंवा बाध्यता त्यांच्यावर सतत होत असलेल्या संस्कारामुळे येते. याच संस्कारांना ‘आप तत्त्वा’चा ‘रस’ म्हणतात. ‘रस’ म्हणजे संस्कारामध्ये रस (रुची) घेणे, स्वभाव बनणे होय. परंतु, साकार दर्शनाचेसुद्धा एक निश्चित असे शास्त्र आहे. येनकेन प्रकारेण दर्शन होत नाही. भगवान शिव यांना ‘आप तत्त्वा’चे स्वामी मानलेले आहे व ते स्वतः शुभ्रवर्ण आहेत. ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ असे त्यांचे वर्णन आहे. त्यांची पत्नी गौरीहीसुद्धा गौरवर्णी म्हणजे शुभ्र वर्णाची आहे. सेवक नंदी तसेच शंख हेसुद्धा शुभ्र आहेत. पार्श्वभागी असलेला हिमालय आणि मस्तकातून वाहणारी गंगेची धारासुद्धा शुभ्र आहे आणि या सर्वांवर ज्या चंद्रमेची दिव्य, सुखद व शीतल प्रभा पडलेली आहे, तो चंद्रमा व ती प्रभासुद्धा शुभ्र आहेत. सर्व जगच शुभ्र आहे. ‘आप तत्त्वा’ची अनुभूती दिव्य शांत आणि शुभ्र आहे.
 
 
परंतु, शांततेचा भंग करतात, भगवान शिवाच्या गळ्यावर, खांद्यावर लटकणारे भुजंग. कुंडलिनीच्या जागृतीची प्रक्रिया म्हणून मन सर्परूप होऊन शिवदर्शनाबरोबर सर्पदर्शनही करते, म्हणून कुंडलिनी जागृतीची अवस्था प्राप्त करून देणारे सर्प भगवान शिवाच्या सर्वांगावर लटकताना दिसतात. आपतत्वदर्शन आणि सर्पदर्शन यांचा अतूट संबंध आहे. ज्याची कुंडलिनी जागृत झालेली आहे, अशा साधकाला सर्पदर्शन साक्षात्कार होणारच, भलेही तो साधक निराकारपिंडी असो वा अवैदिक परंपरेचा असो! साधनेच्या क्षेत्रातील सर्पदर्शनाचा हा अन्योन्यसंबंध पाहून वैदिक परंपरेमध्ये सर्पदर्शनप्रीत्यर्थ एक सणच सुरू करण्यात आलेला आहे, तो म्हणजे नागपंचमी. आमचे विद्वान नागपंचमीचा संबंध अनार्यांशी लावतात. आर्यांनी हा सण अनार्यांपासून उचलला, असे प्रतिपादन करतात. यात त्यांचेच अनार्यत्व दिसून येते. नागपंचमीचा उत्सव साधनानुभवांचे स्मरण देत असल्यामुळे पूर्णतः आर्य म्हणजेच वैदिक आहे.‘पृथ्वी तत्त्वा’ला पार करून साधक जेव्हा ‘आप तत्त्वा’कडे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होणे अत्यावश्यक आहे. ‘पृथ्वी तत्त्वा’पलीकडील कोणतेही तत्त्व ‘कुंडलिनी’ जागृत झाल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. केवळ ‘कुंडलिनी’ जागृतीलाच उच्चस्थान देणार्‍यांनी हे सत्य जाणून घेतले पाहिजे. उच्चतर योगसाधनेच्या दृष्टिकोनातून ‘कुंडलिनी’ जागरण ही एक प्रारंभिक अवस्था आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
 
 
‘कुंडलिनी’ म्हणजे काय?
 
‘कुंडलिनी’बद्दल बर्‍याच चुकीच्या कल्पना असल्याचे आढळून येतात. ‘कुंडलिनी’ एक शक्ती अवश्य आहे. तिचे वास्तव्य नेहमी मूलाधार चक्रात असते असे मानण्यात येते. जागृत झालेली कुंडलिनी शक्ती ‘सुषुम्ना’ नाडीतून उर्ध्वगतिक होऊन षट्चक्रभेदन करते. परंतु, ‘कुंडलिनी’ शक्ती केवळ मूलाधार चक्रातच वास करते की, तिचे स्वरूप आणि अस्तित्व अन्य कोणत्या स्थानी आहे, याचे ‘कुंडलिनी’चे शास्त्रीय स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने योग्य ते संशोधन होणे आवश्यक आहे. सर्वदूर असे मानण्यात आलेले आहे की, ‘कुंडलिनी’ मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत पडलेली असते किंवा एखाद्या सर्पिणीसारखी साडेतीन चक्रांत स्वतःला गुंडाळून घेऊन व आपले तोंड मूलाधार चक्राच्या अधोभागात खुपसून निद्रितावस्थेत पडलेली असते. लेखकाने याबद्दल अधिक ग्रंथ वाचलेले नाहीत. कारण, लेखकाच्या अनुभवाप्रमाणे अधिकांश ग्रंथलेखक प्रत्यक्ष अनुभव न घेता पूर्वसुरींच्या ग्रंथाचे वाचन करून व त्यावर स्वत:ची मल्लिनाथी करूनच नवीन ग्रंथलेखन करतात. यामुळे त्यात वास्तवता फारच कमी आढळते. लेखकाचा अनुभव आहे की, योगशास्त्रावरील पुस्तकात अशांचाच भरणा अधिक आहे.
 
