टोकियो : भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेमध्ये उत्तम कामिगीर करत आहेत. गेल्या २ दिवसांपासून पदकांची लयलूट होत असताना तिसऱ्या दिवशीही भारताने आणखी एका पदक आपल्या नावावर करत पदकांची अष्टमी पूर्ण केली आहे. नेमबाज सिंहराज अधाना यांनी १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. यावेळी अंतिम फेरीत त्यांनी चीनच्या २ खेळाडूंना चांगलीच टक्कर दिली. मात्र, अखेर त्यांनी देशाच्या नावावर आणखी कांस्य पदक केले आहे.
सिंहराज अधाना यांनी अंतिम फेरीमध्ये २१६.८ कांस्य पदक पटकावले. यावेळी चीनच्या चाओ यांगने २३७.९ गुणांसह पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदक, तर चीनच्या जिंग हुआंगने २३७.५ गुणांसह रौप्य पदक पटकावले. भारताचे नेमबाजीतले हे दुसरे पदक ठरले असून पॅरालिम्पिक २०२०मध्ये हे आठवे पदक ठरले आहे. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.