डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू पं. नेहरूंच्या षडयंत्रामुळे झाला का ?; कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल

01 Sep 2021 19:33:24
mukharjee_1  H

निवृत्त सरन्यायाधीशांकडून चौकशी करण्याची विनंती
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १९५३ साली काश्मीरमध्ये पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूची निवृत्त सरन्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
 
 
कोलकाता उच्च न्यायालयात समरजीत रॉय चौधरी आणि अजित कुमार मिश्रा या दोन वकिलांतर्फे दाखल याचिकेत डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डॉ. मुखर्जी यांचा मृत्यू हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या षंडयंत्रामुळे झाली की कसे, याविषयी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरणे द्यावे, असेही याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू पोलिस कोठडीत असताना नेमका कशाप्रकारे झाले, याविषयी देशातील नागरिकांना कोणतीही माहिती नाही. मात्र, त्या संशयास्पद मृत्यूविषयी माहिती होणे हा देशातील नागरिकांचा हक्क आहे. काश्मीरमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. मुखर्जी यांना कटुआ पोलिसांनी अटक केली होती, मात्र त्यानंतर त्यांना काश्मीरमध्ये तेव्हा सत्तेत असलेल्या शेख अब्दुल्ला यांनी न्यायालयात हजर केले नव्हते. त्यामुळे केंद्र सरकार, प. बंगाल सरकार आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू – काश्मीर प्रशासनास याविषयी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची विनंती याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0