 
‘कुंडलिनी’ शक्तीचे स्वरूप ओळखण्याकरिता प्रत्यक्ष योगाभ्यासाने प्राप्त झालेले सूक्ष्म व गहन अनुभव, जे खर्‍या योगसाधकाकरिता सर्वमान्य, आवश्यक व पुरेसे आहेत. लेखक स्वतःच्याअनुभववावरूनच हे विवेचन करीत आहे. ‘कुंडलिनी’ सर्व शरीरात वास करते. ‘कुंडलिनी’ जागृत होत असताना असा विलक्षण अनुभव येतो की, शरीराच्या कणाकणांमध्ये स्पंदन होऊन ‘विद्युतझंकार’ उठतो. संपूर्ण शरीरात एक विचित्र प्रकारचे विद्युतस्पंदन चालू होते आणि शरीराच्या घटापटांत (Cells) नवीन अणुरचना होत असल्याचा अनुभव येतो. शरीराच्या अंतर्भागातील घटाघटात भरून राहिलेल्या अणुरेणूंची जुनी रचना पूर्णपणे बदलून साधनामार्गाला योग्य अशी नवीन अणूरेणु रचना बनते. हेच ‘कुंडलिनी’चे जागृत होणे होय. ‘कुंडलिनी’चे स्थान केवळ मूलाधार चक्रातच नसून संपूर्ण शरीराच्या अणुरेणूंमध्ये आहे. जो साधक नाही त्याच्या शरीरातील अणुरचना साधना धर्माकरिता योग्य नसते, म्हणजेच एकप्रकारे सुप्त असते. सुयोग्य साधनेमुळे ती सुप्तावस्था जाऊन शरीर साधनेला योग्य असे बनते. शरीरातील घटाघटात नवी अणुरचना येऊन ते कार्यक्षम बनते, हेच ‘कुंडलिनी’चे जागरण आहे.
 
 
घटाघटातील अणुरचना बदलणे ही साधी बाब नाही. विश्वातील प्रत्येक वस्तू स्वतःच्याच अणुरचनेनुसार चालण्याच्या प्रयत्नात असते. या प्रयासालाच ‘पृथ्वी तत्त्वा’चा गुण गंध म्हटलेले आहे. या गंधगुणामुळेच विश्वातील सर्व पदार्थ आणि मूलद्रव्य (Elements) नेहमीच स्वतःचे रूप आणि घटना (Atomic Structure) यानुसार चालतात, विश्वातील पदार्थ त्यांना एकदा मिळालेले रूप व घटना सोडू इच्छित नाहीत. म्हणूनच अब्जावधी वर्षांपासून प्राणवायूची घटना घेऊन आणि सुवर्णाची घटना घेऊनच आहेत. आजचे संशोधन म्हणते की, ओतप्रोतांची समकालीन विशिष्ट रचना आणि स्पंदन यापासून मूलद्रव्ये बनतात. ओतप्रोतांची विशिष्टकालीन रचना बदलल्यास अणुविस्फोट होतो किंवा नवीन मूलद्रव्य तयार होते. अणुरचना बदलणे म्हणजे अणुविस्फोटासमान परिस्थिती निर्माण होणे, असे असल्याने ज्या साधकाच्या शरीरात कुंडलिनी जागरण होते, त्याला विलक्षण दाह आणि घबराटीचा अनुभव येतो.
 
डॉक्टर खोराणांचे गुणविषयक संशोधन
 
भारतीय वैज्ञानिक डॉ. खोराणा अमेरिकेत जाऊन आपले अभूतपूर्व आणि विलक्षण असे संशोधन करीत आहेत. त्यांना कल्पनाही नसेल की, त्यांचे हे संशोधन ‘कुंडलिनी शक्ती’ व तिच्या रचनेबद्दल आहे. आपल्या शरीरात अगणित घटक (Cells) वास्तव्य करतात. प्रत्येक घटकामध्ये एक केंद्र (Nucleus) असते. केंद्रात काही गुणसूत्रे (Chromosomes) असतात. प्रजननाच्या वेळी याच गुणसूत्रांवर प्रक्रिया होऊन नवीन जीव उत्पन्न होतो. गुणसूत्रांमध्ये ‘जीन्स’नामक एक अतिसूक्ष्म पदार्थ असतो व तो प्रत्येक प्राण्याचे गुणधर्म निर्धारित करतो. या ‘जीन्स’च्या अंतर्गत रचनेनुसार प्राण्याच्या ठायी गुणांचा वास होतो. योगिराज हरकरे
(क्रमशः)
- योगिराज हरकरे 
                                                                                                                                             (शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
Powered By Sangraha 9.0